प्रामाणिक करदात्यांवर अन्याय: करबुडव्यांना सवलत : अभय योजनेस काँग्रेस पक्षाचा विरोध
पुणे- ५० लाखापासून पुढे मिळकतकराची थकबाकी असलेल्या ३८५ थकबाकीदारांकडून व्याज दंडासह २७१ कोटी रुपयांची येणी थकीत असून हि मंडळी नेमकी कोण कोण ? आणि यांचा प्रत्यक्षात सत्ताधारी भाजपशी नेमका काय संबध ? असे मार्मिक सवाल करत कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी सत्ताधारी भाजपच्या वर्मी घाव घातला आहे .आणि एवढ्या बड्या धेंडाना मिळकत कराच्या कारवाईतून ‘अभय ‘ देण्यास पूर्णतः विरोध दर्शविला आहे .
या संदर्भात आबा बागुल यांनी म्हटले आहे कि,’आजच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये बहुमताच्या जोरावर .१ कोटी रुपयांपर्यंत थकबाकी असणा-या मिळकतींचा दंड माफ करणेसाठी भाजपने मिळकत कराची अभय योजनेचा प्रस्ताव मांडला, यावेळी काँग्रेस पक्षाने मागील पाच आर्थिक वर्षात प्रतिवर्षी वेळेत कर भरणा-या निवासी मिळकतधारकांचा सन २०२२-२०२३ चा संपूर्ण मिळकत कर माफ करण्यात यावा अशी उपसूचना दिली असता ती देखील सुसंगत नाही असे कारण दाखवत फेटाळण्यात आली.
बागुल यांनी पुढे असेही म्हटले आहे कि,’र.रू.५० लक्ष वरील र.रू.१ कोटी पर्यंत थकबाकी असणा-या ३८५ मिळकती असून यांची निव्वळ थकबाकी ५६.३५ कोटी असून दंडाची रक्कम २१५.०६ कोटी असून एकूण थकबाकी २७१.४२ कोटी इतकी आहे. तसेच ५० लक्ष पेक्षा कमी थकबाकी असलेल्या मिळकतींची संख्या ४,२३,४३७ असून त्यांची निव्वळ थकबाकी १३७२.९८ कोटी असून २ टक्के दंडाची रक्कम २१५०.५९ कोटी असून एकूण थकबाकी असून ३५२३.५७ कोटी इतकी आहे.वरील आकडे पाहता सत्ताधारी भाजप प्रामाणिकपणे प्रतिवर्षी मिळकत कर भरणा-या पुणेकरांवर अन्याय करणारी, महापालिकेला कोटयावधींचा भुर्दंड देणारी व करबुडव्यांना सवलत देणारी अशी ही योजना आहे. पुणे मनपा प्रशासन वेळेवर कर वसूल करणेस असमर्थ ठरत असून सत्ताधारी पक्षाकडून ५० लक्ष ते १ कोटी पर्यंत थकबाकी असणा-या ३८५ मिळकत धारकांना सवलत देण्यासाठी हा उदयोग सुरू आहे असे दिसत असून हे ३८५ मिळकत धारक कोण ? यांचे सत्ताधारी पक्षाबरोबर काय लागेबांधे आहेत याचे उत्तर पुणेकरांना दयावे लागणार आहे.
बागुल यांनी पुढे असेही म्हटले आहे कि,पुणे मनपाचे मिळकत कर हे प्रमुख उत्पन्न असून हा कर वेळेत भरून महापालिकेडून मूलभूत सेवा व सुविधांची कामे वेळेवर व्हावीत या हेतूने हा कर वेळेत भरला जावा म्हणून कायदयामध्ये २ टक्के शास्तीची तरतूद करण्यात आली असून ही शास्ती माफ करण्याचा अधिकार कायदयाने कोणासही नाही. पूर्वी गोरगरीबांसाठी अभय योजना आणली ही बाब आम्ही समजू शकतो. परंतू कोटयावधींची थकबाकी असलेल्या मिळकतींना अभय योजना देणे महापालिकेच्या हिताचे नाही. या सर्व बाबींचा विचार करून महापालिकेच्या हितासाठी काँग्रेस पक्षाने प्रामाणिक करदात्यांवर अन्याय करत, महापालिकेस कोटयावधींचा भुर्दंड देणारी व करबुडव्यांना सवलत देणा-या अभय योजनेस विरोध केला असून महापालिका आयुक्तांकडे या प्रस्तावाची अंमलबजावणी करू नका अशी मागणी आबा बागूलांनी केली आहे.

