पाण्याच्या पुनर्वापरासाठी गृहप्रकल्पांना ग्रे वॉटर प्रक्रिया प्रकल्प बंधनकारक करा-आबा बागुल
पुणे -आगामी काळात पुण्याचा पाणी प्रश्न गंभीर बनणार आहे, त्यामुळे आतापासून नियोजन करण्यासाठी उपाययोजना आवश्यक असून त्यासाठी ग्रे वॉटर प्रक्रिया प्रकल्प काळाची गरज आहे. त्यामुळे गृहप्रकल्पांना ग्रे वॉटर प्रक्रिया प्रकल्प बंधनकारक करावे आणि पाणी बचत करणाऱ्या गृहप्रकल्पांना सवलती देण्याबरोबरच पुरस्काराने दरवर्षी सन्मानित करावे अशी मागणी माजी उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी आबा बागुल यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे .
याबाबत आब बागुल म्हणाले कि, शहरातील पुणेकरांना पाणी कपातीला वारंवार सामोरे जावे लागत आहे. शहराला पाणी किती ? शेतीला किती ? यावरून होणाऱ्या वादात पुणेकरांचे हाल होत आहे. पावसाचे प्रमाण आणि धरणातील पाणीसाठा हे लक्षात घेऊन पाण्याचे नियोजन चोख होणे आवश्यक आहे. त्यातही पाणीबचतीला प्राधान्य देण्यासाठी उपाययोजना आवश्यकही आहेत असेही आबा बागुल यांनी नमूद केले.
पाण्याचे स्रोत शोधणे हे जसे आवश्यक आहे तसे पाण्याच्या पुनर्वापराला प्राधान्यही महत्वाचे आहे. त्यानुसार प्रत्येक गृहप्रकल्पाला ग्रे -वॉटर प्रक्रिया प्रकल्प सक्तीचे करणे आवश्यक आहे. अंघोळीचे आणि स्वयंपाकाच्या पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी अन्य वापरासाठी उपलब्ध होईल. परिणामी पिण्याच्या पाण्याची बचतही होईल आणि खऱ्या अर्थाने पाण्याचे नियोजन होईल. त्यासाठी शहरातील गृहप्रकल्पामध्ये ग्रे वॉटर प्रक्रिया प्रकल्प उभारून ७० टक्के पाण्याचा पुर्नवापर करणे बंधनकारक करावे.या प्रकल्पाला चालना देण्यासाठी प्रोत्साहन म्हणून गृहप्रकल्पाना सवलत तसेच वॉटर बचत सोर्स पुरस्काराने दरवर्षी सन्मानित करावे. जेणेकरून पाण्याची बचत, पुर्नवापराला चालना सहजशक्य होईल.असा प्रस्ताव पालिका प्रशासनाला दिला आहे असेही माजी उपमहापौर आबा बागुल यांनी स्पष्ट केले.