श्री क्षेत्र देहू आळंदी विकास आराखड्याअंतर्गत एक हजार कोटी रुपयांहून अधिक कामे – सार्वजनिक बांधकाम खात्याकडून पुढाकार
पुणे – ज्ञानोबा तुकाराम महाराज पालखी सोहळ्याकरिता श्री क्षेत्र देहू आळंदी येथे भक्तिभावाने दाखल होत असलेल्या लाखो वारकरी आणि नागरिकांच्या सोयीसाठी राज्य सरकारतर्फे सुमारे एक हजार कोटी रुपयांची विकास कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
श्रीक्षेत्र देहू आळंदी भंडारा डोंगर विकास आराखड्याअंतर्गत स्थानिक प्रशासन आणि विविध विभागांच्या सहकार्याने सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे विकास कामे पूर्णत्वास नेण्यात आली आहेत. स्वच्छ वारी सुरक्षित वारी आणि आनंददायी वारी, या त्रिसूत्रीच्या जोरावर भाविकांसाठी सुविधा विकसित करण्यात आले आहेत.
सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे पूर्ण करण्यात आलेला विकास कामांमध्ये प्रामुख्याने रस्त्यांचे रुंदीकरण, फूटपाथ निर्मिती, बाह्यवळण मार्ग, पार्किंग सुविधा, सुलभ शौचालय आणि पालखीतळ सुविधा विकास आदींचा समावेश आहे.
देहू आळंदीत दाखल होणारे लाखो वारकरी आणि भाविकांना सुलभ व सुरक्षितपणे दर्शन घेता यावे, यासाठी ही विविध विकास कामे उपयुक्त ठरणार आहेत, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
एक हजार कोटींची विकासकामे
श्रीक्षेत्र देहू आळंदी आणि भंडारा डोंगर परिसरात एक हजार कोटींची विकास कामे पूर्णत्वास गेली आहेत. त्यामध्ये देहूत ३२, आळंदीमध्ये ३४ आणि भंडारा डोंगर व सदुंबरे परिसरात प्रत्येकी सहा विकास कामांचा समावेश आहे.
देहू विकास आराखड्यामध्ये सुमारे १८० कोटी रुपयांची विकासकामे करण्यात आली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने मुख्य घाटाचे पुनर्निर्माण, गाथा मंदिर परिसर आणि घाटाचे पुनर्निर्माण, भक्तनिवास आणि वैकुंठ गमन मंदिर परिसराचा पुनर्विकास, रस्त्यांचे रुंदीकरण आणि प्रशस्त फूटपाथ, गावांमधील रस्त्यांवरील वाहनांची कमी करून भक्तांसाठी सुरक्षित पायी चालण्याची सुविधा, त्यासाठी प्रशस्त बाह्यवळण मार्ग, सुलभ शौचालय आणि आरोग्य सुविधा केंद्रे आणि सांडपाणी प्रक्रिया व्यवस्थापन प्रकल्प आदींचा समावेश आहे. ग्रामपंचायत स्तरावर विकसित करण्यात आलेला हा पहिलाच सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प ठरणार आहे.
या सर्व विकास कामांमुळे देहू भाविकांना अतिशय आल्हाददायक अनुभव येत आहे, अशी प्रतिक्रिया देहूत दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी व्यक्त केली.
आळंदी मध्ये २०० कोटी रुपयांची विकासकामे
आळंदी परिसरात देखील २०० कोटी रुपयांची विकास कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
माऊलींच्या दर्शन स्थळ भवतालचा अतिक्रमणांचा विळखा दूर करण्यात आला असून त्या ठिकाणी रुंदीकरण व प्रशस्त फुटपाथ विकसित करण्यात आले आहेत. सिद्धबेट परिसराचे देखील सुशोभीकरण करण्यात आले असून तेथे नदीकिनारी सुंदर वॉकिंग ट्रॅक निर्माण करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे जड वाहने बाह्यवळण मार्गाच्या माध्यमातून वळविण्यात आल्याने गावातील वाहतुकीचा ताण कमी झाला आहे. परिणामी भाविकांना अतिशय सुलभ व सुरक्षितपणे येणे शक्य झाले आहे. आळंदी गावाच्या दोन्ही बाजूला पूल बांधून वाहतूक वळवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे प्रशस्त पार्किंग तळाची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आळंदी परिसराला पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी विशेष प्रकल्प उभारण्यात आला असून तो लवकरच कार्यान्वित होईल.
या सर्व विकास कामांच्या माध्यमातून श्रीक्षेत्र देहू, आळंदी आणि भंडारा परिसरामध्ये वारीचे नियोजन करणे अतिशय सुलभ होणार आहे.
पुण्याकडून देहू आळंदी परिसरात जुन्या मुंबई-पुणे मार्गावरून देखील वाहतूक करण्याची सुलभ सोय झाली आहे. या मार्गावरील रस्त्यांचे रुंदीकरण व पुनर्निर्माण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे विश्रांतवाडी भागातून देखील आठ पदरी प्रशस्त मार्गाद्वारे आळंदी-देहू परिसरात जाणे अतिशय सुलभ झाले आहे.
भाविकांच्या सोयी-सुविधा आणि सुरक्षेला प्राधान्य- चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री
श्रीक्षेत्र देहू आळंदी भंडारा परिसर विकास प्रकल्पांतर्गत योजना पूर्णत्वास नेत असताना भाविकांना सोयी सुविधा मिळणे त्यांना सुलभ दर्शन होणे आणि मुख्य म्हणजे त्यांची सुरक्षा याला प्राधान्य देण्यात आले आहे. काही विकास प्रकल्पांमध्ये भूसंपादन संदर्भातील तांत्रिक समस्या निर्माण झाल्या आहेत. मात्र त्या लवकरात लवकर सोडवून संपूर्ण विकास प्रकल्प पूर्ण होईल असा विश्वास आहे