नागपूर. तबलिगी जमातला दिल्लीत बैठकीसाठी दिलेली परवानगी, बैठकीतून असंख्य तबलिगींना झालेला संसर्ग आणि त्यांच्या माध्यमातून देशभर झालेल्या कोरोनाच्या प्रसाराला केंद्रीय गृहमंत्रालय जबाबदार असल्याचा थेट आरोप राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना रात्री २ वाजता मरकजमध्ये का पाठवले गेले? डोभाल आणि तबलिगी जमातीचे नेते मौलाना साद यांच्यात कोणती गुप्त चर्चा झाली? त्यानंतर मौलाना साद फरार कसे झाले? असे अनेक ८ प्रश्न प्रसिद्धिपत्रकाच्या माध्यमातून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विचारले आहेत. तसेच केंद्रीय गृह मंत्रालयाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह लावले आहे.
मंत्री देशमुखांनी केंद्रीय गृह खात्याला विचारलेले प्रश्न
- केंद्रीय गृह विभागाने इज्तेमा आयोजनाला परवानगी का दिली?
- मरकजच्या शेजारीच मोठे पोलिस ठाणे असूनही आयोजन का थांबवण्यात आले नाही?
- आयोजनाची परवानगी तुमची, मग आयोजन का रोखले नाही?
- कोरोना संक्रमित तबलिगींमुळे देशभरातील प्रादुर्भावास केंद्रीय गृहमंत्रालय जबाबदार नाही काय?
डोभाल आणि मौलानांमध्ये नेमकी काय चर्चा झाली?
डोभाल यांना रात्री २ वाजता मरकजमध्ये का पाठवले? हे काम राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचे आहे की दिल्ली पोलिस आयुक्तांचे? डोभाल व मौलाना सादमध्ये रात्री कोणती गुप्त चर्चा झाली? दुसऱ्याच दिवशी मौलाना कुठे फरार झाले? ते आता कुठे आहेत? डोभाल आणि पोलिस आयुक्त बोलण्याचे का टाळत आहेत? असे प्रश्नही गृहमंत्री देशमुख यांनी विचारले

