मुंबई, दि. 22 :- मेट्रो ४ च्या कारशेडकरिता मोघरपाडा येथे तर मेट्रो-९ च्या कारडेपोसाठी मौजे राई-मुर्धा व मोर्वा येथील जमीन घेण्यासाठी शेतकऱ्यांवर जबरदस्ती करण्यात येणार नाही, सर्वांच्या संमतीनेच या प्रकल्पांसाठी जागा घेण्यात येतील. त्यासाठी लवकरच दोन स्वतंत्र बैठकांचे आयोजन करण्यात येईल, असे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत सांगितले.
विधानसभा सदस्य प्रताप सरनाईक, श्रीमती यामिनी जाधव यांनी विचारलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना नगरविकासमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले की, मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील वाहतूक व परिवहन व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याच्या हेतूने मेट्रो रेल आधारित आधुनिक, वातानुकुलित, पर्यावरणपूरक उच्च प्रवाशी क्षमता असलेली सार्वजनिक वाहतूक प्रणाली विकसित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मुंबई मेट्रो मार्गिका -४ चा वडाळा-घाटकोपर-मुलुंड-कासारवडवली आणि पुढे गायमुखपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. तर मेट्रो ९ मार्गिका दहिसर ते मीरा भाईंदरपर्यंत नेण्यास शासनाने मान्यता दिली आहे. मेट्रो ४ च्या कारशेडसाठी मौजे मोघरपाडा येथे तर मेट्रो ७, ७अ, आणि ९ या मार्गिकांच्या एकत्रित कारडेपोसाठी मौजे राई-मुर्धा आणि मोर्वा येथे प्रस्तावित जमीनीची निवड करण्यात आलेली आहे. मेट्रो कारशेडच्या जागांसाठी कोणत्याही शेतकऱ्यांवर अन्याय करुन जबरदस्तीने जागा घेणार नाही ही शासनाची भूमिका आहे. भूमिपुत्र हे आपले बांधव असून त्यांनी शासनाला किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना विकासाच्या प्रक्रियेत नेहमीच सहकार्य केले आहे, असेही नगरविकासमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
राई-मुर्धा आणि मोर्वा तसेच मोघरपाडा येथील कारशेडच्या जागेसाठी स्थानिकांसह लोकप्रतिनिधी, एमएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी यांची स्वतंत्रपणे बैठक घेऊन चर्चा करण्यात येईल. कारशेड झाल्यानंतर त्या भागात होणारे फायदे, परिसराचा होणारा विकास याविषयीची माहिती देण्यात येईल असे सांगून यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करुन यावर मार्ग काढण्यात येईल, असेही नगरविकासमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
मेट्रो मार्ग ५ मधील प्रकल्पग्रस्तांचे एमएमआरडीएच्या घरांमध्ये पुनर्वसन करणार
ठाणे-भिवंडी-कल्याण या मुंबई मेट्रो मार्ग ५ च्या पहिल्या टप्प्यातील प्रकल्पग्रस्तांचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या घरांमध्ये पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत सांगितले.
विधानसभा सदस्य रईस शेख यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर नगरविकासमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले की, ठाणे-भिवंडी-कल्याण या मुंबई मेट्रो मार्ग ५ ची लांबी २४.९ किलोमीटर असून या मार्गावर १५ स्थानके प्रस्तावित केलेली आहेत. सुमारे ८ हजार ४१६.५१ कोटी रुपये खर्च असलेल्या या प्रकल्पाचे ठाणे-भिवंडी आणि भिवंडी-कल्याण या दोन टप्प्यात काम करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील स्थापत्य कामे प्रगतीपथावर असून ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यातील प्रकल्पग्रस्तांचे निवासी आणि अनिवासी मिळकतींचे पुनर्वसन एमएमआरडीएच्या मानपाडा, ठाणे येथील रेंटल हौसिंग योजनेंतर्गत करण्यात येणार आहे, तर बाधित व्यावसायिकांना २२५ चौरस फूटचा गाळा देण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे नगरविकासमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
मेट्रो प्रकल्पाचे काम करताना कमीत-कमी निवासी घरे बाधित झाले पाहिजेत अशा स्पष्ट सूचना एमएमआरडीएला देण्यात आल्या असून मेट्रोचे प्रकल्प करताना किंवा भूसंपादन करताना संबंधितांच्या संमतीनेच ते केले जाणार आहे. भिवंडी शहरातील उन्नत मेट्रो मार्गिकेचे भूमिगत मार्गिकेत बदल केल्यास पुनर्वसन आणि पुनर्वसाहतीच्या बहुतांशी समस्या कमी होणार आहेत. उन्नत मार्गामुळे बाधित कुटुंबांची संख्या वाढू नये म्हणून हा मार्ग भूमिगत करण्याचा निर्णय घेतला आहे, यामुळे ७३५ बांधकामे वाचले असून त्यासाठी मात्र एक हजार ४०० कोटी रुपये अतिरिक्त खर्च लागणार आहे, असेही मंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
भिवंडीतील मल्टीनॅशनल गोदामे, तेथील कर्मचारी, नागरिक आणि वाढती लोकसंख्या पाहता ठाणे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या बसेसबरोबरच एमएमआरडीएने त्यांच्या माध्यमातून काही व्यवस्था करता येईल का याची व्यवहार्यता तपासून निर्णय घेतला जाईल, असे नगरविकासमंत्री श्री. शिंदे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

