बीड -येळंब घाट परिसरामध्ये प्रेयसीवर अॅसिड आणि पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली. यानंतर जखमी अवस्थेमध्ये पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. आता यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत या प्रकरणात तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे.
‘एका तरुणीला अॅसिड आणि पेट्रोल टाकून जाळले गेले, 12 तास ती रस्त्यावर तशीच पडून होती आणि तिचा मृत्यू झाला. ही घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. राज्यात सातत्याने महिला अत्याचारात वाढ होते आहे. राज्य सरकारने या प्रकरणात तातडीने कठोर कारवाई करावी.’ असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारला तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तरुणी नांदेड जिल्ह्यातील शेळगावची रहिवासी होती. ती शुक्रवारी संध्याकाळी पुण्यावरुन एका तरुणासोबत आपल्या घरी जाण्यासाठी निघाली होती. तरुणाने तिला मध्यरात्री 2-3 वाजेच्या सुमारास येळंब घाट परिसरातील निर्मनुष्य ठिकाणी नेले आणि अॅसिड आणि पेट्रोल टाकून जिवंत जाळले.ही घटना घडल्यानंतर 12 तास तरुणी रस्त्याच्या बाजूच्या खड्यात तडफडत होती.
दुपारच्या सुमारास रस्त्यावरून जाणाऱ्यांना आवाज आल्याने त्यांनी खड्ड्यात पाहिले. यावेळी त्यांना तरुणी अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आली होती. त्यांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत, तरुणीला रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी सांगितले की, आरोपीचे नाव अविनाश राजुरे आहे. सध्या तो फरार असून, त्याचा शोध सुरू आहे. आरोपीविरोधात भा. दं. वि. कलम 326A आणि 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

