नवी दिल्ली, दि. 4 : पुणे आणि परिसरात लहान, मध्यम आणि अवजड उद्योगांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे पुण्याचे झपाट्याने शहरीकरण होत असून, रोजगारासाठी अन्य जिल्ह्यातून पुण्यात होणारे स्थलांतरही वाढले आहे. त्याचा ताण शहरातील पायाभूत सुविधांवर होत आहे. शहरीतील वाहतुकीची स्थिती देखील चिंताजनक होत असल्याने पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील सर्व विस्तार प्रकल्प तातडीने सुरू करावेत, असा मुद्दा भारतीय जनता पक्षाचे खासदार गिरीश बापट यांनी नियम ३७७ अंतर्गत लोकसभेत मांडला.
पुण्यातील मेट्रोचा पहिला टप्पा पूर्णत्वास आला आहे. महाराष्ट्र मेट्रोने फेज 2 साठी सर्वेक्षण आणि नियोजन सुरू केले आहे, असे निदर्शनास आणून देताना खासदार बापट यांनी सध्याच्या 33.1 किमी मेट्रो मार्गांचे काम लवकरच पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त केला. तसेच दुसऱ्या टप्प्यातील 82.5 किमी लांबीचे मार्गाचा विस्तार करण्यासाठी अहवाल (डीपीआर) तातडीने करण्याची गरज असल्याचे नमूद केले. यामधे वनाज ते चांदणी चौक (1.5 किमी), रामवाडी ते वाघोली (12 किमी), हडपसर ते खराडी (5 कि.मी.), स्वारगेट ते हडपसर (7 किमी), खडकवासला ते स्वारगेट (13 किमी) आणि एसएनडीटी ते वारजे (8 किमी) तसेच पीसीएमसी ते निगडी ४.४१ किमी आणि स्वारगेट ते कात्रज ५.४६ किलो मीटरचा सर्वेक्षण अहवाल मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे.
पुणे आणि त्याभोवतालाचे अलीकडच्या काळात झपाट्याने होत असलेल्या शहरीकरणामुळे पुणे शहराच्या प्रवासाच्या पायाभूत सुविधांवर ताण आला आहे. लहान, मध्यम आणि अवजड उद्योगांच्या वाढीमुळे शहरातील वाहतूक चिंताजनक दराने वाढत आहे. अपघातांचे प्रमाणही वाढते आहे. त्यामुळे पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे काम जलद गतीने सुरू करण्याची गरज आहे. यातून वाहतूक कोंडीची चिंताजनक परिस्थिती कमी करण्यासाठी मदत होईल. त्यामुळे गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री यांना विनंती करतो की, फेज-2 पुणे मेट्रोचे सर्व प्रकल्पांना मंजुरी देऊन त्याचे काम जलद गतीने सुरू करण्यासाठी कार्यवाही करावी, असे खासदार बापट यांनी म्हटले आहे.

