पुणे – संपूर्ण देश महागाई आणि बेरोजगारीने हैराण झालेला असताना केवळ भ्रष्टाचार आणि सत्तेचे वेध भाजपाला लागलेले असल्याचा आरोप येथे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष , माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी केला आहे.
शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील मोदी सरकारच्या अनियंत्रित महागाई विरोधात जनजागरण पदयात्रा संत कबीर चौक, नाना पेठ ते महात्मा फुले स्मारक, गंज पेठ, पुणे पर्यंत काढण्यात आली व आंदोलन करण्यात आले.या जनजागरण पदयात्रेत केंद्र सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून घोषणा देण्यात आल्या. या जनजागरण पदयात्रेत आबा बागुल, अविनाश बागवे, संजय बालगुडे, कमलताई व्यवहारे,रफिक शेख, संगीता पवार, भीमराव पाटोळे, अनिल सोंडकर, उस्मान तांबोळी, शेखर कपोते, राजेंद्र शिरसाट, द. स. पोळेकर, रवि पाटोळे, क्लेमेंट लाजरस, रॉबर्ट डेविड, वाल्मिक जगताप, सुनिल पंडित, मुख्तार शेख, अशोक जैन, बाबा धुमाळ, मुन्नाभाई शेख, अरूण वाघमारे, रमेश सकट, सुनील घाडगे, प्रवीण करपे, सतीश पवार, प्रदिप परदेशी, शिलार रतनगिरी, सुजित यादव, जयकुमार ठोंबरे, जावेद निलगर, नंदू मोझे, रजनी त्रिभुवन, प्रशांत सुरसे, चेतन अगरवाल, मंजूर शेख, विठ्ठल गायकवाड, विजय मोहिते, दिपक ओव्हाळ, छाया जाधव, आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, “केंद्रातील मोदी सरकारने अच्छे दिनच्या नावाखाली जनतेची शुद्ध फसवणूक केलेली आहे. पेट्रोल-डीजेलच्या भाववाढी बरोबरच दैनंदिन वस्तूंच्या भाववाढीने सुध्दा आकाशाला गवसणी घातलेली आहे. यामुळे सामान्य जनता त्रस्त झालेली आहे. भाजपने पुणे महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्यामुळे भ्रष्टाचार म्हणजे भाजप, खोटे बोलणारा पक्ष म्हणजे भाजप असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. भाजपच्या नगरसेवकांनी अनावश्यक ठिकाणी खोदकाम करून टक्केवारी व ठेकेदारीच्या माध्यमातून भ्रष्टाचार केलेला आहे. याचा कळस म्हणजे टेंडर न काढता बिल काढण्याचे पाप भाजपने केलेले आहे. यांच्या कथनी आणि करनीमध्ये जमीन अस्मानचा फरक आहे. मोदींनी देशातील जनतेला ज्याप्रकारे जुमलेबाजी करून फसविले तसाच नेमका प्रकार पुण्यात देखील भाजपची मंडळी करत आहे. एकीकडे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम ठेवतात तर दुसरीकडे त्या कार्यक्रमाच्या होर्डिंग्ज मधून छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला गायब करतात. महामानवांपेक्षा यांच्यासाठी यांचे नेते मोठे झाले आहेत. आज भाजपच्या ‘मुहं में राम और बगल में छूरी’ या नीतीच्या विरोधात आपण रस्त्यावर उतरण्याची आवश्यकता आहे.’’यावेळी उपस्थित असणारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले, ‘‘देशात मोठ्या प्रमाणात महागाई वाढत असतांना फक्त काँग्रेस पक्षच रस्त्यावर उतरून या अनियंत्रीत महागाई विरोधात लढत आहे. महागाई कमी करण्याचे आश्वासन देणाऱ्या मोदींनी जनतेची शुद्ध फसवणूक केली आहे. केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने महागाई वाढवून देशाची अर्थव्यवस्था उध्दवस्त केली आहे. जे सरकार महागाईवरनियंत्रण ठेवू शकत नाही त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. आज मोदी सरकारने महागाईचा उच्चांक गाठला आहे त्यामुळे त्यांनी त्वरीत महागाईवर नियंत्रण आणावे अन्यथा त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही.’’ याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड, महिला अध्यक्षा सोनाली मारणे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

