पुणे-
महाराष्ट्रातील ऐतिहासिक विधानसभा निवडणुकीचे मतदान सायंकाळी 6 वाजता संपले आहे. राज्यात साधारण साठ टक्के मतदान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी चकमक झाली असून उर्वरित महाराष्ट्रात किरकोळ घटना वगळता शांततेत मतदान पार पडले.
पुणे शहर व जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात आज शांततेत मतदान पार पडले. पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघातील एकूण ६४.०२ टक्के मतदान झाले आहे.सांगलीत अंदाजे 70 टक्के, साता-यात 65 टक्के, कोल्हापूरात 70 टक्के, तर सोलापूरात 65 टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चुरशीच्या लढतींमुळे उच्चांकी मतदानाची नोंद झाली, तर पुणे व पिंपरी चिंचवडमधील अकरा मतदारसंघांत लोकसभा निवडणुकीच्या वेळी झालेल्या मतदानाच्या आसपास मतदान झाले. इंदापूरमध्ये सर्वाधिक 79 टक्के, तर पुणे शहरामध्ये कसबापेठेत 68 टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील 21 मतदारसंघांमध्ये 61 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी बुधवारी मतदान झाल्यानंतर व्यक्त केला होता.
पुणे शहरात पंचरंगी लढती होत असताना, मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात काही ठिकाणी त्याचे रूपांतर तिरंगी लढतीत झाले होते. ग्रामीण भागात चुरशीच्या लढती आणि गावपातळीवरील सक्रिय कार्यकर्त्यांमुळे मतदानाची टक्केवारी वाढली. सर्व मतदारसंघांत 70 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले. ग्रामीण भागातील मतदारसंघात गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानामध्ये सरासरी पाच टक्क्यांनी, तर लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे.