शिवसेना नेते व माजी मंत्री रामदास कदम यांनी आज पक्ष नेतेपदाचा राजीनामा दिला. यासंदर्भात पत्र जाहीर करत रामदास कदम यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तसेच, आपली भूमिकाही मांडली आहे. पत्रात रामदास कदम म्हणाले, 3 वर्षांपासून पक्षात तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत आहे. बाळासाहेब ठाकरे असते तर माझ्यावर आज ही वेळ आली नसती. त्यामुळे नेतेपदाचा राजीनामा देत आहे.
शिवसेनाप्रमुखांकडून नियुक्ती
जाहीर केलेल्या पत्रात रामदास कदम यांनी म्हटले आहे की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझी शिवसेना नेतेपदी नियुक्ती केली होती. मात्र, शिवसेना प्रमुखांचे निधन झाल्यानंतर नेते पदाला कुठलीही किंमत राहीली नाही. हे मला वारंवार पहायला मिळालं.
अनेकदा अपमान केला
रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवरही टीका केली आहे. कदम म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेना नेत्यांना विश्वासात घेण्याचं काम त्यांनी कधीच केले नाही. उलटपक्षी मला व माझा मुलगा आमदार योगेश कदम याला अनेक वेळा अपमानीत करण्यात आले.
तोंड दाबून बुक्क्यांचा मार
रामदास कदम यांनी शिवसेनेत होणाऱ्या कुंचबणेबद्दल सांगितले, शिवसेनेत मागील 3 वर्षांपासून तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत आहे. विधानसभेच्या निवडणूकीआधी मला आचानक मातोश्रीत बोलवत आदेश दिले की, यापुढे तुमच्यावर कोणीही कितीही टिका केली तरी मीडियासमोर अजिबात बोलायचे नाही. मिडीयासमोर कुठलेही वक्तव्य करायचे नाही. यामागचं कारण मला आजपर्यंत कळ शकलं नाही.
महाविकास आघाडी चुकीची
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेससोबत केलेल्या आघाडीवरही टीका केली. रामदास कदम म्हणाले, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर राष्ट्रवादी व काँग्रेस सोबतसंघर्ष केला आणि हिंदुत्व टिकवलं. राष्ट्रवादी व काँग्रेससोबत युती करु नका, ती बाळासाहेबांच्या विचाराची प्रतारणा होईल. अशी उद्धव ठाकरेंना विनंती केली होती. पण आपण माझं ऐकलं नाही. याचेही दुःख माझ्या मनामध्ये आहे.

