मुंबई किनारा रस्ता प्रकल्प मुंबईकरांच्या जीवनाला गती देणारा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Date:

मुंबई, दि. 10 :- मुंबई किनारी रस्ता प्रकल्प हे सर्व मुंबईकरांचे स्वप्न आहे. मुंबईकरांच्या जीवनाला गती देणाऱया या प्रकल्पाचे बांधकाम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मेहनतीने आणि चिकाटीने करण्यात येत आहे. ठरलेल्या कालावधीत हा प्रकल्प पूर्ण होईल, याचा मला आत्मविश्वास असून प्रकल्पाच्या पहिल्या बोगद्याचे खणन जलदगतीने पूर्ण होणे, ही त्याची पोचपावतीच आहे, असे उद्गार राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काढले.

मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (कोस्टल रोड) बांधकामात, पॅकेज ४ अंतर्गत प्रियदर्शिनी पार्क ते छोटा चौपाटी दरम्यान २.०७० किलोमीटर अंतराचा बोगदा दोन्ही बाजूने बांधण्यात येत आहे. पैकी मरिन ड्राइव्हकडे जाणाऱया वाहतुकीसाठी वापरात येणाऱया पहिल्या बोगद्याचे खणन आज (दिनांक १० जानेवारी २०२२) पूर्ण झाले. त्याप्रसंगी आयोजित ‘ऑनलाईन’ समारंभात मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे हे दूरदृश्य प्रणाली (व्हिडिओ कॉन्फरन्स) द्वारे बोलत होते.

राज्याचे पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे, स्थानिक खासदार श्री. अरविंद सावंत, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, प्रभाग समिती अध्यक्ष श्रीमती मीनल पटेल हे देखील दूरदृश्य प्रणाली (व्हिडिओ कॉन्फरन्स) द्वारे यावेळी सहभागी झाले होते. तर मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी किशोर पेडणेकर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्‍त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे आदी मान्यवर प्रत्यक्ष स्थळी म्हणजे स्वराज्यभूमी (गिरगांव चौपाटी) येथे उपस्थित होते. तसेच, उपआयुक्त (विशेष अभियांत्रिकी) श्री. अजय राठोर, संचालक (भूसंपादन) श्री. अनिल वानखडे, प्रमुख अभियंता (किनारी रस्ता) श्री. विजय निघोट यांच्यासह कंत्राटदार एल ऍण्ड टी यांच्या वतीने प्रकल्पाचे व्यवस्थापक श्री. संदीप सिंग, बोगदा बांधकाम व्यवस्थापक श्री. संतोष सिंग, सल्लागार कंपनी मेसर्स यूशीन कन्सल्टंटच्या वतीने बोगदा बांधकाम व्यवस्थापक श्री. नॅमकाक चो हेही उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे संबोधित करताना म्हणाले की, मावळा नावाचे बोगदा खणन करणारे संयंत्र त्याच्या नावाला साजेसे काम करीत असून त्याच शिस्तीने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन देखील या प्रकल्पाचे बांधकाम करीत आहे. नैसर्गिक वादळांसह कोविड संसर्गाचे संकट व त्यामुळे उद्भवलेली टाळेबंदी सारखी परिस्थिती यांना खंबीरपणे सामोरे जावून अविरतपणे प्रकल्पाचे बांधकाम सुरु आहे. समुद्राखालून दोन टोकं जोडण्याचे काम करण्यात मावळा संयंत्र यशस्वी झाले आहे. किनारा रस्ता प्रकल्प हे एकप्रकारे मुंबईचे स्वप्नं आहे. फक्त रस्ता बांधून न थांबता त्याच्या भोवती रमणीय व प्रेक्षणीय जागा विकसित केल्या जाणार आहेत. या प्रकल्पाच्या बांधकामात अनेक आव्हाने आहेत. मात्र महानगरपालिकेने ही आव्हाने स्वीकारुन मुंबईकरांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने दमदार वाटचाल सुरु ठेवली आहे. प्रकल्प निर्मितीसाठी राज्य सरकारकडून पूर्ण सहकार्य व पाठबळ मिळेल, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.

मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे म्हणाले की, किनारा रस्त्याच्या पहिल्या बोगद्याचे खणन आज पूर्ण झाले असून हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण हे काम आत्यंतिक कठिण स्वरुपाचे असून ते यशस्वीरित्या वर्षभराच्या आत पार पाडणे, ही विक्रमी स्वरुपाची कामगिरी आहे. वर्षभरापूर्वी मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते किनारा रस्त्याच्या पहिल्या बोगद्याच्या कामास शुभारंभ करण्यात आला होता. आता दुसऱया बोगद्याचे काम एप्रिल २०२२ मध्ये सुरु होईल. केवळ बोगदाच नव्हे तर संपूर्ण प्रकल्प वेळेत पूर्ण होईल, याचा विश्वास आहे. मुंबईकरांचे राहणीमान सुखकर करण्याच्या दृष्टीने अर्थात इज ऑफ लिविंगसाठी विविध कामे मुंबई महानगरात सुरु आहेत. गोरेगाव-मुलूंड जोडरस्ता, पारबंदर प्रकल्प (एमटीएचएल), मुंबई मेट्रो या सर्व प्रकल्पांसह मुंबई कोस्टल रोडमध्ये देखील महानगराचा विकास पुढे नेण्याची मोठी क्षमता आहे, असेही श्री. आदित्य ठाकरे यांनी नमूद केले.

मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, महानगरपालिकेने जे जे ठरवले, ते सर्व प्रकल्प पूर्ण करुन दाखवण्याची आमची परंपरा आहे आणि किनारा रस्ता त्याला अपवाद नाही. फक्त देशात नव्हे तर जगात देखील हा प्रकल्प नावाजला जाईल, अशा रितीने पूर्ण करुन लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल करु. टाळेबंदीच्या काळातही एकही दिवस या प्रकल्पाचे काम थांबले नाही आणि इतिहासात नोंद होण्याजोगी कामगिरी करुन हा प्रकल्प वेगाने पुढे सरकतो आहे, असे महापौरांनी सांगितले. पक्षप्रमुख पदी असताना श्री. उद्धवजी ठाकरे यांनी या प्रकल्पाची संकल्पना मांडली होती आणि आता मुख्यमंत्री रुपाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या पाठबळाने हा प्रकल्प साकारतो आहे. त्यासाठी, संपूर्ण मुंबईकर जनतेच्या वतीने महापौर या नात्याने, मुख्यमंत्री महोदय व पालकमंत्री महोदयांना धन्यवाद देत असल्याचे महापौरांनी अखेरीस नमूद केले.

महानगरपालिका आयुक्‍त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी सांगितले की, मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते दिनांक ११ जानेवारी २०२१ रोजी पहिल्या बोगद्याच्या कामाचा शुभारंभ झाला होता आणि त्यास वर्ष होण्यास एक दिवस शिल्लक असताना म्हणजे ३६४ दिवसांमध्ये या बोगद्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. ही विक्रमी कामगिरी असून संपूर्ण प्रकल्पाचे कामही वेळेत पूर्ण होईल, असा विश्वासही डॉ. चहल यांनी दिला.

तत्पूर्वी, महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांच्या हस्ते पूजन व घंटानाद करण्यात आले. त्यानंतर ‘मावळा’ या बोगदा खणन संयंत्र (टीबीएम) ने बोगद्यातून बाहेर येत ‘ब्रेक थ्रू’ पूर्ण केला. दरम्यान, कोविड संसर्गाची परिस्थिती लक्षात घेता, हा कार्यक्रम पूर्णपणे दूरदृश्य प्रणालीद्वारे ऑनलाईन आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमती स्मिता गवाणकर यांनी केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात अजीत पवारच ‘दादा’.. मविआ चा सुपडा साफ

पुणे -आज झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यातील 17 पैकी 9 पालिकांमध्ये...

चारित्र्यवान व्यक्तींची साथ-संगत अन्‌ आव्हाने स्वीकारल्याने यशाची प्राप्ती : सचिन ईटकर

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सचिन ईटकर यांचा जिंदादिल पुरस्काराने गौरव पुणे :...

पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही : अमोल पालेकर..

