मुंबई-शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.लवकरच मेगा भरतीचे संकेत दिले. अनेक पक्षाचे कार्यकर्ते आपल्याकडे येत आहेत. तीन पक्ष एकत्र आल्याने आगामी काळात एकाच पक्षातून इनकमिंग होणार असल्याचा दावा राऊत यांनी केला. तसेच, महाराष्ट्राचं नेतृत्व तीन पक्षाच्या नेत्यांनी करायचं ठरवलं आहे. आमचा एकही आमदार फुटणार नाही असं विरोधक म्हणत आहे. पण थोडे दिवस थांबा, काय काय होतंय दिसेल. भविष्यात ज्या घडामोडी घडतील त्याच्या भूकंपाचं केंद्रबिंदू शिवेसेनाभवन असेल, असा दावाही त्यांनी केला.ते म्हनाले,’ कुठल्याही गोष्टीत टीका करण्याची भाजपची जुनीच सवय आहे. भाजपचे काही लोक त्यात आघाडीवर असतात, अशा लोकांना भारतरत्न पुरस्कारच दिला पाहिजे, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. तसेच, भविष्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देशाचे पंतप्रधान होणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला.
संजय राऊत पुढे म्हणाले की, भाजपचे काही लोक टीका करत आहेत. कोणत्याही विषयावर ते टीका करत असतात. टीका करणाऱ्या भाजपच्या काही लोकांना भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे. भाजपमधील काही लोकांना पीएचडी तर काहींना डीलिट दिली पाहिजे. त्यांना लोकं मारायची आहेत. मुख्यमंत्र्यांना लोकांचा जीव वाचवायचा आहे. संचारबंदी लावण्याचा मुख्यमंत्र्यांना आनंद होत नाही, तुमचा जीव वाचावा म्हणून त्यांनी संचारबंदी लागू केली आहे, अशी प्रतिक्रिया राऊथ यांनी यावेळी दिली.
‘देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेक महिन्यांपासून परदेशात गेले नाहीत. त्यामुळे परदेशात कोरोनाची काय स्थिती आहे हे भाजपवाल्यांना कळणार नाही. जरा परदेशात काय चाललं ते पाहा. ब्रिटनमधून होणारी विमानसेवा 42 देशांनी बंद केली आहे. कशासाठी केली आहे? काही कळतं का भाजपला?’, असा सवालही त्यांनी यावेळी केला.
शेतकरी आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा
नवीन कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरही राऊत यांनी भाष्य केले. दिल्लीतील शेतकरी आंदोलनामुळे केंद्र सरकार हतबल झाले आहे. गेल्या 50 वर्षात इतके हतबल सरकार कधीही दिसले नव्हते. या आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा आहे. पण, हे आंदोलन राजकारणविरहीत असल्यामुळे शिवसेना या आंदोलनात सहभागी होत नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

