शिस्त काय हे संघाला बहुजन समाजाने ‘ मोर्च्या ‘द्वारे दाखवून दिले :अजित पवार
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित ‘लक्ष्य 2017’ प्रशिक्षण शिबिर खडकवासला विधानसभा मतदार संघामध्ये
पुणे :
‘ लोकांना विकास हवा आहे ,आणि तो राष्ट्रवादी काँग्रेस देऊ शकते हे जनतेच्या लक्षात आले आहे . मात्र ,कार्यकर्त्यांनी प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन ,राष्ट्रवादी काँग्रेस ने केलेली विकासकामे सांगून ,पालिका निवडणुकीत यश खेचून आणले पाहिजे ‘असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले .
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित ‘लक्ष्य २०१७ ‘ मोहिमेअंतर्गत प्रशिक्षण शिबिरात आज दुसऱ्या सत्रात ते बोलत होते . यावेळी खासदार सुप्रिया सुळे ,खासदार वंदना चव्हाण उपस्थित होत्या . नगरसेवक ,पदाधिकारी ,कार्यकर्ते उपस्थित होते .
सोमवारी हे प्रशिक्षण शिबिर खडकवासला विधानसभा मतदारसंघातील गुलमोहर हॉल, अभिरूची मॉल येथे झाले. आजच्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ‘काश्मीर महिला आयोगा’च्या अध्यक्षा नईमा महजूर यांनी मार्गदर्शन केले.
अजित पवार म्हणाले ,’एलबीटी -जीएसटी मुळे व्यापारी वैतागले आहेत .समाजातील शेतकऱ्यांपासून सर्व घटक वैतागले आहेत . सरकारला उत्पादक आणि ग्राहक यांच्यात समन्वय साधता येत नाही . सरकारचे मंत्री असंवेदनशील वागत आहेत . कार्यकर्त्यांनी या सरकारच्या चुका जनतेच्या निदर्शनास आणाव्यात . घरोघरी -सोसायट्यांमध्ये जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस ने केलेली विकासकामे पोहोचवून यश खेचून आणले पाहिजे . ‘
बीडीपी बद्दल पक्षात वेगवेगळी मते आहेत . पण ,पर्यावरणाचा विचार करून झोपड्या होणार नाहीत असा निर्णय झाला पाहिजे ,असे पक्षाचा आग्रह आहे .तसेच , विकास आराखड्यात त्री -सदस्यीय समितीने ३९० आरक्षणे उठविल्याचा जाब भाजपाला विचारला पाहिजे ‘असेही ते म्हणाले
‘फक्त आपल्याच नसा -नसात भिनली आहे ,असे वाटणाऱ्या संघाला शिस्त काय असते हे बहुजन समाजाने लाखोंच्या संख्येने एकत्र येऊन मराठा क्रांती मोर्च्यांद्वारे संघाला दाखवून दिले आहे ‘ असा टोलाही त्यांनी मारला .
कार्यकर्त्यांनी सकारात्मक बोलले पाहिजे . जुन्या -नव्याचा संगम केला पाहिजे . कार्यकर्त्यांचा सन्मान ठेवला पाहिजे ,हेही त्यांनी आवर्जून सांगितले .
खासदार सुप्रिया सुळे या शिबिराला उपस्थित होत्या . रुपाली चाकणकर आणि पद्मा कांबळे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .
दरम्यान ,सकाळी सुरु झालेल्या पहिल्या सत्रालाही मान्यवरांनी मार्गदर्शन केले . पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘लक्ष्य 2017’ प्रशिक्षण शिबिर मालिकेअंतर्गत खडकवासला विधानसभा मतदार संघामधील प्रशिक्षण शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला.
यावेळी खासदार वंदना चव्हाण, प्रवक्ते अंकुश काकडे, महापौर प्रशांत जगताप, समागृह नेते शंकर केमसे, माजी महापौर आणि नगरसेवक दत्तात्रय धनकवडे, काका चव्हाण, अप्पा रेणूसे, विशाल तांबे, दिलीप बराटे, शिवलाल भोसले, श्रीकांत पाटील, नगरसेवक विकास नाना दांगट, मोहिनी देवकर, नगरसेवक भारती कदम , नगरसेवक (वारजे) सचिन दोडके, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष रूपाली चाकणकर, खडकवासला महिला अध्यक्ष पद्मा कांबळे, प्रभावती भूमकर, राकेश कामठे, मनाली भिलारे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिराच्या पहिल्या सत्राच्या सुरूवातीला महापौर प्रशांत जगताप, समागृह नेते शंकर केमसे, दत्तात्रय धनकवडे यांनी मार्गदर्शन केले. तसेच माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे यांनी त्यांच्या कामाचा आढावा दिला.
‘काश्मीर महिला आयोगा’च्या अध्यक्षा नईमा महजूर मार्गदर्शन करताना म्हणाल्या, ‘महिलाच या देशाला बदलू शकतात. युध्द लढाई, किंवा भांडणे करून कोणतेही प्रश्न सुटणार नाहीत. तर शांती आणि प्रेम यातुनच काश्मीरचे प्रश्न सुटणार आहेत.
त्या पुढे म्हणाल्या, पुरुषांनी महिलांचा आदर केला पाहिजे, त्यांना समानतेची वागणूक दिली पाहिजे, त्याही माणूस आहेत. महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. महिलांची ताकद आणि शक्ती खूप मोठी आहे. प्रत्येक महिलांनी अर्थशास्त्र, सामाजिक आणि राजकीय या सर्व क्षेत्रात पुढे येऊन देशाच्या प्रगतीसाठी योगदान दिले पाहिजे.
खासदार अॅड. वंदना चाहाण यावेळी बोलताना म्हणाल्या, ‘ या मार्गदर्शन मेळाव्याचा प्रमुख उद्देश आपल्या सर्वांचे एकमेकांशी संवाद होणे गरजेचे आहे हा आहे. फेबुवारी 2017 च्या निवडणुकीला सामोरे जाताना पूर्ण बहुमत मिळण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्रितपणे काम करायचे आहे. कार्यकर्त्यांच्या बळावरच पदाधिकारी आणि नगरसेवक निवडून येत असतात, त्यासाठी प्रत्येकाला आपल्या पक्षाने केलेल्या कामाची माहिती असणे आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी गेल्या 10 वर्षात केलेल्या कामांचे मार्केटींग करणे ही आता काळाची गरज आहे. त्यामुळे आपल्याला बोलावे लागेल, नागरीकांना सांगावे लागेल, आज प्रत्येक वर्गातील तरुण हा सोशल मिडीयाचा वापर करतो, त्यामुळे अधिकाधिक सोशल मिडीयाचा वापर करून नागरिकांपर्यंत पोहोचले पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शरद पवार साहेबांची ‘दृष्टि’ आहे, ‘कृती’ अजितदादांची आहे तर लक्ष्य गाठण्यासाठी सुप्रिया सुळे यांचे आपल्याला मार्गदर्शन मिळते.’