महाराष्ट्रात विजेच्या टंचाईसोबतच लोडशेडींग नावाचा प्रकार आता पूर्णपणे संपुष्टात आला आहे. भर उन्हाळ्यात सुमारे 23,700 मेगावॉट विजेची राज्यातील उच्चांकी मागणी ही एकाच वेळी पारेषण व वितरण यंत्रणेतून यशस्वीपणे वहन करून गेल्या 23 एप्रिल रोजी पूर्ण केली आहे. विजेची उपलब्धता वाढत असली तरी पारंपरिक पद्धतीच्या वीजनिर्मितीचे इंधन संपुष्टात येत असल्यामुळे अपारंपरिक व विशेषतः सौर उर्जा निर्मितीला वेग देण्यात येत आहे. सध्या राज्यात विजेचा पुरवठा मागणीनुसार उपलब्ध असला तरी वीजबचतीचे राष्ट्रीय कर्तव्य सर्वांनी बजावणे ही काळाची गरज आहे.
महावितरण कंपनीचे कार्यक्षेत्र असलेल्या मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रात 2 कोटी 49 लाख वीजग्राहक आहेत. यामधील सर्वाधिक 74 टक्के घरगुती वीजग्राहक सुमारे 21 टक्के विजेचा वापर करतात सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत अन्न, हवा व पाणी यांची गरज असते तेवढीच गरज आता विजेची झालेली आहे. दैनंदिन कामातील कित्येक कामे ही विजेवरच अवलंबून असतात. अशा स्थितीत वीजबचतीचे काही साधारण उपाय केले तरी साहजिकच विजेची अन् पैशाचीही बचत होते.
केंद्ग शासनाच्या उजाला योजनेतून वीजग्राहकांना एलईडी (लाईट एमिटिंग डायोड) बल्बची विक्री सुरु आहे. पारंपरिक बल्बचे आयुष्य सुमारे 5 हजार तास तर एलईडी बल्बचे आयुष्य तब्बल एक लाख तास एवढे असते. ऑफीस किंवा उंच इमारतीमध्ये एलईडी बल्ब वापरल्याने देखभालीचा खर्च कमी येतो. पारंपरिक बल्बच्या तुलनेत एलईडी बल्ब वापरल्यास 80 टक्के वीजबचत होऊ शकते. या एलईडी बल्बच्या वापरातून राज्यभरात एका वर्षात वीजबचतीचे इतरही मोठे फायदे दृष्टीक्षेपात आलेले आहेत. महाराष्ट्रात 2 कोटी 71 लाख 63 हजार एलईडी बल्बची विक्री करण्यात आली आहे. या बल्बच्या वापरामुळे एका वर्षात तब्बल 280 दशलक्ष युनिट, सुमारे 1131 कोटी रुपयांचा खर्च, 22 लाख 89 हजार मेट्रीक टन कोळसा अशी बचत झाली आहे. याशिवाय विजेच्या सर्वाधिक मागणीच्या काळात 566 मेगावॉटने घट झाली आहे. राज्यात पुणे शहरात सर्वाधिक 30 लाख तर ग्रामीण भागात 9 लाख 30 हजार एलईडी बल्बची खरेदी करण्यात आली हे येथे उल्लेखनीय. (आकडेवारी 5 मे 2018 पर्यंत)
विजेच्या बचतीसाठी भरपूर असलेल्या सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करणे महत्वाचे. दिवसा सूर्यप्रकाश वापरात येईल यावर भर देता येईल. घराची सजावट व खिडक्यांची पडदे फिकट रंगाचे असणे वीजबचतीसाठी उपयुक्त आहे. ज्यावेळी उपयोगात नसतील तेव्हा घरातील विद्युत उपकरणे व लाईट बंद करणे आवश्यक आहे. यातही महत्वाचे ते पंखे. ज्या उपकरणांमध्ये कॉईलचा वापर केला जातो ती सर्वच उपकरणे वीज अधिक खातात. त्यात आघाडीवर आहे पंखा. त्यामुळे पंख्याला गरज नसताना विश्रांती देणे आवश्यकच. बर्याचदा देव्हार्यात किंवा नाईट लॅम्प म्हणून झिरो बल्बचा पूर्वीपासून वापर होत आहे. झिरो बल्बऐवजी आता आवश्यकतेनुसार योग्य क्षमतेचे एलईडीचे बल्ब लावणे आवश्यक आहे.
