पुणे-राजाला रोजच दिवाळी असे म्हणतात ते खरे आहे पण रस्त्यावर , पदपथांवर आयुष्य घालविणाऱ्या किंवा झोपड्यात कसेबसे जगणाऱ्या गरिबाला कसली आलीय दिवाळी … सजले धजलेले लोक फटाके वाजवताना दिसतात ,घरे सजलेली दिसतात , मिठाईच्या दुकानी गर्दी दिसते तेव्हा त्यांना कळते हि आहे दिवाळी पण हि दिवाळी आपल्या आयुष्यात येईल आणि आपल्यालाही ती साजरी कार्याला मिळेल असा दिवस त्यांचा आज उगवला .. दरवर्षी प्रमाणे आज हि पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांनी या मुलांना दिवाळीची प्रत्यक्षात अनुभूती दिली- कधी श्रावण बाळ बनलेले आबा बागुल आज या मुलांच्या मातेच्या रूपातच वावरत होते .
रांगोळ्यांचा थाट, मांडलेला पाट, सुगंधी तेल-उटण्यांचा सुवास,औक्षणाचे ताट, गोडाचा घास आणि त्यावर चढलेला नव्याकपड्यांचा साज या साऱ्यांचा अविस्मरणीयअनुभव मिळाल्याने या मुलांचा दीपोत्सव आनंदमय झाला. शाहीअभ्यंगस्नान आणि मनसोक्त फराळाचा आनंद घेताना ही मुले भारावून गेली.
पदपथ-सिग्नलवर वस्तू विकणाऱ्या मुलांसाठी ‘ मानवधर्म जोपासणारे अभ्यंगस्नानाचे आयोजन नामदार गोखले रस्त्यावरील गुडलक चौकातकरण्यात आले होते . या अनोख्या उपक्रमाने पदपथावर वस्तू विकणाऱ्या मुलांमुलींची बुधवारची सकाळ सुखद ठरली. खेळण्या-बागडण्याचे आणि शिकण्याचे वय असतानाही परिस्थितीने पोटाची खळगी भरण्यासाठी दररोजची सकाळ रोजगारासाठीच उजाडते. ना दसरा ना दिवाळी असे खडतर जीवन जगणाऱ्या या मुलांना आपल्याप्रमाणेच दिवाळीचा आनंद लुटता यावा, यासाठी बागुल पिता-पुत्र आणि मित्रपरिवाराने गेल्या नऊ वर्षांपासून हा उपक्रम हाती घेतला आहे. शाही अभ्यंगस्नानानंतर या मुलांना नवे कपडे, फराळ आणि फटाके अशी मेजवानी मिळाल्याने मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. तर या आनंदमय सोहळ्याने बालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
कार्यकर्त्यांकडून परिसराची स्वछता करून येथे रांगोळ्यांचा सडा घालण्यात आला होता. त्यावर पाट मांडून प्रत्येक मुलाला उटणे लावून स्नान घालण्यात आले. त्यानंतर औक्षण करून, नवे कपडे आणि फराळ देण्यात आला. आबा बागुल,अमित बागुल, घनश्याम सावंत, नंदकुमार कोंढाळकर,महेश ढवळे,सागर आरोळे, राहुल बागूल, इम्तियाज तांबोळी,समीर शिंदे,सुरेश गायकवाड, सुरज सोनावणे,लक्ष्मण कुतवळ, ओंकार साळवे,अभिषेक बागुल, विश्वास दिघे,संजय भगत,नितीन गोरे, रवी मोरे,राजू देवेंद्र, सचिन महांगडे,राहुल तौर आणि समस्त बागुल कुटुंबियांसह कार्यकर्त्याकडून या मुलांना सुवासिक तेल-उटणे लावून मंगलमय वातारणात झालेला अभ्यंगस्नानाचा हा सोहळा रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत होता आणि नागरिकही त्यात सहभागी होत होते.

