मुंबई-जनतेने मतदानासाठी घराबाहेर पडावे असे आवाहन करतानाच जर आपण मतदान केले नाही आणि फक्त समस्यांचा पाढाच वाचत राहिलो तर आपणच मूर्ख ठरु, असे मत ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी व्यक्त केले. मी निष्ठावान आणि प्रामाणिक माणसाला मतदान केले, असेही त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यात देशभरातील ७१ जागांवर मतदान होत आहे. यात राज्यातील १७ जागांचा समावेश आहे. सोमवारी सकाळी अभिनेते परेश रावल आणि त्यांची पत्नी स्वरुप संपत यांनी विलेपार्ले येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर परेश रावल यांनी मतदारांना प्रतिक्रिया दिली. परेश रावल म्हणाले, जनतेने मतदानासाठी घराबाहेर पडावे असे आवाहन करतानाच जर आपण मतदान केले नाही आणि फक्त समस्यांचा पाढाच वाचत राहिलो तर आपणच मूर्ख ठरु. मी निष्ठावान आणि प्रामाणिक माणसाला मतदान केले, असे त्यांनी सांगितले.
परेश रावल यांनी २०१४ मध्ये भाजपाच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. ते खासदार म्हणून निवडून देखील आले होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत परेश रावल यांनी निवडणूक लढवणार नाही, अशी भूमिका घेतली. यावरुन विरोधकांनी परेश रावल यांच्यावर प्रश्नांचा भडीमारही केला होता. मात्र, यासंदर्भात सोमवारी पत्रकारांनी प्रश्न विचारले असता परेश रावल यांनी उत्तर देण्यास नकार दिला.
“तू चाल पुढं तुला र गड्या भीती कोणाची तुला परवा बी कोणाची”
–उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी वांद्रे येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला असून मतदानानंतर प्रतिक्रिया देताना उर्मिला मातोंडकर यांनी “तू चाल पुढं तुला र गड्या भीती कोणाची तुला परवा बी कोणाची”, असे सांगत भावना व्यक्त केल्या.
उत्तर मुंबईत काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर आणि भाजपाचे गोपाळ शेट्टी यांच्यात लढत आहे. सोमवारी उर्मिला मातोंडकर यांनी वांद्रे येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. दरवेळी मी दुसऱ्यांसाठी मतदान करायचे. यंदा स्वत:साठी करतेय. त्यामुळे जबाबदारी वाढली आहे असे उर्मिला यांनी सांगितले. तू चाल पुढं तुला र गड्या भीती कोणाच परवा कोणाची, असे सांगत त्यांनी मतदारांनाही मतदान करण्याचे आवाहन केले. मतदारांनी मतदानासाठी घराबाहेर पडावे आणि आवर्जून मतदान करावे, आधी मतदान करा, मग सुट्टीचा आनंद घ्या, असे त्यांनी सांगितले.
जे मतदान करत नाही ते देशाचे गुन्हेगार-मनोहर जोशी
–शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी देखील मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे असे आवाहन केले आहे. जे मतदान करत नाही ते देशाचे गुन्हेगार असतात, असे मनोहर जोशी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राज्यात आतापर्यंत तीन टप्प्यांमध्ये ३१ मतदारसंघांमध्ये मतदान शांततेत पार पडले. शेवटच्या टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आहे. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांसह ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, मावळ, नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, शिरूर आणि शिर्डी अशा १७ मतदारसंघांत मतदान होणार आहे. त्यासाठी निवडणुकीत ३३ हजार ३१४ मतदान केंद्रे आहेत. एकूण एक कोटी ६६ लाख ३१ हजार पुरुष तर एक कोटी ४५ लाख ५९ हजार महिला मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, मुंबई उत्तर मतदारसंघात सर्वाधिक ३३२ तृतीयपंथी मतदार आहेत. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी तब्बल एक लाख ६६ हजार अधिकारी- कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.