मुंबई: राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या जवळपास सर्व मागण्या मान्य झाल्या असतानाही कुठली तरी अज्ञात शक्ती त्यांना चिथावणी देण्याचा प्रयत्न करत आहे. या माध्यमातून महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. राज्य शासनात विलिनीकरणाची मागणी नाकारल्यामुळे संतापलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी धडक दिली. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी अत्यंत आक्रमक पद्धतीने आंदोलन आणि घोषणाबाजी केली. इतक्या मोठ्या संख्येने आंदोलक कोणालाही पत्ता न लागू देता सिल्व्हर ओकवर पोहोचलेच कसे, याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी म्हटले की, एसटी संपाच्याबाबतीत सरकारने मार्ग काढण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या. न्यायालयाचा निर्णयही त्याच पद्धतीने लागला. त्यानंतरही कुठलीतरी एक अज्ञात शक्ती वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. विशिष्ट गटाला चिथावणी देऊन आज जे कृत्य घडले आहे, त्यासाठी सातत्याने हालचाली सुरु आहेत. हे लोक वारंवार अशी कृत्यं घडवू पाहत आहेत. शरद पवार यांच्यासारख्या लोकशाही मानणाऱ्या नेत्याच्या घरावर हल्ला होणे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. सुप्रिया सुळे या आंदोलकांना निर्भयपणे सामोऱ्या गेल्या. त्यांनी चर्चा करण्याची तयारीही दाखवली. मात्र, समोरून ज्या प्रकारची भाषा आणि वर्तन सुरु होत, त्यावरून या आंदोलनाचे नेते कोण आहेत, त्यांचे संस्कार तपासावे लागतील. महाराष्ट्रात अशा आंदोलनांना स्थान असता कामा नये, असेही संजय राऊत यांनी म्हटले.
आंदोलकांना कोणीतरी चिथावलंय, अज्ञात शक्तीकंडून महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न: राऊत
Date:

