पुणे- हि निवडणूक बेरोजगार तरुण आणि हताश झालेला शेतकरी आणि एकूणच सर्व वर्गात आलेल्या नैराश्याच्या वातावरणाची असल्याचे प्रतिपादन अभिनेता डॉ अमोल कोल्हे यांनी केले आहे .शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अमोल कोल्हे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य जाहीर केले आहे चौकाराच्या तयारीत असलेल्या आढळराव-पाटील यांची रणनिती डॉ. कोल्हे कशा पद्धतीने भेदणार, ही राजकीय लढाई पाहणे आता उत्सुकतेचे झाले आहे.कोळे हे नुसतेच अभिनेता नाहीत तर उत्तम वक्ते आहेत . छत्रपती शिवाजी राजांच्या भूमिकेतून ते उभ्या महारष्ट्राला परिचित आहेत .
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत शिरूरमधून डॉ. कोल्हे यांना उमेदवारी जाहीर झाली. माजी महापौर ,माजी आमदार विलास लांडे,तसेच देवदत्त निकम, पोपटराव गावडे यांना डावलून ‘राष्ट्रवादी’ने अनुभवी आढळराव-पाटील यांच्या विरोधात अभिनेता असलेल्या उत्साही तरुण उमेदवाराला संधी दिली आहे. त्यामुळे लढत रंगतदार होणार आहे. आढळराव यांना अस्तित्वाची तर कोळे यांनाही प्रतिष्ठेची अशी हि लढत होणार आहे . डॉ. कोल्हे यांनी गेल्याच महिन्यात शिवसेनेतून ‘राष्ट्रवादी’त प्रवेश केला होता. त्याच वेळी त्यांची उमेदवारी निश्चित होती. परंतु, कार्यकर्त्यांच्या मेळाव्याच्या माध्यमातून मते जाणून घेऊन नंतरच ती जाहीर करण्यात आली.
शिवबंधन तोडून हातावर घड्याळ बांधल्यानंतर राजकीय रणांगणात उतरलेले डॉ. कोल्हे ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतून लोकप्रिय आहेत. तर, हॅटट्रीकचे यश संपादन करून आता चौकार लगावण्याच्या तयारीतील आढळराव-पाटील मुरब्बी राजकारणी आहेत. त्यामुळे दोघांमधील लढत रंगतदार ठरणार आहे. आढळराव-पाटील यांनी उमेदवारी शंभर टक्के गृहीत धरली आहे. त्यामुळे त्यांनी प्रचाराला प्रारंभदेखील केला आहे. डॉ. कोल्हे यांनी मात्र प्रचाराचा नारळ फोडलेला नाही. आता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लवकरच मेळाव्याच्या माध्यमातून प्रचाराला प्रारंभ केला जाईल, असे त्यांच्या समर्थकांनी सांगितले.
सेनेकडून मनोमिलनाचे प्रयत्न
सद्यःस्थितीत आंबेगाव वगळता शिरूर, भोसरी आणि हडपसर या तिन्ही विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. खेड शिवसेनेच्या ताब्यात आहे. तर, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघात युतीचे प्राबल्य असताना राष्ट्रवादी काँग्रेस कशी रणनिती आखणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. केंद्रात आणि राज्यात युतीचे सरकार असतानाही शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांवर तोंडसुख घेण्याची संधी दवडली नाही. ते मतभेद विसरून एकदिलाने काम करावे, असे आवाहन करून आढळराव-पाटील यांचे मनोमिलनाचे प्रयत्न चालू आहेत. त्या अनुषंगाने ते भाजप आमदारांच्या भेटीगाठी घेत आहेत.
‘राष्ट्रवादी’कडून प्रश्नांची सरबत्ती
मतदारसंघातील गेल्या १५ वर्षांतील प्रलंबित समस्यांबाबत खासदारांनी काय प्रयत्न केले? यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने प्रश्नांची जंत्री तयार केली आहे. त्याचा वापर निवडणूक प्रचारात केला जाणार आहे. याशिवाय सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील जनभावनेचा लाभ उठविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांकडे जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. याशिवाय माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचाराची रणनिती तयार करण्यात आली आहे. माजी खासदार अशोक मोहोळ, माजी आमदार विलास लांडे, दिलीप मोहिते, पोपटराव गावडे, वल्लभ बेनके यांच्या माध्यमातून एकजुटीचे दर्शन घडविण्याचे मनसुबे आहेत.
लांडे समर्थक नाराज ?
गेल्या काही महिन्यांपासून भोसरीचे माजी आमदार विलास लांडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी तीव्र इच्छुक होते. त्यांनी मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींवर भर दिला होता. विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील विरुद्ध लांडे-पाटील यांच्यातील ‘फ्लेक्सयुद्ध’ चर्चेचा विषय होता. गेल्या दोन दिवसांपासून लांडे यांनी उमेदवारीसाठी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, पक्षश्रेष्ठींनी त्यांच्याऐवजी डॉ. अमोल कोल्हे यांना पसंती देऊन उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे लांडे समर्थक नाराज झाले असल्याचे वृत्त आहे आता नेमके विलास लांडे प्रचारात काय भूमिका घेतात, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.