पुणे (शरद लोणकर ) –
‘अच्छा तो हम चलते है, फिर कब मिलोगे…वही जहा कोई आता जाता नही…गाणे बहुधा सर्वांना ठाऊक असेल,आशा पारेख ,सिनेमातल्या आपल्या प्रियकर राजेश खन्ना ला भेटायला नदी किनारच्या सुंदर अशा एका स्पॉटवर भेटायला जाते…ते लोकेशन आठवा…
नसेल आठवत तर हा फोटो पहा आणि संपूर्ण लोकेशन जरूर आठवण्याचा प्रयत्न करा.

अगदी असे स्वप्न दाखविणारी निविदा,नदी सुधार प्रकल्पाची आता मंजूर होण्याच्या मार्गावर आहे,अहमदाबादच्या साबरमती नदीचा प्रकल्प जो प्रचंड वादाच्या भोवऱ्यात सापडला होता त्याच धर्तीवर हा नदी सुधार प्रकल्प राबविला जाणार आहे .
आता जायकाची मंजुरी-
खरे तर गेल्या सहा वर्षापासून रखडलेल्या शहरातील मैलाशुद्धीकरण प्रकल्पाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. महापालिकेने राबविलेल्या निविदा प्रक्रियेला जपान इंटरनॅशनल को – आॅपरेशन एजन्सी (जायका) ने आज मान्यता दिली आहे. त्यामुळे हा प्रस्ताव हा १४७३ कोटी रुपयांच्या योजनेचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेनंतर लगेच सुरू होणार आहे. हा प्रकल्प एनव्हायरो कंट्रोल व तोशिबा वॉटर सोल्यूशन (जे.व्ही.)ही कंपनी करणार आहे.या प्रकल्पाच्या ११ मैलापाणी शुद्धीकरण केंद्र आणि सुमारे ५६ किलोमीटरची जलवाहिनी टाकणे यासाठी १०९५ कोटी रुपये खर्च येणार आहे. तर १५ वर्ष देखभाल दुरुस्तीसाठी ३००.२१ कोटी रुपये असा एकूण १४७३.२१ कोटी रुपये खर्च येणार आहे. यानिविदेची सल्लागाराकडून पडताळणी झाल्यानंतर जायका कंपनीनेही तपासणी केली. त्यास मान्यता दिल्याचे पत्र आज महापालिकेला मिळाले आहे. त्यामुळे आता या प्रकल्पाच्या मंजुरीतील अडथळे दूर होणार आहेत.
राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत केंद्र सरकारने मुळ-मुठा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी मैलापाण्याची यंत्रणा उभी राहावी यासाठी २०१६ मध्ये ‘जायका’च्या मदतीने प्रकल्प मंजूर केला. त्यामध्ये प्रकल्पाच्या ८५ टक्के खर्च हा जायकाकडून दिला जाणार आहे. तर महापालिकेला १५ टक्के खर्च करावा लागणार होता. अशा प्रकारे ८४१.७२ कोटी जायका व महापालिकेचे १४८.५४ कोटी रुपये खर्च अपेक्षीत होता.या प्रकल्पांसाठी ६ कंपन्यांनी निविदा भरली होती, पण जायका कंपनीचे निकष व कागदपत्रांची पूर्तता करू शकणारी एकमेव कंपनी यासाठी पात्र ठरली. महापालिकेने जानेवारीच्या शेवटच्या ‘व्हीडीओ शूटिंग’ करून ही निविदा उघडली. त्यामध्ये एनव्हायरो कंट्रोल व तोशिबा वॉटर सोल्यूशन (जे.व्ही.) कंपनीने १४ टक्के जादा रकमेची निविदा भरल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे या योजनेचा खर्च १७०० कोटीवर जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात या योजनेचा खर्च वाढलेला नसून,महापालिकेने निश्चीत केलेल्या १५११ कोटी या रकमेपेक्षा अर्धा टक्का कमी दराने निविदा आली आहे.हा प्रकल्प हाती घेतल्यानंतर त्याचा सल्लागार नेमणे, निविदा काढणे यामध्ये लालफितीच्या कारभारात प्रकल्प अडकला. त्यामुळे गेल्या सहा वर्षात काहीच झाले नाही. महापालिकेच्या कामकाजावर केंद्र सरकार तसेच जायकाकडून ताशेरे ओढल्यानंतर २५ फेब्रुवारी २०२१ ला निविदा प्रक्रिया सुरू झाली. या प्रकल्पाला उशीर झाल्याने ९९०.२६ कोटी रुपयांचा खर्च तब्बल १५०० कोटींवर गेला. त्याचा भुर्दंड पुणेकरांना सहन करावा लागणार आहे.

