पुणे- लोकसभा २०१९ ची निवडणूक ही हुकुमशाही विरुध्द लोकशाहीची निवडणूक आहे. संविधान, लोकशाही आणि मानवतेच्यादृष्टीने ही निवडणूक आहे. त्यामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्र पक्षाच्या कार्यकर्त्याने आपण स्वत:च उमेदवार आहोत असे समजून एकदिलाने काम करून पुणे शहर, बारामती, शिरूर आणि मावळच्या जागा जिंकून केंद्रातील भाजप सरकारला सत्तेवरून खाली
खेचावे असे आवाहन कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्षांच्या नेत्यांनी केले. कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार म्हणून मोहन जोशी यांचीनिवड झाल्याबद्दल कॉंग्रेस भवनात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला .
पुणे शहर लोकसभा मतदार संघासाठी कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना,रिपब्लिकन पीपल्स आघाडी व
मित्र पक्षांच्या आघाडीचा उमेदवार म्हणून माजी आमदार मोहन जोशी यांची सोमवारी रात्री उशिरा उमेदवारी जाहीर झाली.
त्यानिमित्त मंगळवारी दुपारी कॉंग्रेस भवन येथे आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. माजी
उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अजित पवार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,अ. भा.काँग्रेस कमिटीच्या चिटणीस व
महाराष्ट्राच्या सहप्रभारी सोनल पटेल, खासदार वंदना चव्हाण, आमदार अनंत गाडगीळ, आमदार संग्राम थोपटे, पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष चेतन तुपे, पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष
सचिन साठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संजोग वाघीरे, कॉंग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय जगताप, जेष्ठ नेते उल्हास पवार,माजी खासदार अशोक मोहोळ, नाना नवले, बाळासाहेब शिवरकर, श्रीकांत शिरोळे, प्रदीप गारटकर, दिलीप बराटे, दीप्ती
चवधरी, कमल व्यवहारे, मोहनसिंग राजपाल, अॅड. अभय छाजेड, अरविंद शिंदे, डॉ.सतीश देसाई, यावेळी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, कार्यकर्त्यांचा उत्साह हा निवडणुकीचे वारे दर्शवणारा आहे. हा उत्साह तीन आठवडे असाच टिकवला पाहिजे. पुढे पुढे तो वाढत गेला पाहिजे. प्रत्येक कार्यकर्त्याने जीव झोकून देऊन काम केले तर त्याचा परिणाम आगामो विधानसभा निवडणुकांमध्ये दिसेल. महाराष्ट्राची सत्ता पुन्हा कोणाच्या हातात द्यायची हा निर्णय ठरवणारी ही लोकसभेची निवडणूक आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा येथील जाहीर सभेत पवार कुटुंबीयांबद्दल केलेल्या विधानाचा समाचार घेत अजित पवार म्हणाले,
पंडित नेहरूंपासून डॉ. मनमोहनसिंगांपर्यंत अनेक पंतप्रधान मी पाहिले. परंतु मोदींसारखे पंतप्रधान मी पाहिले नाही. पंतप्रधानांनी
देशातील बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या यासाठी काय केले, मुलींवर होणारे अत्याचार त्यांचे संरक्षण, कामगारांचे प्रश्न, महागाई, इंधनाच्या वाढत्या किमती याबाबत बोलणे अपेक्षित असताना ते पवारांच्या कुटुंबाबद्दल बोलले. पवार कुटुंब त्यांचे बघण्यासाठी समर्थ आहेत. पवार साहेब आमचे काल, आज आणि उद्याही दैवतच असेल असे त्यांनी स्पष्ट केले. दरवर्षी २ कोटी रोजगार असे पाच वर्षात १० कोटी रोजगार दिले का? दुष्काळाने महारष्ट्र होरपळत असताना चार्यांच्या छावण्या, पाण्याचे टँकर याबाबत बोलण्याऐवजी पवार घराण्याबद्दल बोलता मात्र, पंतप्रधान मोदींचा आदर ठेवून जर त्यांना तुमच्या कुटुंबाबद्दल काय? असे
म्हटले तर? असं सवाल त्यांनी केला.डॉ. बाबासाहेबांनी आपल्याला संविधान, कायदा आपल्या हातात दिला. त्याचा आदर आपण करायला पाहिजे. त्यासाठी ही निवडणूक महत्वाची असून चारही मतदार संघात जिथे ज्या पक्षाचा उमेदवार असेल त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दुसर्या मित्र पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सन्मान ठेवा, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कुठलाही कार्यकर्ता कुठेही कमी पडणार नाही, रुसणार नाही,फुगणार नाही व कुठलीही वेगळी अपेक्षा करणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
वर्धा येथे झालेल्या पंतप्रधान मोदींच्या सभेला ३५ हजार संख्या होती. ही गर्दी २ लाखावरून ३५ हजारावर आळी आहे. २०१४ ला ऊन होते आणि आता ऊन आहे. मात्र हवा बदलती आहे हे लक्षात घ्या आणि जीव ओतून काम करा विजय आपलाच आहे असे आवाहन पवार यांनी केले.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, २०१९ ची लोकसभेची निवडणूक ही ही केवळ उमेदवारापुरती, देशासाठी अथवा महाराष्ट्रासाठी नसून
प्रत्येकाच्या प्रपंचाकरीता अस्तित्वाची लढाई आहे. सर्व मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांनी किंतु परंतु मनात न ठेवता एकदिलाने काम करून
पुन्हा एकदा सत्ता खेचून आणा असे आवाहन त्यांनी केले.
सोनाल पटेल म्हणाल्या, आपल्याला देशात कॉंग्रेस आघाडीची सत्ता आणण्यासाठी महाराष्ट्रातील जास्तीत जास्त जागा जिंकून
आणायच्या आहेत. केंद्रातील सध्याचे सरकार घालवण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे असे आवाहन त्यांनी केले.
उल्हास पवार म्हणाले, लोकशाही, संविधानाच्या दृष्टीने २०१९ ची निवडणूक अतिटतीची आहे. मोहन जोशी यांना आपण अगदी सामान्य कार्यकर्ता असल्यापासून पाहत आहोत. त्यांना तिकीट म्हणजे सामान्य कार्यकर्त्याला तिकीट असे असल्याने आपण
स्वत; निवडणुकीसाठी उभे आहोत या भावानेने सर्वांनी काम करावे. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका एकदिलाने काम करा असे
आवाहन त्यांनी केले.
चेतन तुपे म्हणाले, मोहन जोशी यांना तिकीट मिळाले ही आनंदाची बाबा आहे. हुकुमशाही विरुध्द लोकशाही अशी ही लढाई
असल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकदिलाने काम करतील.
मोहन जोशी म्हणाले, २०१९ ची निवडणूक ही ऐतिहासिक निवडणूक आहे. देशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली.
संविधान संपविण्याचे काम सध्याच्या केंद्रातील सरकारने चालवले आहे. त्याबाबत निर्णय घेण्याची ही निवडणूक आहे. पुणे,
बारामती, मावळ आणि शिरूर ही चारही जागा आपल्याला जिंकायच्या असून त्यासाठी सर्वांनी एकत्र येवून काम करावे असे आवाहन
त्यांनी केले.