पुणे-महापालिकेतील महापौर मुक्ता टिळक ,स्थायी समिती अध्यक्ष सुनिल कांबळे ,कॉंग्रेसचे गटनेते अरविंदशिंदे आणि नुकतेच विरोधीपक्षनेते पदाचा भार सोडलेले आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष पदावर विराजमान झालेले चेतन तुपे ,मनसेचे गटनेते वसंत मोरे आणि काही नगरसेवक विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात नशीब आजमवण्यासाठी उतरले आहेत. त्यांच्या जोडीला अन्य प्रमुख पक्षांचे शहराध्यक्ष निवडणुकीत उतरले असून महापालिकेच्या कारकीर्दीवरच या साऱ्या शिलेदारांचे भवितव्य अवलंबून राहील असे म्हणता यायला हवे .या शिवाय राज्य शासनाने या शहराच्या सुव्यवस्थेचा मुद्दा कसा हाताळला हि बाब हि ध्यानात घेतली जाण्याची शक्यता आहेच . देशात काश्मीरचा समावेश नेमका कधी झाला ,पुलवामा हल्ला कसा झाला .. या अशा राष्ट्रीय मुद्द्यांना या निवडणुकीत स्थान मिळण्याऐवजी आपल्या कुटुंबाची आणि विशेषतः शहराची अवस्था यावर आता मतदान होईल असे वाटते आहे .
म्हणतात ना, घर भक्कम तर गाव भक्कम ,गाव भक्कम ,तर शहर आणि शहर तर राज्य आणि राज्य भक्कम तर देश भक्कम … सुरुवात आपल्या घरापासून होते . त्यामुळे आपले कुटुंब त्यात येणाऱ्या अडचणी ,आपले शहर तिथे असलेल्या सोयी सुविधा या गोष्टीवर मतदानाचा आता भर राहील असे वाटते आहे. आणि या सर्व गोष्टी महापालिकेच्या कारभाराशी प्रथमतः निगडीत केल्या जावू शकतात .स्मार्ट सिटी च्या नावाखाली एकीकडे पारितोषिके घेत मार्केटिंग चा फंडा तर राबविला पण म्हणतात ना हातच्या कंकणाला आरसा कशाला त्याप्रमाणे शहरा ची बकाल अवस्था लपून राहू शकली नाही . या पावसाळ्यात आपल्या शहराला क्षणार्धात होत्याचे नव्हते करणारा कारभार पालिकेने कसा हाकलेला आहे ते दाखवून दिलेले आहेच .दुसरीकडे महापालिकेने अधिकृत नौकर भरती टाळून बेरोजगार तरुणांची चालविलेली ठेकेदार पद्धतीवरील पिळवणूक आणि फसवणूक ,निसर्गाने जलसंपदा मुबलक उपलब्ध करून दिलेली असताना वर्षानुवर्षे कारभार हाकणारी महापालिका त्यावर सातत्याने फेल होत असल्याचे वास्तव .राजकरणी आणि बिल्डर ,आणि प्रशासन अशा त्रिकुटाने पुण्यातील निसर्गावर केलेल्या वर्षानुवर्षे अतिक्रमणाने काय उपद्रव होवू शकतो हे या पावसाळ्याने दाखवून दिलेले आहेच . रस्त्यावर वाहतुकीला विनाकरण पोलिसी यंत्रणेकडून ,आणि पालिकेच्या कारभाराने येणारे अडथळे आता बोचू लागले आहेत .
भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या चारही प्रमुख पक्षांनी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. सत्ताधारी भाजपचे पालिकेतील तीन आणि शहर स्तरावरील आणखी एक असे चार प्रमुख पदाधिकारी निवडणूक लढविणार आहेत. महापौर मुक्ता टिळक आणि कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे,शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे कसबा पेठेतून, स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे पुणे कँटोन्मेंटमधून; चेतन तुपे ,वसंत मोरे हडपसर मधून लढत आहेत . त्यांच्यासह ‘राष्ट्रवादी’चे सचिन दोडके, सुनील टिंगरे हे आणखी तीन नगरसेवक महापालिकेतून विधिमंडळात जाण्याचे स्वप्न घेऊन निवडणूक लढविण्यासाठी रिंगणात उतरले आहेत.या सर्व पार्श्वभूमीवर पुणे शहराचे स्वरूप आणि ते सुव्यवस्थित राखण्यासाठी महापालिकेने राबविलेला कारभार हाच मुद्दा या निवडणुकीत महत्वाचा मानला गेला पाहिजे असे अनेकांना वाटते आहे . ‘आम्ही सारे भाऊ मिळून मिसळून खावू खाऊ’हि अँटीचेम्बर मधील कार्यपद्धती ठेवणाऱ्यांच्या आणि अँटीचेम्बर बाहेरील सार्वजनिक जीवनात रंगमंच बनवून त्यावर एकमेकांचे विरोधक असल्याचा आभासी अभिनय करणाऱ्या नेत्यांच्या अभिनयाला मतदार निश्चित आता भुलणार नाही असे म्हणता येणार आहे