आयुष्याविषयी ठाम भूमिकेमुळे आज मी तृप्त आहे : अमोल पालेकर पुणे : भाग्य या संकल्पनेवर माझा विश्वास नाही. चित्रपट, नाट्य क्षेत्रात अभिनय करताना संवेदनशीलता, भावनात्मक मोकळेपणा जपत राहिलो. कोणत्याही एका साचेबद्ध भूमिकेत न अडकता अभिनयात वैविध्य देण्याचा माझा स्वभाव, नवेपणा स्वीकारण्याची इच्छा असल्यानेच मी खलनायकी भूमिकाही साकारल्या.  त्यामुळेच खलनायकी भूमिकेतही अभिनयातून सच्चेपणाच मांडत गेलो. आयुष्याच्या वाटेवर कुठे थांबायचे, कुठे बदल करायचे याविषयी माझ्या ठाम भूमिका असल्यामुळे आज मी जो आहे तो तृप्त आहे, अशा भावना सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी व्यक्त केल्या. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या (दि. 21) पहिल्या सत्रात अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांच्याशी उत्तरा मोने यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अमोल पालेकर यांच्या असंख्य चाहत्यांच्या प्रतिसादात ही मुलाखत रंगली. अमोल पालेकर पुढे म्हणाले, अभिनेता म्हणून रसिकांनी मला भरभरून प्रेम दिले, तसेच प्रेम माझ्या साहित्यकृतीला मिळेल हा विश्वास मला होता. ज्यांना माझे विचार पटत नाहीत त्यांना पलटवार करण्याची संधी मिळेल असे वाटले होते; परंतु ते प्रमाण खूपच कमी असल्याने त्यांची दखल घेण्याची गरज पडली नाही. माझ्या भूमिका रसिकांना आवडल्या याचे श्रेय माझ्या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना द्यावे लागेल कारण त्यांनी माझे व्यक्तिमत्व फुलविण्याची संधी दिली. मी मुळचा मुंबईचा असलो तरी आजची मुंबई मला परकी वाटते. मुंबईत ओळखीच्या ठिकाणीजाताना आज मी गुगल मॅपच्या मदतीशिवाय पोहोचू शकत नाही. परंतु गेली 25 वर्षे पुण्यात स्थायिक असल्याने पुणे खूप बदलले नाही असे मला जाणवते. त्यामुळे पुण्यात रमलो. मी पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही, अशी टिप्पणीही अमोल पालेकर यांनी केली. पालेकर पुढे म्हणाले, माझ्यातील चित्रकार कुठल्याही इझममध्ये किंवा ठराविक विचारात अडकलेला नाही. त्यामुळे मी चित्रातून प्रकटीकरण करताना अमूर्त शैलीचा वापर करतो. दिग्दर्शकाच्या भूमिकेत असताना माझ्यातील चित्रकार जागा असल्यामुळे मला दृश्यात्मक परिणामांवर विशेष लक्ष द्यावे असे वाटते. त्यामुळे माझ्या चित्रपटांमध्ये दृश्यात्मक बटबटीतपणा कधीच आला नाही. चित्रिकरणाचा विचार पटकथेपासूनच केला जातो. त्यामुळे प्रकाश योजना, नेपथ्य, ऋतु यांविषयी सखोल विचार करून चित्रपट निर्मिती केली जाते. लहानपणापासूनच घरामध्ये वाचन संस्कृती रुजलेली असल्यामुळे मला साहित्यविषयक गोडी लागली. यातूनच माझ्या हातून ऐवजसारखी साहित्यकृती निर्माण झाली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी विचार ठाम : संध्या गोखले.. आपल्या घरातील नायक अशी ओळख असलेल्या अमोल पालेकर यांनी चित्रपटात नायक साकारताना समकालीन प्रसिद्ध नायकांपेक्षा वेगळेपण दर्शविल्याने ते सामान्यांचा नायक म्हणून आपला ठसा उमटविण्यात यशस्वी झाले, असे सांगून संध्या गोखले म्हणाल्या, खऱ्या आयुष्यातही अमोल पालेकर एक शांत, समंजस, विचारी, संवेदनशील आणि सहनशील व्यक्ती आहेत. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी त्यांचे व माझे काही ठाम विचारही आहेत. त्यासाठी आम्ही सातत्याने लढा देत आहोत. पुण्यात कला क्षेत्रात पूरक वातावरण असल्यामुळे आमच्या हातून कला क्षेत्रात विविध उपक्रम घडले.