वीजबिलाचा सुमारे 90 टक्के भाग व्यापणारी घरातील उपकरणे म्हणजे पंखे, एअर कंडिशनर, गीझर, वाशिंग मशिन, इस्त्री, रेफ्रिजरेटर, मायक्रोव्हेव ओव्हन, ज्युसर, फूड प्रोसेसर, मिक्सर, ग्राईंडर, कॉम्प्युटर्स, चार्जर, व्हॅक्यूम क्लिनर अशा उपकरणांचा समावेश होतो. ही उपकरणे वीजबचतीच्या जाणीवेनं वापरात आणली तर निश्चितच वीजबचतीला मोठा वाव आहे अन् उपायही अगदी साधे.
वर्षभरातील घरगुती एकूण वीजवापरातील 25 टक्के वीज एकाच रेफ्रिजरेटरला लागते. त्यामुळे फ्रिजमधून वस्तु काढताना एकदाच काढाव्यात. दरवाजा सतत उघडावा लागला तर फ्रीजमधील तापमान बिघडते अन् वीज जास्त खर्च होते. सध्या टिव्ही महत्वाचाच. पण टिव्ही रिमोट कंट्रोलविना थेट स्वीचमधून बंद केले विजेची बचत होऊ शकते. मायक्रोवेवमधील पदार्थ तयार झाला की नाही हे पाहण्यासाठी वारंवार दार उघडले की प्रत्येक वेळी सुमारे 25 अंश सेल्सिअस तापमान खाली येते व तेवढेच तापमान वाढायला अधिकची वीज खर्च होते. सिलिंग पंख्यासाठी पारंपरिक रेग्युलेटर वापरण्याऐवजी इलेक्ट्रानिक रेग्युलेटर वापरलेला बरा. योग्य प्रमाणात कपडे धुण्याची पावडर वापरून वाशिंग मशीन तसेच ओव्हनमध्ये टायमरचा वापर केल्यास अधिक खर्च होणारी वीज नियंत्रणात राहते. आंघोळीसाठी गरम पाणी लागतं म्हणून आंघोळ होईपर्यंत गिझर सुरु ठेवणे वीज खर्चाचे आणखी एक कारण आहे. त्यापेक्षा गरम झालेले पाणी एकदाच बादलीत घेऊन गिझर बंद करणे योग्य ठरते.
एअर कंडिशनरला पंख्यापेक्षा साधारणतः नऊ पट वीज अधिक लागते. त्यामुळे शक्यतो पंखाच वापरा. एसी वापरायचा असल्यास नियमितपणे फिल्टर तपासणे, स्वच्छ करणे, एसी सुरु असताना दरवाजे, खिडक्या व्यवस्थित बंद करणे आवश्यक आहे. गारवा निर्माण झाला की शक्य असल्यास एसी बंद करावा. स्मार्ट मोबाईलला सतत चार्जिंग करावे लागते. त्यामुळे मोबाईल पूर्ण चार्ज झाल्यानंतर चार्जिंगचे बटण करण्याचा बंद करण्याचा कंटाळा न केलेला उत्तमच. इमारतींमध्ये दोन लिफ्ट असल्यास एखादी लिफ्ट लवकर येईल म्हणून दोन्ही लिफ्टचे बटण दाबतात. असे केल्याने बरीच वीज खर्च होते. त्यापेक्षा एकाच लिफ्टचे बटण दाबले पाहिजे. घाई नसल्यास लिफ्टचा वापर न करता शक्य तेवढ्या जिन्याच्या पायर्या चढणे किंवा उतरल्यास व्यायाम होतो आणि आपसुक वीजबचतही होते.
निशिकांत राऊत, जनसंपर्क अधिकारी, महावितरण, पुणे.
—————————————————————–

