हरी ईश्वरन म्हणाले, “या क्षेत्रात प्रात्यक्षिक ज्ञान घेण्याची खूप गरज आहे. शिकतानाच प्रत्यक्ष कामाचा अनुभव असेल, तर नोकरी करताना विद्यार्थ्यांना त्याचा जास्त फायदा होतो. आज उद्योगांना मोठ्या प्रमाणात कुशल अभियंत्यांची गरज आहे. त्यामुळे अभियांत्रिकीची पदवी मिळवण्याबरोबरच आवश्यक कौशल्य आत्मसात करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करावा.”
कुशल अभियंता घडण्यासाठी महाविद्यालयांची स्वायत्ता पूरक
रायसोनी शिक्षण समूहातर्फे आयोजित ‘जीएचआर करिअर कनेक्ट’ एक दिवसीय कार्यशाळेत तज्ज्ञांचे मत
पुणे : अभियांत्रिकी हा रोजगाराभिमुख अभ्यासक्रम आहे. नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी या क्षेत्रात संधी आहेत. आपल्याला अभियंता होण्यामागील उद्देश स्पष्ट असेल आणि मेहनतीची तयारी असेल, तर अभियांत्रिकीला जरूर प्रवेश घ्यावा. अलीकडे अभियांत्रिकी महाविद्यालयांना स्वायत्त दर्जा मिळत आहे. त्यामुळे कौशल्याधारित आणि उद्योग क्षेत्राला आवश्यक मनुष्यबळ निर्मितीला पूरक अभ्यासक्रम तयार करण्यासाठी त्याचा उपयोग होत आहे. कुशल अभियंता घडण्यासाठी महाविद्यालयांची स्वायत्ता महत्वपूर्ण ठरत आहे,” असे मत अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.
वाघोली येथील जी. एच. रायसोनी शिक्षण समूहातर्फे इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांकरिता ‘जीएचआर करिअर कनेक्ट’ मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कॅम्प परिसरातील नेहरू मेमोरीयल हॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमात योग्य अभ्यासक्रम निवड, प्रवेश प्रक्रिया, करिअरच्या संधी आदी गोष्टींविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. बी. आहुजा, आयआयटी, नागपूरचे संचालक डॉ. ओ. जी. काकडे, व्हीएनआयटी नागपूरचे संचालक डॉ. पी. एम. पडोळे, तंत्र शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. डी. आर. नंदनवार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विभागप्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर, एल अँड टीचे हरी ईश्वरन अय्यर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे विश्वस्त संचालक अजित टाटिया, संचालक श्रेयस रायसोनी, प्राचार्य डॉ. आर. डी. खराडकर, संचालक डॉ. के. के. पालीवाल यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. बी. बी. आहुजा म्हणाले, “अभियांत्रिकी हा आव्हानात्मक अभ्यासक्रम आहे. आयुष्यात प्रत्येक वळणावर आव्हाने येतात. त्याचा सामना करूनच पुढे गेले, तर आयुष्य चांगले घडते आणि सतत नवनव्या गोष्टी शिकता येतात. गणित आणि विज्ञान याचा सुंदर मिलाफ असलेले अभियांत्रिकीचे शिक्षण तुम्हाला चांगल्या रीतीने घडवते. आपली आवड आणि क्षमता ओळखून करिअर निवडावे.”
डॉ. पी. एम. पडोळे म्हणाले, “अभियांत्रिकीमध्ये प्रत्येक शाखा महत्त्वाची असते. त्यातील सगळ्याच शाखा एकमेकांना जोडणाऱ्या आहेत. तंत्रज्ञानाचा युगात आपण आंतरशाखीय ज्ञान आत्मसात करण्यावर भर दिला पाहिजे. अभियांत्रिकीविषयी आवड आणि चौकटीबाहेरचा विचार करण्याची क्षमता असेल, तर तुम्हाला एक चांगला अभियंता बनता येईल.”
डॉ. आदित्य अभ्यंकर म्हणाले, “चांगला अभियंता होण्यासाठी पॅशन, डिफरन्ट, कॅरेक्ट्रीक्स, फ्यूचरिस्टिक आणि रिसर्च या पाच गोष्टी अंमलात आणाव्यात. प्रत्येकाला ‘का’ आणि ‘कसे’ हा प्रश्न पडला पाहिजे. या प्रश्नांचा सतत वेध घेत राहणे तुम्हाला चांगला अभियंता असल्याचे प्रशस्तिपत्रक देतो.” मिलिंद खानापूरकर व कौशल खत्री यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. आर.डी. खराडकर यांनी आभार मानले.