पुणे-प्रेम हाच जीवनातील महामंत्र आहे. गायत्री, णमोकार यांसारख्या महामंत्रामधून जर प्रेम काढून टाकले, तर त्या मंत्रांचे महात्म्य कमी होते. हे प्रेम वासनाविरहित, मोहरहित असावे. एकत्र भोजन केल्याने कुटुंबातील प्रेम वाढते आणि समाजात प्रेम टिकवायचे असेल तर सामुहिक भजन करावे. घरात प्रेम टिकवायचे असेल तर गुरूंचा आदर, वाणीत सभ्यता आणि कुटुबीयांमध्ये प्रेम असावे, असा गुरूमंत्र मुनिश्री प.पु.108 पुलकसागर महाराज यांनी शनिवारी दिला. तसेच ज्या घरात या तिन्ही गोष्टी असतात, त्या घरात लक्ष्मीचा वास असतो. हल्ली माणसांपेक्षा जास्त प्रेम जनावरांवर केले जाते. प्राण्यांवर प्रेम केलेच पाहिजे, पण ते करताना मनुष्याबाबत तिरस्कार करू नये. बहुतांश लोक मी का आधी बोलू? या विचाराने आपण आपली भांडणे संपविण्याचा प्रयत्न करत नाही. जग अतिशय सुंदर आहे, थोडेसे प्रयत्न केले तर वर्षांपासून चालत असलेले तंटे पण लगेच संपुष्टात येतात. मात्र हे प्रयत्न प्रेमपूर्वत असावेत, असेही मुनिश्री यांनी सांगितले.
सकल जैन वर्षा योग समितीतर्फे धर्मानुरागी रसिकलाल एम. धारिवाल नगरी, महालक्ष्मी लॉन्स येथे मुनिश्रींच्या चातुर्मासाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त आयोजित ज्ञानगंगा महोत्सवात मुनिश्रींचे प्रवचन होते. प्रवचनाचे सातवे पुष्प गुंफताना ‘प्रेम’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी समितीच्या अध्यक्षा शोभा धारिवाल, कार्याध्यक्ष मिलिंद फडे, ऍस्पायर नॉलेज अॅन्ड स्किल्स् प्रा.लि.चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय गांधी, पुढारी वृत्तपत्राचे बिझनेस संपादक अनिल टाकळकर, समितीच्या उपाध्यक्षा सुजाता शहा, अजित पाटील, विरकुमार शहा हे मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवातीस सुरगुंडा पाटील आणि परिवार यांच्या हस्ते कलशस्थापना करण्यात आली. यानंतर ज्योती दोशी आणि परिवारातर्फे मुनिश्रींचे पादप्रक्षालन करण्यात आले. यावेळी गंधारी कोठाडिया व आनंदी शाह यांनी मुनिश्रींना शास्त्र भेट दिली. पुण्याच्या हिया मेहता या मुलीने ’आई’ वरील गाणे सादर केले तसेच बारामती येथील भक्ती ग्रुपच्या कलाकारांनी मंगलाचरण सादर केले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी ऍस्पायर नॉलेज अॅन्ड स्किल्स् प्रा.लि.चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय गांधी यांनी उपस्थितांना कौशल्य विकासाचे महत्व याबाबत मार्गदर्शन केले. आपल्याकडे रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. मात्र त्यासाठी आवश्यक कौशल्य आपण आत्मसात केले पाहिजे. यामध्ये परकीय भाषेचा विशेषत: पुण्यामध्ये जपानी भाषेचा समावेश होतो. पुणे शहराचा आसपास सुमारे 112 जापनीज कंपन्या आहेत. याठिकाणी रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. जर तुम्ही जपानी भाषा शिकल्यास याठिकाणी काम करण्याची संधी तुम्हाला मिळू शकेल. याबाबत तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या संस्थेचे प्रतिनिधी याठिकाणी उपलब्ध आहेत त्याचा तुम्ही लाभ घ्यावा” असे गांधी यांनी सांगितले.
पुढारी वृत्तपत्राचे बिझनेस संपादक अनिल टाकळकर म्हणाले, माझी सून जैन समुदायातील असून ती समाजातील परंपरा अतिशय भक्तीभावाने निभावते. तिच्या माध्यमातून जैन समाजाशी जुडता आले. मी अध्यात्माचा खूप मोठा अभ्यासक नाही. परंतु आज जर अध्यात्म तुमच्या सोबत नसेल तर तुमच्या आयुष्यातील गोंधळ वाढतो. मुनिश्रींसारखे अध्यात्मिक मार्गदर्शक तुमच्या सोबत असतील तर हा गोंधळ कमी होण्यास मदत मिळते. चातुर्मासानिमित्त मुनिश्रींचे विचार ऐकायला मिळण्याचे भाग्य पुणेकरांना मिळत आहे, ही अतिशय आनंदाची बाब आहे.
रविवारी दि. 19 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 वाजता ‘बेटी बचाव’ विषयावर मुनिश्रींचे प्रवचन होईल. तसेच दुपारी 3 वाजता ‘भक्तंबर स्तोत्राची महती’ या विषयावर सुजाता फुलफगर यांचे मार्गदर्शन करणारे व्याख्यान होईल. हा ज्ञानगंगा महोत्सव तीन सप्टेंबरपर्यंत दररोज सकाळी 8.30 ते 10 यावेळेत धर्मानुरागी रसिकलाल एम. धारिवाल नगरी, महालक्ष्मी लॉन्स येथे होणार आहे.
मुनिश्रींच्या चातुर्मासानिमित्त रसिकलाल एम. धारिवाल फाउंडेशनतर्फे 3 सप्टेंबरपर्यंत रक्तदान महायज्ञ आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी सर्व सुविधांनी परिपूर्ण अशी मोठी धारिवाल फाउंडेशनची बसही येथे उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच महिलांसाठी हाडांची ठिसूळता तपासणीसोबतच कॅन्सर डिटेक्शन चाचणीची सोय देखील येथे उपलब्ध करून देण्यात आली. गेल्या 3 दिवसात एकून 550 स्त्री-पुरूषांनी हाडाच्या ठिसूळपणाची तपासणी करून घेतली. तसेच आज महिलांच्या कॅन्सर निदान तपासणी शिबीरात 102 महिलांनी सहभाग घेतला. दि. 19 रोजी देखील हे महिलांसाठी कॅन्सर निदान तपासणी शिबीर संपन्न होणार आहे.