आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर; तत्काळ अंमलबजावणीची मागणी
मुखमंत्री फडणवीसांचा जाहीर सत्कार; आठवले, मुंडे, रावतेंची उपस्थिती
पुणे : राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने येत्या 5 मार्च रोजी मुंबईमध्ये शिवाजी पार्क मैदानावर महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महामेळाव्याला प्रमुख उपस्थिती असणार आहे. महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजाबरोबरच मुस्लिम आरक्षणप्रश्नी अंतिम निर्णय घ्यावा आणि लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाला पाच जागा द्याव्यात या प्रमुख मागण्यांबरोबरच इतर अनेक मागण्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आज झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आल्या. रासपचे प्रवक्ते प्रा. लक्ष्मण हाके यांनी आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत महामेळावा व मागण्यांसंदर्भात माहिती दिली.
राषपच्या वतीने आयोजित महामेळाव्याला पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे व शिवसेना नेते व परिवहनमंत्री दिवाकर रावते उपस्थित राहणार आहेत. महामेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
महामेळाव्याच्या निमित्ताने पक्षाच्या वतीने सरकारकडे प्रमुख मागण्याही करण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व शिवसेनेमध्ये जागा वाटप निश्चित झाले. रासप हा भाजपाचा मित्र पक्ष आहे. येणाऱ्या लोकसभेत रासपला किमान पाच जागा द्याव्यात अशी पक्षाची भूमिका आहे, असे प्रा. हाके यांनी सांगितले. यावेळी पक्षाच्या सरचिटणीस डॉ. उज्ज्वला हाके, अॅड. संजय माने, महिला आघाडी प्रदेश सचिव अॅड. वंदना हाके, पुणे जिल्हा महिला अध्यक्षा विद्या हांडे, सुनिता किरवे, भरत महानवर आदी मान्यवर उपस्थित होते.
रासपच्या वतीने धनगर समाजाचे आरक्षण तत्काळ लागू करून त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी केली असून या महामेळाव्यात त्यासंदर्भात ठोस घोषणा करावी, महात्मा फुले व सावित्रीबाईंना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, त्याचबरोबर मुस्लिम समाजास आरक्षण द्यावे, ओबीसी समाजाची जनगणना करून आरक्षणाची फेररचना करावी, सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचं नाव द्यावं आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. तसेच, मराठा व आर्थिकदृष्ट्या गरीब घटकांस आरक्षण दिल्याप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार या महामेळाव्यात करण्यात येणार आहे, असे प्रा. हाके यांनी सांगितले.

