माय मावळ फौन्डेशनचा उपक्रम
पिंपरी – :जातीय सलोख्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य शासनातर्फे गेली अनेक वर्षे विविध उपक्रम राबविले जात आहेत. एकीकडे देशभरात जातीय ताणतणावाच्या अनेक घटना घडत असताना मावळ तालुक्यात मात्र जातीय सलोख्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत . आज रमजान ईदच्या दिवशी(ता.16) एका विधवा मुस्लीम महिलेला एका मराठा हिंदु लोकप्रतिनिधीकडून जी ईदी (ईदची भेट गिफ्ट) देण्यात आली आहे ती अनोखी आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा माय मावळ फौन्डेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील शंकरराव शेळके यांनी चांदखेड(ता.मावळ) येथील रेश्मा अहमद शेख या शेतमजुर महिलेचे सुमारे 50 वर्षापुर्वीचे मोडकळलेले घर नव्याने बांधून दिले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून घराचे सुरू असलेले बांधकाम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात आले. घरास ‘अपनापन’ नाव देण्यात आले आणि योगायोगाने रमजान ईदच्या दिवशी माजी महापौर आझम पानसरे यांच्या हस्ते ते रेश्मा शेख यांना सुपूर्त करण्यात आले. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार अमीन खान होते.
सुनील शेळके यांनी आज ‘अपनापन’च्या माध्यमातून या संतभूमीच्या परंपरेत सामाजिक ऐक्याची भर घातली आहे. लोकप्रतिनिधींच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उमटत असताना शेळके यांनी केलेले काम आशा निर्माण करणारे असल्याचे अमीन खान यांनी सांगितले.
आझम पानसरे म्हणाले, की सुनील शेळके यांनी तालुक्यातील सर्व समाजांसाठी स्वखर्चातून मदत केली आहे. विशेषत: ग्रामीण भागातील उपेक्षितांसाठी त्यांनी औषधोपचार, लग्नकार्य, ज्येष्ठांसाठी आरोग्योपचार, भुकेल्यांवृध्दांसाठी दररोज घरपोच जेवणाचे डबे, सामाजिक उपक्रमांसाठी निधी अशा कितीतरी प्रकारे त्यांनी केलेल्या मदतीमुळे सामाजिक सलोख्याबरोबरच लोकप्रतिनिधींची प्रतिमा देखील आशादायक होण्यास मदत झाली आहे. अनेक गावातील विकासकामांसाठी केवळ शासनाच्या योजनेवर अवलंबून न राहता त्यांनी गावक-यांचे श्रमदान आणि लोकवर्गणीची सांगड घातल उर्वरित रक्कम स्वत:खर्च करून सामाजिक बांधिलकीची जपणूक केली आहे.
रेश्मा शेख म्हणाल्या, आज जे घर मिळाले आहे त्यामुळे आता दोन मुली व एका मुलाचे शिक्षण, संगोपन आणि संसारातील आईची भूमिका अधिक चांगल्या प्रकारे निभावू शकेल.
प्रास्ताविकात सुनील शेळके म्हणाले, की लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना सामाजिक उत्तरदायित्वाचे भान नेत्यांनी ठेवले तर सामाजिक सलोख्यास मोठे बळ मिळते. पैसा कमावून जो आनंद मिळतो त्यापेक्षा तो सत्पात्री दानधर्मातून अधिक असतो. विद्या ददति विनयं, विनयात याति पात्रताम्, पात्रत्वाद् धनमाप्नोति, धनाद् धर्म तत: सुखम्… या भावनेतून आई-वडिलांनी दिलेल्या संस्कारातून आपण जातपात न पाहाता गरजूंसाठी प्रामाणिकपणे काम करतो आहोत. रेश्माताईंना घर बांधून दिले ते निरपेक्ष भावनेने दिलेली भेट आहे.
यावेळी सरपंच अमोल कांबळे, उपसरपंच पोरस बारमुख, पोलिस पाटील दत्ता माळी, माजी नगराध्यक्ष रवींद्र दाभाडे, नगरसेवक संदीप शेळके, बाबुलाल नालवंद, अब्दुल शेख, सामाजिक कार्यकर्त्या हसिना मुलाणी, अजित आगळे, गोपीचंद गराडे, फौन्डेशनचे कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तळेगाव दाभाडे येथील माजी नगरसेवक चंद्रभान खळदे आणि व्यावसायिक जयंतीलाल ओसवाल या मित्रांनी स्टेशन भागातील मुस्लिम बांधवांना नमाज पठणासाठी जागा नसल्याने स्वत:च्या मालकीची जागा विनामोबदला, विना भाडे सलग 15 वर्षे वापरण्यास दिली होती. न्यायालयीन लढ्यानंतरही येथील मुस्लिम कब्रस्तान ट्रस्टला जमिनीचा ताबा देण्याच्या कुरघोड्या होत असताना अखिल भारतीय हिंदु-मुस्लिम ऐक्य कमिटीचे सदस्य तथा उद्योजक किशोर आवारे आणि तत्कालीन नगराध्यक्षा सुलोचनाताई आवारे यांनी त्यावर मात करून ट्रस्टला जागेचा ताबा घेण्यात मोठी भूमिका बजावली आहे.