महिलांना शिक्षण, रोजगार देण्याला प्राधान्य-चंद्रकांतदादा पाटील
कळंब (उस्मानाबाद) : शेतकरी आनंदी, सुरक्षित आणि सक्षम व्करण्यासाठी आम्ही काम करतो आहोत. त्यांच्या हाताला काम, शेतीला पाणी दिले तर त्यांची स्थिती सुधारणार आहे. तसेच महिलांना शिक्षण आणि रोजगार देण्यासाठी केंद्र व राज्य सरकार प्राधान्य देत आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नी निर्धाराने उभ्या राहताहेत. त्यांना प्रोत्साहन देण्याचा फिनोलेक्स पाईप्स आणि मुकुल माधव फाउंडेशनचा प्रयत्न कौतुकास्पद आहे,” असे प्रतिपादन राज्याचे कृषी व महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
एकल महिला शेतकरी (आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नी) सक्षमीकरणासाठी पुण्यातील फिनोलेक्स पाईप्स आणि त्यांचे सीएसआर भागीदार मुकुल माधव फाउंडेशन व फिक्की फ्लो पुणे चॅप्टर यांच्या पुढाकाराने, पुण्यातील साई मित्र परिवार, कळंब येथील पर्याय सामाजिक संस्था व कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूर यांच्या सौजन्याने ४१२ महिला शेतकर्यांना मोफत सोयाबीन आणि तुरीचे बियाणे चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. कळंब आणि वाशी तालुक्यातील जवळपास ४० गावातील ४१२ महिला शेतकर्यांना प्रत्येकी ३० किलो सोयाबीन, एक किलो तूर डाळीचे बियाणे देण्यात आले. प्रसंगी मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया, आमदार सुजितसिंह ठाकूर, फिनोलेक्स पाईप्सचे उपाध्यक्ष बी. आर. मेहता, फिक्की फ्लो पुणे चॅप्टरच्या सदस्या अनिता सणस, रेखा मगर, अप्पर जिल्हाधिकारी पराग सोमण, पर्याय संस्थेचे विश्वनाथ तोडकर, मुकुल माधव फाउंडेशनचे बबलू मोकळे, सचिन कुलकर्णी, मंगेश तळेकर, अमोल ठाकरे आदी उपस्थित होते.
चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, “मीदेखील अडीच एकर जमीन असलेल्या शेतकर्याचा मुलगा आहे. शिवसेना-भाजप पक्षात साधे लोकही वरच्या पदाला पोहोचतात. आपण ग्रामीण भागातील लोक स्वाभिमानी असतो. आपल्याला देणगी, अनुदान चालत नाही. पण नैसर्गिक आपत्तीमुळे ही परिस्थिती आली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि शेतकर्यांना स्वतःच्या पायावर लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली आणली जात आहे. जलसंधारण काम सुरु असून पडलेल्या पावसाचा प्रत्येक थेंब वाचवण्याचा मानस आहे. शेततळी उभारली जात आहेत. त्यामुळे यंदा पीक चांगले येईल. त्याला चांगला भाव देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. शेतकर्यांनी शेतीला आधुनिकतेची जोड दिली पाहिजे. त्यासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या सहकार्याने वेगळे प्रयोग करावेत.”
“महिलांना शिक्षण आणि रोजगार देणे गरजेचे आहे. महिला पैसे कमवायला लागतील, तेव्हाच त्यांची किंमत वाढेल. महिलांनी शक्तीचा आणि बुद्धीचा वापर करून अर्थार्जन करावे. मुलींचे शिक्षण बंद होणार नाही, याची काळजी आपण सर्वांनी मिळून घेतली पाहिजे. सुरक्षित आयुष्य जगण्यासाठी विमा उतरवला पाहिजे,” असेही चंद्रकांतदादा पाटील यांनी नमूद केले.
रितू प्रकाश छाब्रिया म्हणाल्या, “गेल्या पाच वर्षांपासून मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जलसंधारणाचे काम सुरु आहे. आणखी काही जिल्ह्यात ते केले जाणार आहे. देशासाठी जवान आणि किसान हे दोन घटक अतिशय महत्त्वाचे आहेत. जवान सीमेवर देशाचे रक्षण करतो, तर किसान शेती फुलवतो. वर्षभर आपल्याला अन्नधान्य पुरविणाऱ्या शेतकर्यांची पेरणी सुलभ व्हावी, यासाठी आमचे काम सुरू राहील. या एकल महिलांच्या पाठिशी उभे राहून त्यांना स्वाभिमानी बनवू.”
अनिता सणस यांनी फिक्की फ्लोच्या उपक्रमांविषयी सांगितले. महिलांना साडीचोळी आणि भेटवस्तू देण्यात आल्या. बबलू मोकळे यांनी सूत्रसंचालन, स्वागत प्रास्ताविक केले.