पुणे-आगामी विधानसभा शिवसेनेसोबत एकत्र लढत असलो, तरी प्रत्येक नागरिकाला पक्षासोबत जोडायचे आहे. विधानसभेत २२० पेक्षा अधिक जिंकण्याचे लक्ष पूर्ण करायचे आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.
भाजपच्या सदस्यता नोंदणी अभियानाचा शुभारंभ श्री. दानवे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करीत होते. खासदार गिरीश बापट, शहराध्यक्ष योगेश गोगावले, महापौर मुक्ता टिळक, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार माधुरी मिसाळ, भिमराव तापकीर, मेधा कुलकर्णी, जगदीश मुळीक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, प्रदेश चिटणीस धीरज घाटे, सरचिटणीस मुरली मोहोळ, दीपक मिसाळ, उज्ज्वल केसकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘कॉंग्रेसने देशात अस्थिरतेचे वातावरण निर्माण केले होते. आपल्याला पर्यायच नाही असे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. परंतु सध्याची कॉंग्रेसची अवस्था वाईट झाली आहे. लोकसभा निवडणुकीत या पक्षाने रणांगण सोडल्यासारखी स्थिती आहे. त्यांच्याकडे कोणी अध्यक्ष राहीला नाही. अध्यक्षपद घ्यायला कोणी तयार होत नाही.’ अशी टीका ही श्री. दानवे यांनी केली.
श्री. गोगावले यांनी प्रास्ताविक केले. खासदार गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक यांची भाषणे झाली. मुरली मोहोळ यांनी सूत्रसंचालन केले.