पुणे :’ गुरुकुल विश्वपीठ ‘ आयोजित अखिल भारतीय ज्योतिषी संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ कवयित्री , ज्योतिष अभ्यासक प्रतिभाताई शाहू मोडक यांच्या हस्ते झाले.
उद्घाटन कार्यक्रम मौलाना आझाद सभागृह ( कोरेगाव पार्क ) येथे सकाळी साडेदहा वाजता झाला.
संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ . अजयचंद्र भागवत (गुरुजी ), राजकीय ज्योतिष अभ्यासक सिध्देश्वर मारटकर, विजय जकातदार, चंद्रकांत शेवाळे , डॉ.मधूसुदन घाणेकर , पल्लवी भागवत उपस्थित होते.
संमेलनात उद्घाटन सत्राच्या उद्घाटक प्रतिभा शाहू मोडक होत्या . अध्यक्षस्थानावरुन बोलताना सिद्धेश्वर मारटकर यांनी २०१९ च्या निवडणुकीवर ज्योतिष अंगाने प्रकाश टाकला.
मारटकर म्हणाले, ‘पाच राज्यातील निवडणुका सत्ताधारी पक्षाला जड जातील. राजस्थानात बदल होईल. छत्तीसगड, मध्य प्रदेश अटीतटीची लढत होईल. तेलंगणमध्ये काँग्रेस लढत देईल, पण तेलंगण राष्ट्र समिती सत्तेवर येईल.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकात सत्ताधारी पक्षाला संघर्ष करावा लागेल. कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणार नाही. भाजपाला सत्ता स्थापनेची पुन्हा संधी असून इतर पक्षांची मदत घ्यावी लागेल.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका लोकसभेबरोबर घेतल्या तर युतीला लाभ मिळेल, मात्र, नंतर घेतल्यास जड जातील.
प्रतिभाताई मोडक म्हणाल्या, ‘ ज्योतिष हे क्रियाशील अध्यात्म आहे. ज्योतिष हे माणसाला हताश करण्यासाठी नाही, तर प्रेरणा देण्यासाठी आहे. काळाच्या उदरात दडलेल्या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न ज्योतिषी करतो. संकट कळाले तरी त्यातून सावरण्याची ताकद अध्यात्मातून मिळते.
नवीन तंत्रज्ञान आणि ज्योतिष , ‘थिंक लॉजिकली, अप्लाय अॅस्ट्रोलॉजीकली’, दैनंदिन जीवनातील अडचणी आणि ज्योतिष, हस्ताक्षर आणि ज्योतिष ,नक्षत्र आणि ज्योतिष ,नवे ग्रह आणि त्यांचा मानवी जीवनावरील प्रभाव अशा अनेक विषयांवर व्याख्यान सत्रे आयोजित करण्यात आली होती.
ज्योतिष क्षेत्रातील व. दा. भट,नंदकिशोर जकातदार, डॉ.मधूसूदन घाणेकर, विजय जकातदार, सुनील मावळे, आरती घाटपांडे , डॉ . श्रीहृदय भागवत, रजनी साबदे इत्यादी मान्यवरानी विविध व्याख्यान सत्रात मार्गदर्शन केले.
सायंकाळी पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, आमदार जगदीश मुळीक यांच्या उपस्थितीत समारोप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.