सातवे अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलन 20 फेब्रुवारीपासून
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कतिक महोत्सव समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या संयुक्त विद्यमाने सातवे अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलन 20 ते 24 फेब्रुवारी या कालावधीत होत आहे. जंगली महाराज रस्त्यावरील संविधाननगरी, बालगंधर्व रंगमंदिरात हे संमेलन होणार आहे. या संमेलनात यंदाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार डॉ. गेल ऑमव्हेट यांना जाहीर झाला आहे, अशी माहिती संमेलनाचे प्रमुख संयोजक परशुराम वाडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी संमेलनाचे अध्यक्ष जी. के. ऐनापुरे, संमेलनाचे निमंत्रक प्रा. विलास वाघ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्राचे प्रमुख डॉ. विजय खरे, संयोजक दिपक म्हस्के, धर्मराज निमसरकर, प्रा. किरण सुरवसे, अमरनाथ सिंग आदी उपस्थित होते.
परशुराम वाडेकर म्हणाले, “साहित्य-संस्कृतीतून तयार होणार्या जनमानसाला व्यापक परिवर्तनवादी दृष्टी लाभावी. समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय या तत्वांबरोबर लोकशाही समाजवादी मूल्य रूजावीत, या हेतूने 2010 पासून सम्यक साहित्य संमेलन भरविले जात आहे. हे संमेलन वाचक, साहित्यिक व विचारवंतांना जोडणारे विचारपीठ आहे. संमेलनाचे हे सातवे वर्ष आहे. ज्येष्ठ कादंबरीकार जी. के. ऐनापुरे यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होत आहे. पाच दिवसांच्या या संमेलनात संविधान दिंडी, विविध विषयांवर परिसंवाद, शाहीरी जलसे, रॅप म्युझिक, नाटके व कवी संमेलने, स्वतंत्र ग्रंथदालन असणार आहे.”
‘’संमेलनाची सुरुवात संविधान सन्मान रॅलीने बुधवार, दि. 20 फेब्रुवारी 2019 रोजी सायंकाळी 4.00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बुधवार पेठ येथील भिडे वाडा अशी होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन गुरुवार, दि. 21 फेब्रुवारी 2019 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. गंगाधर पानतावणे विचारमंचावर ज्येष्ठ साहित्यिक किरण नगरकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितिन करमळकर, उप-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, संमेलनाचे माजी अध्यक्ष यशवंत मनोहर, डॉ. विजय खरे, डॉ. अनिल सपकाळ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनावेळी विचारमंचावरुन जी. के. ऐनापुरे यांचे अध्यक्षीय भाषण ऐकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर सायंकाळी 6.00 वाजता वात्रटीकाकार रामदास फुटाणे व सहकार्यांचे ‘भारत कधी कधी माझा देश आहे’ या विषयावर कवी संमेलन होणार आहे. सायंकाळी 8.00 वाजता अभिनेते सयाजी शिंदे प्रस्तुत ‘बैल अ-बोलबाला’ हे नाटक सादर होणार आहे. तत्पुर्वी, दुपारी 2.00 वाजता प्रवीण डोणे-शिरीष पवार व सहकार्यांचा ‘भीमस्पंदन’ हा कार्यक्रम, तर दुपारी 3.30 वाजता ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. पी. ए. इनामदार यांच्या हस्ते भाई वैद्य ग्रंथदालनाचे उद्घाटन होणार आहे.”
संमेलनाचा समारोप रविवार, दि. 24 फेब्रुवारी 2019 रोजी दुपारी 2.00 वाजता डॉ. गंगाधर पानतावणे विचारमंचावर होणार आहे. समारोपासाठी माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे, प्रा. विलास वाघ, डॉ. अनिल सपकाळ उपस्थित राहणार आहेत. तत्पुर्वी, सकाळी 9.30 वाजता अनिरुद्ध बनकर ‘मी वादळवारा’ हा भीमगीतांचा कार्यक्रम सादर करणार आहेत. सकाळी 11 वाजता ‘समकालीन साहित्य चळवळी आणि बांधिलकी’ या विषयावर परिसंवाद होणार असून, परिसंवादाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक व माजी कुलगुरु डॉ. नागनाथ कोतापल्ले भूषविणार आहेत.
