मुंबई: सेवा क्षेत्रात असलेल्या महावितरणने एक पाऊल पुढे जात ग्राहकसेवा व प्रशासकीय गतिमानतेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मोबाईल ॲप्सची केलेली निर्मिती ‘डिजिटल महाराष्ट्र’साठी पुरक असून यापुढे नागरिकांना शासकीय कार्यालयांत जाण्याची गरज भासणार नाही अशा सर्व सेवा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपलब्ध व्हाव्यात, अशी अपेक्षा राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (दि. 29) व्यक्त केली.
महावितरणने तयार केलेल्या चार नव्या स्वतंत्र मोबाईल अँप्सचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री ना. श्री. फडणवीस यांच्याहस्ते झाले. यानिमित्त सह्याद्री अतिथी गृहाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावार राज्याचे उर्जा, नवीन व नवकरणीय मंत्री मा. ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री ना. श्री. गिरीश महाजन, राज्याचे मुख्य सचिव श्री. स्वाधीन क्षत्रीय, उर्जा विभागाचे प्रधान सचिव श्री. बिपीन श्रीमाळी, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री ना. श्री. फडणवीस म्हणाले, राज्याच्या वीजक्षेत्रात सध्या तिनही कंपन्यांची चांगली कामगिरी सुरु आहे. त्यामुळे या तिनही कंपन्यांकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. महावितरणच्या चारही मोबाईल ॲप्समुळे वीजग्राहकांना सुलभतेने व तत्परतेने लोकाभिमुख सेवा मिळेल तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हातात मोबाईल ॲप्सच्या माध्यमातून कार्यालयीन कामकाजाची सोय उपलब्ध झाली आहे. त्यामुळे ग्राहकसेवा व प्रशासकीय सेवेत गतीमान व पारदर्शकता येईल. वीजग्राहकाला केंद्रस्थानी ठेऊन महावितरणने लोकाभिमुख सेवा देण्याचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.
मुख्यमंत्री ना. श्री. फडणवीस म्हणाले, की राज्यातील विजेचे औद्योगिक दर अधिक असले तरी ते कमी करण्याचे प्रयत्न सुरु आहे. इतर राज्यांच्या तुलनेत कृषीपंपांना सर्वाधिक वीजपुरवठा महाराष्ट्रात होतो. कृषीपंपांना सबसीडी आवश्यक आहे. पण त्याचा परिणाम औद्योगिक दरांवर होत आहे. त्यामुळे सौरऊर्जेवरील कृषीपंपांसह कृषीवाहिन्यांवरील वीजभार सौरउर्जेवर स्थानांतरीत करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या समन्वयातून राज्यातील कोळसा पुरवठ्याच्या व्यवस्थापनातून सुमारे 500 कोटींपेक्षा अधिक रुपयांची बचत झाली आहे. यात उर्जामंत्री ना. श्री. बावनकुळे यांचे महत्वाचे योगदान असल्याचे मुख्यमंत्री ना. श्री. फडणवीस यांनी आवर्जून नमूद केले. ‘डिजिटल महाराष्ट्र’च्या संकल्पनेला मूर्त स्वरुप देण्यासाठी सर्वच शासकीय विभाग चांगले काम करीत आहेत. आपले सरकारच्या माध्यमातून 150 शासकीय सेवा आँनलाईन झालेल्या आहेत. आणखी 100 सेवांची त्यात भर पडणार असून येत्या 2 आँक्टोबरपासून एकूण 100 सेवा मोबाईल ॲपद्वारे उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती यावेळी मुख्यमंत्री ना. श्री. फडणवीस यांनी दिली. राज्य शासनाच्या सर्व विभागाने मोबाईल ॲप्समध्ये नागरिकांचा आधार क्रमांक समाविष्ट करण्याचा पर्याय समाविष्ट करावा, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
राज्याचे उर्जामंत्री ना. श्री. बावनकुळे म्हणाले, की अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सेवाक्षेत्राचे विस्तारीकरण करणे ही काळाची गरज आहे. महावितरणच्या नव्या चार मोबाईल ॲप्समुळे गुणवत्तापूर्ण ग्राहकसेवेसोबतच प्रशासनात पारदर्शकता व गती येईल. उत्कृष्ट ग्राहकसेवा देण्यासाठी सूचवलेल्या 64 सुधारणांवर महावितरण प्रभावीपणे काम करीत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात परळी, अदानी, कोयनामधील वीजनिर्मिती बंद झाली तरी खुल्या बाजारातून वीजखरेदी न करता कोणत्याही भागात विजेचे भारनियमन होऊ दिले नाही. पूर्वीच्या तुलनेत वीजक्षेत्राबाबत नागरिकांचा असंतोष कमी झाला आहे. आता त्यांची नाराजी किरकोळ प्रश्नांवरून आहे. हे प्रश्न दूर करणे सहज शक्य असून त्यादृष्टीने महावितरण प्रयत्न करीत असल्याचे उर्जामंत्री ना. श्री. बावनकुळे यांनी सांगितले.
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार म्हणाले, वीजग्राहक व महावितरणचे अधिकारी, कर्मचारी यांच्यातील दरी दूर करण्याचा प्रयत्न या मोबाईल ॲप्सच्या माध्यमातून केला गेला आहे. ग्राहक तक्रारींचे विश्लेषण, कर्मचाऱ्यांशी चर्चा करून या चारही मोबाईल ॲप्सची निर्मिती करण्यात आली आहे. यावेळी उर्जा विभागाचे प्रधान सचिव (प्रभारी) श्री. बिपीन श्रीमाळी यांनी मनोगत व्यक्त केले. महावितरणचे संचालक (प्रकल्प) श्री. प्रभाकर शिंदे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला प्रधान सचिव (माहिती व तंत्रज्ञान) श्री. विजयकुमार गौतम, प्रधान सचिव (उद्योग) श्री. अपूर्वचंद्रा, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाचे सदस्य श्री. दीपक लाड, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. राजीव मित्तल, तिनही वीज कंपन्यांचे संचालक, वरिष्ठ अधिकारी व विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

