पुणे- आगामी लोकसभेचे पडघम आता चांगलेच वाजू लागले असून पुणे लोकसभा मतदार संघात भाजपच्या कोणत्या नेत्याचे पारडे जड ठरणार? या प्रश्नावर आता खल होतो आहे . भाजपच्या वतीने सर्वात अगोदर रणांगणात उडी घेतली आहे ते राज्यसभेचे सदस्य आणि भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी . पण उमेदवारी खेचण्यात त्यांना यश येणार काय ? पक्षातील निष्ठावंताच्या आव्हानापुढे काकडे बाजी मारू शकतील काय ? अशा प्रश्नांवर भाजपमध्ये चर्चा रंगते आहे .
काकडे यांनी इच्छुक म्हणून आपली उमेदवारी जाहीर करून धक्का तंत्र अवलंबले असले तरी त्यांच्या पुढे भाजपचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे आणि पालकमंत्री गिरीश बापट यांचे मोठे आव्हान आहेच . बापट हे सातत्याने ४० वर्षे भाजपमध्ये सक्रीय आहेत .एकनिष्ठ म्हणून त्यांचे नाव घेतले जाते . राजकीय डावपेचात ते माहीर मानले जातात .कसबा विधानसभा मतदार संघातून सातत्याने निवडून आलेले बापट यांच्या वयाकडे आणि शाररीक दृष्ट्या तंदुरुस्तीकडे बोट दाखविले जाते . आणि याच कारणांनी त्यांनी विविध वेळा वादग्रस्त विधाने करून अंतर्गत राजकारणात खळबळ उडवून दिली . मात्र हि सारी विधाने त्यांच्या एकनिष्ठतेपुढे निष्प्रभ ठरतील काय ?हा जसा प्रश्न आहे ,तसाच बापट यांच्या आमदारकीचा आणि प्रामुख्याने पालकमंत्रीपदाच्या कारकिर्दीतल्या कामाचा आढावा घेतला जावू शकेल अशी स्थिती आहे . भाजपची २०१४ च्या निवडणुकीतील देशभरात जी स्थिती होती तीच कायम राहील याची खात्री खुद्द भाजपमध्ये कोणीही देवू शकत नाही . त्यामुळे सावधानता पाळूनच ,कामाचा आढावा ,आणि ताकद आजमावूनच बापट यांच्याबाबत निर्णय घेतला जावू शकेल असे समीक्षकांचे मत आहे . पुणे लोकसभेच्या बाबत जात हा मोठा अडथळा बापटांना ठरेल असेही म्हटले जाते. मूळ कसबा मतदार संघातील अनेक माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते बापटांच्या कार्यकाळावर फारसे समाधानी नाहीत .आणि भाजपचा पारंपारिक मतदार एवढीच बाजू त्यांची जमेची मानली जाते . अशा मतदाराव्यतरिक्त अन्य मतदार भाजपकडे कसा खेचला जाईल यासाठी त्यांनी कधी प्रयत्न केला नसल्याचा त्यांच्यावर आरोप होतो. आणि आपल्या कसबा मतदारसंघातील मतदारांच्या, आणि पुणेकरांच्या स्मरणात राहील असा कोणताही भक्कम निर्णय ,भरीव कामगिरी त्यांनी केलेली नसल्याचे सांगितले जाते .
भाजपचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे हे देखील पक्षातील निष्ठावंत म्हणून सर्वपरिचित आहेत .लोकसभेतील त्यांची उपस्थिती पक्षाच्या दृष्टीने अत्यंत समाधानकारक मानली जाते .नागरिकांचे काम करोत अथवा ना करोत ,पण त्यांनी कोणालाही त्रासदायक ठरतील असे वर्तन किंवा निर्णय कधी घेतलेले दिसत नाहीत. एकंदरीत सोज्वळ स्वभाव आणि मराठा कार्ड या देखील त्यांच्या जमेच्या बाजू मानल्या जातात . पण आपल्या खासदारकीच्या काळात पुणे शहरात ,मतदार संघात ते सलगपणे सक्रीय राहू शकलेले नाहीत, आणि कोणतीही भरीव कामगिरी,लक्षणीय कौशल्य ते दाखवू शकलेले नाहीत हि वास्तवता आहे .त्यामुळे निव्वळ नामधारी खासदार म्हणून वावरल्याचा त्यांच्यावर आरोप होतो .खुद्द मराठा आणि बहुजन समाजासह पुणेकर आणि पक्षातील गटातटाच्या राजकारणात त्यांच्यावर नाराजी असलेला मोठा वर्ग आहे .
संजय काकडे यांचा तर भाजपचे सहयोगी खासदार म्हणूनच सातत्याने माध्यमातून उल्लेख होतो .ते राजकारणात सक्रीय असले तरी या दोन्ही प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत राजकारणात अगदीच नवीन आहेत .राज्यसभेतील अनुपस्थिती ,चंचल आणि तापट स्वभाव , परिणामांची पर्वा न करता, भीडभाड न बाळगता ताडकीफाड वक्तव्य करणे याची दखल घेतली गेलेली आहे . पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नजीकचे म्हणून त्यांचा गवगवा आहे. त्यांच्यावर सोपविलेले काम ते यशस्वीपणे पार पाडतात असाही त्यांचा लौकिक आहे. भाजपच्या पारंपारिक मतदारांसह अन्य मतदार त्यांच्या माध्यमातून पक्षाला लाभेल काय ? या प्रश्नाकडे उमेदवारी देताना विचार होऊ शकेल असे काहींचे म्हणणे आहे . पुणे महापालिकेच्या निवडणूक काळात आणि नंतरही त्यांनी शहर आणि परिसरात आपल्या कार्यकर्त्यांचे जाळे तयार करण्यासाठी मेहनत घेतली आहे .निव्वळ मराठा च नाही तर बहुजन वर्ग आणि त्यांचे म्होरके काकडे यांनी आपलेसे करून घेतलेले वेळोवेळी दिसले आहे .भाजपचा पारंपारिक मतदार आणि पारंपारिक नसलेला मतदार अशी गोळा बेरीज ते करू शकतील काय ?या प्रश्नावर खल होईल असे अनेकांना वाटते आहे .
एकूणच बापट, शिरोळे आणि काकडे यांच्या ‘उमेदवारी मिळविण्याच्या स्पर्धेत ‘ कोण बाजी मारेल हे मात्र समजायला उशीर असला तरी यावर कार्यकर्ते मात्र चर्चेला रंग भरत आहेत .दरम्यान भाजपचे पुणे शहराध्यक्ष योगेश गोगावले हे देखील स्पर्धेत उतरलेले आहेत .मात्र या निवडणुका घोषित होण्यापूर्वीच त्यांच्यावर अन्य जबाबदारी सोपवून अध्यक्ष बदलाच्या वावड्या ही उठू पाहत आहेत .आगामी निवडणुक जिंकण्यासाठी निष्ठा आणि त्याबरोबर साम ,दाम, दंड ,भेद ,कौशल्य अशा अनेक पातळ्यांवर विचारमंथन ,नेत्यांऐवजी कार्यकर्त्यांमधूनच सुरु झाले आहे .हीच भाजपची जमेची बाजू मानली जाते . मात्र कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जोश हा अंतिम टप्प्यापर्यंत सातत्याने राखून ठेवणे हि जबाबदारी अर्थातच नेत्यानंच पार पाडावी लागणार आहे .