खडकवासला ते बंडगार्डन काय होता जलवाहतुकीचा प्रकल्प
खरे तर खडकवासला ते बंडगार्डन असा श्रीनगर च्या दल लेक च्या धर्तीवर एक सुदर प्रकल्प राबविण्याचा विचार यापूर्वीच एका पत्रकाराने मांडला होता.पावसाळ्यात कित्येक धरणे भरतील एवढे पाणी सोडून दिले जाते तेच पाणी बंडगार्डन ला अडवून नदी किनारची अतिक्रमणे हटवून नदी किनारी रस्ते करून नदीतून जलवाहतुकीचा प्रकल्प करावा असा तो विचार होता ज्यावर डीएसके यांच्या दूरदर्शनने नंतर मुलाखती घेतल्या (कारण अन्य चॅनेल नव्हते तेव्हा ) आणि अगदी अलीकडे म्हणजे आताचे खासदार गिरीश बापट यांनी दिल्लीत हि यावर चर्चा करून हा प्रकल्प मार्गी लावता येतो काय यावर गेल्या ५ वर्षापूर्वी देखील प्रयत्न केला होता आणि त्यावर एका पत्रकार परिषदेत देखील भाष्य केले होते .पण हा प्रकल्प काही मार्गी लागला नाही आणि आता आला तो हा साबरमती च्या धर्तीवरील नदी सुधार प्रकल्प .
मेट्रो आणि नदी सुधार प्रकल्प कितपत नागरिकांच्या अपेक्षा, आणि राजकारण्यांनी दाखविलेली स्वप्ने पूर्ण करतील ?
आता प्रश्न आहे तो सुमारे एकूण पावणेपाच हजार कोटी रुपयांचा नदी सुधार प्रकल्प खरोखर राजकारण्यांनी दाखविलेली स्वप्ने पूर्ण करेल काय ? म्हणजे राजेश खन्ना आणि आशा पारेख यांचे गाणे ज्या लोकेशनवर चित्रित झाले ते लोकेशन नागरिकांना अनुभवयाला मिळेल काय ? आणि मेट्रो आल्यानंतर मेट्रोची तर बरकत होईल पण पुण्याच्या वाहतूक समस्येतून पुणेकरांची सुटका होईल काय ?खरोखर जी बजबजपुरी येत्या काही वर्षात पुण्याच्या वाहतुकीची झाली आहे , बेकायदेशीर बांधकामांनी आणि शहराकडे येणाऱ्या प्रचंड लोंढ्यांनी जी शहराची वाट लाऊन ठेवलेली आहे, ज्यात बीआरटी फेल गेलेली आहे .त्याच शहरात मेट्रो आता येईलच ती कितपत बदल घडवेल ? आणि नदी सुधार प्रकल्पाला,जायका ला हि कदाचित सुरुवात होईल हे प्रकल्प पुण्याला जी स्वप्ने दाखवीत आहेत ती खरोखर पूर्ण होतील काय ?खरे तर काळच याचे उत्तरे देईल,आणि प्रत्येकाला आपापल्या बुद्धीला अनुसरून विचारून याची उत्तरे मिळविता देखील येतील.

