पुणे-भाजपमधून लोकसभा लढविण्याच्या तयारीला लागलेल्या राज्यसभा सदस्य असलेल्या भाजपचे सहयोगी खासदार यांनी प्रथम सुरेश कलमाडी, रामदास आठवले आणि नंतर खुद्द शरद पवार यांच्याशी साधलेला संवाद ..म्हणजे नानांची मुशाफिरी मानली जात असून हि मुशाफिरी नेमकी राजकारणात कशी रंगत आणणार आहे याकडे आता पुण्यातील राजकीय समीक्षकांचे लक्ष लागून आहे .गेली ३ वर्षे सातत्याने राष्ट्रवादी आणि त्यांच्या नेत्यांशी दूर दूर राहिल्यानंतर काकडे यांनी आता थेट शरद पवारांशी गुजगोष्टी केल्याने याकडे राजकीयदृष्ट्या पाहिले जाते आहे .
सुरेश कलमाडींच्या अस्तानंतर त्यांच्या तोडीचा नेता पुण्याच्या राजकारणाला लाभला नाही हे निर्विवाद सत्य आहे ,कलमाडींनंतर सामुहिक नेतृत्वाची धुरा पत्करलेल्या कॉंग्रेसची आजही शकलेच झालेली पहायला मिळतात .अशा स्थितीत पुण्याच्या राजकारणाला ‘बाहुबली ‘ चीच आवश्यकता असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगितले जात आहे.तर त्यामुळे राष्ट्रवादीच्या अजितदादांनी तर पुण्याच्या लोकसभेची जागा आमचाच उमेदवार लढवेल अशी घोषणा देखील केली आहे , मात्र राष्ट्रवादीकडे लोकसभेसाठी इच्छुकांचे चेहरे देखील उघड झालेले नाहीत , दुसरीकडे ज्यांनी भाजपकडून लोकसभा लढविणार अशी स्वघोषणा केली त्या भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी परवा पुण्याच्या विधान भवनात खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांशी केलेल्या कानगोष्टींनी ; नेमके नानांचे चाललंय तरी काय ‘ असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे .
खासदार संजय काकडे हे ‘नाना’ या नावाने परिचित आहेत . पण प्रत्येक गोष्ट ‘हाहा ‘मध्ये रुपांतरीत कशी करवून घ्यायची , याबाबत त्यांचे हातखंडे त्यांचे अधून मधून सांगितले जातात . पुण्याची लोकसभा लढविण्यासाठी आपण इच्छुक असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून त्यांनी निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे, असेही त्यांनी जाहीर सांगितले आहे.एकीकडे भाजपचे खासदार अनिल शिरोळे यांच्या कामाबाबत तक्रार नाही असे म्हणणारे काकडे आता स्वतः च इथून इच्छुक म्हणून सर्वप्रथम रणांगणात उतरल्याने , शिरोळे यांचा पत्ता कापला जावूनच त्यांना उमेदवारी मिळू शकते हे समजणे अशक्य नाही . दुसरीकडे नानांची ओळख भाजपचे ज्येष्ठ नेते पालकमंत्री गिरीश बापट यांचे विरोधक अशी देखील राजकारणात आहेच .
अशा सर्व पार्श्वभूमीवर नानांनी ‘भाईंची’ म्हणजे सुरेशभाई कलमाडी यांची त्यांच्या वाढदिवसाचे निमित्त करून भेट घेतली , त्यानंतर त्यांनी रिपब्लिकन नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची ही भेट घेतली . या दोन्ही भेटीत त्यांनी आपण लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे या दोघांच्या ही कानावर घातले. रामदास आठवले यांनी तर , आमच्या पक्षात येवून लोकसभा लढा .. अशी ऑफर ही त्यांना टाकल्याच्या बातम्या झळकल्या . पण मी भाजपमध्येच राहणार , नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली लोकसभा लढणार असे काकडे सांगतात ना सांगतात तोच परवा पुण्याच्या विधानभवनात त्यांनी पवारांशी कानगोष्टी केल्या. यावर खसखस पिकल्याशिवाय रहात नाही .
जर काकडे भाजपच्याच सानिध्यात राहणार असतील तर पवारांशी नेमक्या त्यांनी काय गुजगोष्टी केल्या याबाबत राजकीय कार्यकर्त्यांत उत्सुकता आहे.
याबाबत खुद्द संजय काकडे , यांनी आपले वैयक्तिक काम होते त्यासाठी आपण पवारांकडे वेळ मागितली ‘. असे स्पष्टीकरण दिले असले तरी , असे कोणते त्यांचे काम पवारांकडे आहे , जे फडणवीस किंवा मोदी करू शकत नाहीत ? या प्रश्नांची उकल होणे कठीण आहे .
राष्ट्रवादीकडे अद्याप लोकसभेच्या इच्छुकाचे नाव नाही तर कॉंग्रेसकडे नावे असूनही ती ‘सीट’ घालविणारी नावे मानली जातात . अशा परिस्थीतिचा फायदा काकडे घेतील काय ?का त्यांचा कुठला सर्व्हे सुरु आहे ? लोकसभेच्या पार्श्वभूमीवर त्यांची ही मुशाफिरी कोणकोणत्या रंगांची उधळण करणार आहे … याकडे आता कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.