राज्यातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस अतिशय गंभीर होत असताना दिसत आहे. देशभरातील सर्वात जास्त रुग्ण हे महाराष्ट्रात आहे. दरम्यान मनसेकडून महत्त्वाची मागणी करण्यात आली आहे. निवडणुका असणाऱ्या राज्यांमधून येणाऱ्या नागरिकांवर त्वरित कडक निर्बंध लावण्यात यावे असे मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले आहेत.
बाळा नांदगावकर ट्विट करत म्हणाले की, ‘राज्य सरकारने बंगाल, तामिळनाडू, केरळ येथून येणाऱ्या नागरिकांवर त्वरित कडक निर्बंध लावणे गरजेचे आहे. कारण तिथे निवडणुकी दरम्यान सगळे नियम झुगारल्याने येणारे नागरिक हे सुपर स्प्रेडर ठरू शकता. याबाबत वेळीच नियोजन करणे अतिशय गरजेचे आहे.’
दरम्यान यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना परिस्थितीला परप्रांतीय जबाबदार असल्याचे म्हटले होते. राज ठाकरे म्हणाले होते की, इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोना रुग्ण सर्वाधिक आहेत. कारण राज्यात बाहरेच्या राज्यातून येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. बाहेरुन किती लोक येत आहेत यांची नोंद व्हायला हवी अशी मागणीही त्यांनी केली होती.
पाच राज्यात सुरू आहेत निवडणुका
देशातील पाच राज्यांमध्ये सध्या विधानसभा निवडणुका सुरू आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रचार सभा घेतल्या जात आहे. यामध्ये प्रचंड गर्दी होत आहे. कोरोनाच्या कोणत्याही नियमांचे पालन या ठिकाणी होत असल्याचे दिसत नाही. यामुळे जर येथील नागरिक आपल्या राज्यात आले तर कोरोनाचा धोका आणखी वाढू शकतो अशी भीती मनसेने व्यक्त केली आहे.

