पुणे : डॉक्टर पेशंटच्या किंवा पेशंट डॉक्टरच्या जातीचा विचार करत नाही. मात्र, शिक्षणात जात पहिली जाते. आरक्षण म्हणजे जातीचा लढा नाही, तर दुर्बल घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे आरक्षणापेक्षा गुणवत्तेला अधिक महत्व दिले गेले पाहिजे. राजकीय मंडळींनी हा प्रश्न सामाजिक, बौद्धिक नेतृत्वाकडे दिला पाहिजे,” असे मत ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. भास्करराव आव्हाड यांनी व्यक्त केले.
भोसरी येथील प्रितम-प्रकाश महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन व प्रकाश पगारिया व्याख्यानमालेत बोलत होते. ‘संविधानिक आरक्षण व विद्यमान आरक्षण समस्या’ या विषयावर आव्हाड यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जेष्ठ शिक्षणतज्ञ हरिश्चंद्र गडसिंग, डॉ. अशोककुमार पगारिया, प्रकाश रोकडे, प्रकाश जवळकर, जे.पी देसाई प्रितम प्रकाश महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक शिंदे, कैलास रोकडे, प्रशांत गादीया, विनायक वाळके, रावसाहेब नागरगोजे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी डॉ. अशोककुमार पगारिया यांची शंकर आथरे यांनी प्रकट मुलाखत घेतली.
ऍड. भास्करराव आव्हाड म्हणाले, “आज स्त्रियांना आरक्षण आहे. पण वास्तवात परिस्थिती वेगळी आहे. काही भागात स्त्री केवळ नामधारी असून, सगळा व्यवहार पुरुष हाकतो. त्यामुळे स्त्रियांना निर्णय प्रक्रियेत आणावे लागेल. न्यायालयीन निकषांमध्ये एकदा एक जात किंवा संवर्ग मागासलेला म्हटले की तो कायम मागासलेलाच धरला जावा, हे योग्य नाही. सामाजिक, आर्थिक परिस्थितीवर मागासलेपण अवलंबून आहे. त्यामुळे वास्तव लक्षात घेऊन संविधानिक बदल करावे लागतील.”
डॉ. अशोककुमार पगारिया म्हणाले, “दहावीपर्यंत मराठीतुन शिक्षण झाल्याने इंग्रजी माध्यमातून शिक्षण कठीण गेले. गरिबीची परिस्थिती होती. पण जिद्दीने प्रयत्न केले आणि उभा राहिलो. बंधुता परिवाराने अनेक व्यक्तीशी नाते जोडले. विचारांची मेजवानी मिळत गेली आणि यशाच्या दिशेने वाटचाल होत गेली. आपल्या ध्येयाशी प्रामाणिक राहून कष्ट, सातत्य ठेवले की यश हमखास मिळते.”
यावेळी नवजीवन शिक्षण संस्थेचे रामचंद्र गायकवाड विद्यालय दिघी आणि भैरवनाथ विद्यालय भोसरी यांना ‘शामची आई संस्था पुरस्कार’ देऊन सन्मानित काण्यात आले. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना भुमीपुत्र पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.