मुंबई– मध्य प्रदेशच्या धर्तीवर विधानपरिषदेवर घेऊन मंत्रिपदे द्या अशी मागणी महंत अनिकेत शास्त्री यांनी केली आहे. त्यासाठी महंत लवकरच राज्यपालांनी भेट घेणार आहेत. यावर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली. मंत्रिपदाची मागणी करणाऱ्या साधू-महंतांनी श्री कृष्णाचा संदेश लक्षात ठेवावा असेही ते म्हणाले.नाशिकमधल्या साधू संतांनीही आता मंत्रिपदाची मागणी केली आहे.
यावेळी सचिन सावंत यांनी मंत्रिपदाची मागणी करणाऱ्या महंतांना श्री कृष्णाने सांगितलेला एक श्लोक समजून सांगितले. स्वतःला साधू, महंत संन्यासी म्हणवणाऱ्यांनी श्री कृष्णाने दिलेल्या संदेशाच्या विपरीत मागणी केली असल्याचे सावंत म्हणाले.
सावंत यांनी श्री कृष्णाच्या ध्यान युगातल्या चौथ्या चरणातील एका श्लोकाचा अर्थ सांगत महंतांना उत्तर दिले. जो भौतिक कामनांचा त्याग करतो, जो कुठलीही आसक्ती ठेवत नाही, इंद्रिय सुखासाठी कर्म करत नाही तो योगारूढ झाला असे समजावे, असे श्री कृष्णाने सांगितले आहे. त्यामुळे भौतिक कामनांसाठी करत असलेल्या मागण्या भगवान श्री कृष्णाच्या संदेशाच्या विपरीत आहेत, असेही सचिन सावंत म्हणाले.

