“हॅलो, काकू माझा आवाज ऐकू येतोय ना ?? अहो, घरात गोंधळ चालू आहे. आम्ही सगळे नातेवाईक रात्री ९ ते १० व्हिडिओ कॉलिंग करतो, सध्या कुणाच्या घरी जाऊ शकत नाही ना…मग अशा प्रकारे सगळे गप्पा मारतो आणि भजन देखील म्हणतो. त्यानिमित्ताने सगळे एकमेकांच्या ‘टच’मध्ये तरी राहतो…इति संपदा. संपदा फोनवर माझ्याशी बोलत होती आणि त्यावेळी मलाही आठवलं की शाळेच्या कट्टा ग्रुपवर प्रदीपने सुद्धा असाच एक मेसेज टाकला आहे – झूम, मिटींग ऍप सगळ्यांनी डाऊनलोड करा, आपण एकत्र गप्पा मारू या…ही अजून एक आयडियाची कल्पना. एकवीस दिवसांचे लॉकडाऊन वाढवल्यावर वेळ कसा घालवायचा यावर बऱ्याच जणांनी एकाहून एक सरस पर्याय हुडकले. खरंच आहे म्हणा, कारण सुरुवातीचे दिवस साफसफाई करण्यात किंवा इतर काहीबाही कामे करण्यातच गेली. परंतु आता १४ एप्रिलपर्यंत घरीच राहायचं म्हणजे…कंटाळवाणी परिस्थिती आणि टीव्हीवर सतत बातम्या पाहून नैराश्य सुद्धा यायला लागलं. त्यावर नवनवीन उपाय शोधण्यात सगळेच गर्क झालेत. अशावेळी आठवणीतील गाणी पुन्हा पुन्हा वाजू लागली तर जुने सिनेमे पुन्हा पाहिले गेले. अडगळीत पडलेल्या अल्बमला फिरून एकदा डोळे भरून पाहून झालं आणि कैक वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा मिळाला. व्हाट्सएपवर तर ‘वेळ कसा घालवायचा’ या विषयावर रोज निरनिराळ्या युक्तींच्या मेसेजचा भडीमार व्हायला लागला. ग्रुपवरील आमच्या एका मित्राने – सतीशने तर आज काय काय करायचं तो दिवस १, २, ३ रा…विश लिस्ट, मेमरी अल्बम, बुक शेल्फ…अशी रोजच्या उपक्रमाची माहिती द्यायला सुरुवात केली. ग्रुपमधून हरेक प्रकारच्या मजेशीर आणि माहितीपूर्ण गोष्टी शेअर केल्या जाऊ लागल्या. कुठलं पुस्तक वाचाल, कुठला सिनेमा, नाटक किंवा वेब सिरीज बघाल याबद्दलची चेकलिस्ट फॉरवर्ड होऊ लागली. बऱ्याच घरांत तर चक्क पुरुष मंडळींनी स्वयंपाकघराचा ताबा घेतला. युट्यूबवर पदार्थ बघून नित्यनवीन डिशेस बनवू लागले (बेसिनमध्ये भांड्यांचा पसारा होऊ लागला तो भाग अलाहिदा!) आणि ते कुकिंगचे व्हिडिओ आपापल्या स्टेटसला ठेवून भरपूर लाईक्सही मिळवू लागले. काही जणांनी घरी भांडी घासतानाचा, केर काढतानाचा व्हिडिओही स्टेटस म्हणून ठेवला. कोरोनापासून बचाव कसा करायचा, घरात बसून करायचे काही व्यायाम प्रकार, रामरक्षा पठण…एक ना अनेक असे नानाविधी आशावादी उपक्रम. त्यातच पंतप्रधानांनी ५ एप्रिलला केलेल्या दिवे लावण्याच्या आवाहनाला समस्त भारतवासीयांनी भरभरून प्रतिसाद दिला. एक एक घरच काय तर सारा आसमंत दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाला. थोडी फार का होईना नैराश्याची मरगळ झटकून निघाली. त्यादिवशी व्हाट्सएप, इंस्टाग्राम, फेसबुक…सगळीकडेच दीपोत्सव साजरा केल्याचे फोटो आणि मेसेजेस फिरत होते.
सध्या मित्रमैत्रिणी, ओळखीपाळखीचे, नातेवाईक यांना फोन करण्यात वेळ जाऊ लागलाय. एवढेच नाही, तर ओळखीतल्या व्यक्तींशी काही कारणाने वा कित्येक दिवस, महिने संपर्क नव्हता त्यांनाही आठवणीने फोन करून त्यांची विचारपूस केली जातेय. बघा हा, हल्ली फोनवर बोलतानाही घाई-गडबड नाही. ‘बोल, बोल लवकर…’ याऐवजी हं…बोल…काय चाललं आहे…” असा निवांतपणाचा सूर आळवला जातोय!
एकंदरीत काय तर सगळेच ‘वेळ कसा घालवायचा’ याचे पर्याय शोधण्यात आणि मग तो वेळ घालवण्यात मग्न आहेत. २१ दिवसांचं लॉकडाऊन याचा अर्थ अगदी गरजेचं असेल तर आणि तरच बाहेर पडायचं आहे, या सरकारच्या आवाहनाला काहींनी हरताळ फासलाय. माझ्या मैत्रिणीने सांगितलेला एक किस्सा तो असा की, तिच्या सोसायटीमधील एक जोडपे जीवनावश्यक वस्तू जवळपास मिळत असतानाही दहिसर ते बोरिवली चालत जाऊन तिकडून मार्केटमधून घेऊन येतात. का? तर त्यांचा इव्हीनिंग वॉकही होतो आणि कंटाळाही जातो. अशा लोकांना काय म्हणावे तेच कळत नाही. आपापल्या माणसांबरोबर क्वालिटी टाइम घालवायचा आहे, पण तो घरात व सुरक्षित राहूनच. काय मग आता घरातच राहणार ना?…आपल्या माणसांबरोबर मस्त कॉफी आणि बऱ्याच काही गप्पागोष्टी…हाच क्वालिटी टाइम!
पूर्णिमा नार्वेकर
पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,
भिकाजी लाड मार्ग,
दहिसर फाटक जवळ,
दहिसर (प.),
मुंबई – 400068


