पुणे -पुणे फेस्टिव्हल अंतर्गत आज दि. ३ सप्टेंबर रोजी ६.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे ‘रामायण बॅले’ हा कार्यक्रम सादर झाला. डॉ. शशिकला रवी आणि त्यांचे विद्यार्थी यांनी भरतनाट्यम् बॅलेच्या माध्यमातून प्रभू रामाची कथा ‘रामायण’ सादर केली. याची संकल्पना आणि नृत्यदिग्दर्शन डॉ शशिकला रवी यांची होती. या सादरीकरणासाठी महाराजा स्वाती तिरुनाल यांची रचना ‘भावयामी रघुराम’ जी रागमालिका आणि रूपक तालामध्ये होती. ही गाणी संस्कृतमध्ये होती आणि समजण्यास सुलभ होती.
रामायणातील विविध प्रसंग, जसे राक्षकांचा विनाश करण्यासाठी विश्वामित्र अयोध्येस येऊन प्रभू रामास निमंत्रण देतात, सीतेचे स्वयंवर, श्रीरामाचा वनवास, भरत यांची चित्रकूटात भेट, पंचवटीतील शुर्पणखेशी सामना, रावणाकडून सीतेचे अपहरण, श्रीरामांची हनुमान व सुग्रीवाशी मैत्री, वालीची हत्या, समुद्रावर पूल बांधणे, रावणाचा मृत्यू, सीतेची अग्नी परिक्षा आणि श्रीरामाचा पट्टाभिषेक हे प्रसंग सादर केले गेले.
संगीतकार होते – एन.एन. शिवप्रसाद, मृदंगम – एस शंकरनारायणन, व्हायोलिन – अनंतरमन रवी, आणि नट्टुवंगम – कार्तिका प्रसाद यांनी साथ संगत केली. डॉ.शशिकला रवी यांच्यासमवेत कार्तिका प्रसाद, रिया थॉमस, दक्षता जोशी, अनु मेनन आणि दक्षा पाठक यांनी नृत्याविष्कार सादर केले. या कार्यक्रमास प्रेक्षकांनी मोठा प्रतीसाद दिला.
याप्रसंगी पुणे फेस्टिव्हलतर्फे सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रमुख मोहन टिल्लू, उगवते तारे आणि इंद्रधनुचे संयोजक रवींद्र दुर्वे, बालगंधर्व रंगमंदिराचे पुणे फेस्टिव्हलचे समन्वयक श्रीकांत कांबळे आणि रवी चौधरी यांचा हस्ते कलाकारांचे सत्कार करण्यात आले.