संमेलनाच्या तिसर्या दिवशी शुक्रवार, दि. 22 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी 9.30 वाजता विपीन तातड यांचा ‘समस्या मेरे देस की’ हा रॅप साँगचा विशेष कार्यक्रम, तर सकाळी 11 वाजता ‘समकालीन राजकारणाचे बदलते सांस्कतिक संदर्भ’ यावर परिसंवाद होणार असून, अध्यक्षस्थानी साहित्यिक सुरेंद्र जोंधळे असतील. अजित अभ्यंकर, डॉ. सुधीर गव्हाणे, श्रुती तांबे, अविनाश महातेकर व इतर साहित्यिक सहभागी होतील. दुपारी 2.30 वाजता ‘मी आणि माझे लेखन’ या विषयावरील परिसंवादात मंगेश काळे, श्रीकांत देशमुख, इंदुमती जोंधळे, सुदाम राठोड व इतर साहित्यिक सहभागी होतील. सायंकाळी 5.00 वाजता कवी अजय कांडर यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होणार असून, त्याचे सूत्रसंचालन नितिन चंदनशिवे करणार आहेत. सायंकाळी 7.00 वाजता ज्ञानेश महाराव यांचे सादरीकरण असलेले ‘तुकाराम’ हे नाटक होईल.
चौथ्या दिवशी शनिवार, दि. 23 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी 9.30 वाजता ‘निळी धम्मछाया’ हा भीम गीतांचा कार्यक्रम मधुकर मेश्राम सादर करणार आहेत. सकाळी 11 वाजता हरिश्चंद्र थोरात यांच्या अध्यक्षतेखाली ‘जात प्रभुत्व आणि मराठी साहित्य’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. ऋषीकेश कांबळे, रुपाली शिंदे, दिलीप चव्हाण, शरद गायकवाड, राहुल कोसंबी सहभागी होणार आहेत. दुपारी 2.30 वाजता ‘लेखन स्वातंत्र्य आणि सांस्कृतिक दडपशाही’ या विषयावर भारत पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार असून, त्यामध्ये राजीव खांडेकर, जयदेव डोळे, संजय आवटे, अरुण खोरे, बालाजी सुतार, अपर्णा लांजेवार, युवराज मोहिते सहभागी होणार आहेत. सायंकाळी 5.30 वाजता ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्त्या डॉ. गेल ऑमव्हेट यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मान होणार आहे. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, कुलगुरु डॉ. एकनाथ खेडकर उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी 7.00 वाजता कवी लोकनाथ यशवंत व सहकार्यांचे कवी संमेलन होणार असून, त्याचे सूत्रसंचालन प्रशांत वंजारे करणार आहेत. रात्री 9.00 वाजता अरुण मिरजकर लिखित ‘एका धोतराची गोष्ट’ या नाटकाचा प्रयोग होणार आहे. धर्मराज निमसरकर, राजाभाऊ भैलुमे, किरण सुरवसे, दीपक म्हस्के, निशा भंडारे, अमरनाथ आदी कार्यकर्ते संमेलनाच्या यशस्वीततेसाठी परिश्रम घेत असल्याचे परशुराम वाडेकर यांनी नमूद केले.
अध्यक्ष निवडीबद्दल ऐनापुरे यांचा सत्कार
सातव्या अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कादंबरीकार जी. के. ऐनापुरे यांचा प्रा. विलास वाघ यांच्या सत्कार करण्यात आला. सद्यस्थितीत समाजात सुरु असलेल्या अविवेकी गोष्टींवर संमेलनात भाष्य करणार आहे. सर्व विचारधारेतील लोकांना बरोबर घेऊन जाण्याचा सम्यक साहित्य संमेलनाचा हेतू आहे. मुक्तपणे विचार मांडण्याचे व्यासपीठ या संमेलनाने उपलब्ध करून दिले असून, त्याला न्याय देणारी भूमिका मांडणार असल्याचे ऐनापुरे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. प्रा. विलास वाघ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.