मुंबई-पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत केलेल्या वक्तव्याविरोधात आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. त्याला जशास तसं उत्तर देण्याचा इशारा भाजपनं दिल्यानं संघर्ष अटळ असल्याचं म्हटलं. ‘सागर’ बंगल्यावर मोर्चा नेण्याच्या निर्णयावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ठाम होते. आम्ही 100 ते 150 कार्यकर्त्यांसह आंदोलन करणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. त्यानंतर आंदोलन करू पाहणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सागर बंगल्यावर करण्यात येणारे आंदोलन अखेर स्थगित करण्यात आलेले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात घोषणा केली. काँग्रेसला शांततेच्या मार्गाने आंदोलन करायचे होते. पण भाजपने आक्रमक कार्यकर्ते रस्त्यावर उतरवून मुंबईतील वाहतूक रोखून धरली आहे. त्यामुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत. त्यामुळे आम्ही तात्पुरते हे आंदोलन मागे घेत आहेत. पण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून भाजप खासदारांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात येईल, असे नाना पटोले यांनी सांगितले.काँग्रेसच्या आजच्या आंदोलनात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप हेदेखील सहभागी झाले.काँग्रेसचे मुख्यप्रवक्ते अतुल लोंढे तोंडावर हाथ ठेवून लोंढेंना पोलीस गाडीत बसवण्यात आले आणि आंदोलनस्थळावरून पुढे नेण्यात आलं.
पोलिसांनी आज सकाळपासूनच सागर बंगल्याच्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. पोलिसांच्या प्रचंड फौजफाट्यामुळे भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सागर बंगल्यापर्यंत पोहोचता आलेले नाही. त्यामुळे याठिकाणी होणारा संभाव्य संघर्ष टळला आहे. आमचे अनेक कार्यकर्ते एकएकटे सागर बंगल्याच्या परिसरात पोहोचले होते. पोलिसांनी त्यांना अटकही केली. यानिमित्ताने आम्हाला भाजपचा महाराष्ट्रद्वेष्टा चेहरा सगळ्यांसमोर आणण्यात यश मिळाले, असेही नाना पटोले यांनी म्हटले. पोलिसांनी नाना पटोले यांना त्यांच्या बंगल्याबाहेरच रोखून धरले होते काँग्रेसला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपनेही मोठी मोर्चेबांधणी केली होती. भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष मंगलप्रभात लोढा हे सकाळपासूनच भाजपच्या मोजक्या कार्यकर्त्यांसह सागर बंगल्यावर ठाण मांडून आहेत. मात्र, त्यांच्याशिवाय भाजपच्या अन्य कार्यकर्त्यांना सागर बंगल्यावर पोहोचण्यात यश आले नाही. पोलिसांनी आशिष शेलार, राम कदम, प्रसाद लाड आणि खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासह अन्य भाजप नेत्यांना बाबूलनाथ परिसरातच रोखून धरले होते. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करायला सुरुवात केली. या सगळ्यामुळे हाजीआली, ग्रँट रोड, गिरगाव चौपाटी, केम्प्स कॉर्नर, मलबार हिल या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

