मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेशी संवाद साधला. थंडी वाढत असल्यानं करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं दिसून येत आहे, असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला सर्तक राहण्याचं आवाहन केलं. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यात करोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली आहे.
राज्यातील करोना परिस्थिती व सण उत्सव साजरे करण्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित केलं. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले,”दिल्लीत प्रदूषण वाढलेलं आहे. करोना आपल्या फुफ्फुसावर हल्ला करतो. दिवाळी साजरी करताना नम्र विनंती करतोय. प्रत्येक ठिकाणी बंदी आणून आणि कायदे करून आपलं जीवन चालू ठेवायचं का? मी सुद्धा फटाके वाजवले आहेत. पण, आता परिस्थिती तशी नाही. सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवू नका. रोषणाई जरूर करा. दिवाळी उजळून गेली पाहिजे. पण फटाके न वाजवाल तर उत्तम. सार्वजनिक ठिकाणी वाजवू नको. मी तुमच्यावर आणीबाणी आणत नाही,” असं म्हणत ठाकरे यांनी भाजपाला टोला लगावला.
“आपण सगळे सण साधेपणानं साजरे केले. मागील काही महिन्यात आपण सहकार्य केलं. पुढे दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्याची चिंता आहे. तणाव आहे. सगळे सण आपण अत्यंत संयमानं साजरे केले. गर्दी वाढत चालली आहे. चांगलं आहे. हे जिवंतपणाचं लक्षण आहे. इथेच एक खबरदारी घेण्याची विनंती करायची आहे. मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात करोना वाढत होता. काही जण टीका करत होते. पण आपण हा रुग्णसंख्येचा चढ खाली आणला आहे. दिल्लीत आता आकडा वाढत चालला आहे,” असं मुख्यमंत्री यांनी सांगितलं.
“पाश्चिमात्य देशात अनेक ठिकाणी आकडा कमी होऊन पुन्हा वाढत आहे. ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन करण्यात आला आहे. काही देशात घरातल्या घरातही मास्क वापरायला सक्ती केलेली आहे. थंडी सुरू होतेय. विषाणू पुन्हा वाढतोय. आता ही लाट नाही, त्सुनामी आहे. गेल्या काही दिवसांपासून डॉक्टर, पोलीस लढत आहेत. त्यामुळे दिवाळीनंतरचे १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे आहे,” असं सांगत मुख्यमंत्री ठाकरे यांनी नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं.
मुंबई मेट्रोची आरे कारशेडची जागा कांजूरमार्गला हलवण्यावरून विरोधकांकडून टीका करण्यात येत आहेत. सर्वांची उत्तरं आमच्याकडे आहे. त्यांना योग्य वेळी समर्पक उत्तर देऊ. विरोधकांकडून मिठाघराची जमीन आहे असं सांगून प्रकल्पात मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोणत्याही टीकेची चिंता न करता यावर आम्ही काम करत राहू. जर्मनीच्या कंपनीकडून ५४५ दशलक्ष युरोंचं कंपनीकडून माफक दरात कर्ज घेतलं आहे,” अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
चार दिवसांमुळे गोष्टींवर पाणी फेरलं जाऊ नये
“देशात इतरत्र, मुख्यता दिल्लीत संख्या वाढतेय. याचं कारण दिल्लीत प्रदुषण वाढलंय. त्यानंतर तो विषाणू आपल्या श्वसन संस्थेवर घातक परिणाम करतो. त्यानंतर याचा जास्त त्रास होतो. दिवाळी साजरी करताना खबरदारी घ्यावी. दिवाळीत प्रदुषण करणारे फटाके टाळू शकतो का हे पाहायला पाहिजे. मी कुटुंब प्रमुख या नात्यानं सर्वांना सांगतोय,” असंही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. “आपण आतापर्यंत जे साधलंय त्यावर चार दिवसांमुळे पाणी फेरलं जाऊ नये. सार्वजनिक ठिकाणी प्रदुषण करणं टाळावं,” असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
दिवाळीनंतरचे दिवस महत्त्वाचे
“परिस्थिती आटोक्यात असली असं वाटत असलं तरी दिवाळी आणि दिवाळीनंतरचे काही दिवसही महत्त्वाचे आहे. पाश्चिमात्य देशात पुन्हा संख्या वाढत आहेत. आकडेवारी पाहिली तर मी म्हणेन ही लाट नाही त्सुनामी आहे. अत्यावश्यक सेवांमधील सर्वजण अत्यंत तणावाखाली आपल्यासाठी लढत आहेत. राज्यात पुन्हा लॉकडाउनची वेळ आली तर सर्वासाठीच त्रासदायक ठरेल. करोनाची दुसरी लाट आली तर सर्वांची त्रेधातिरपीट उडू शकते. आपल्याला सुविधा वाढवता येऊ शकतील. पण डॉक्टर्स किंवा त्याविरोधात लढणाऱ्यांची संख्या आपल्याला वाढवता येणार नाहीत. त्यासाठी आपण सर्वांनी खबरदारी घेणं आवश्यक आहे,” असंही त्यांनी सांगितलं.

