नवी दिल्ली : ‘केंद्र सरकारनं तीनही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात आम्ही हे तीन कृषी कायदे रद्द करण्याची घटनात्मक प्रक्रिया पूर्ण करू’ अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी केली. सोबतच, शेतकरी आंदोलकांना आपलं आंदोलन मागे घेत आपापल्या घरी परतण्याचं आवाहनही मोदींनी केलंय. यानंतर लगेचच विरोधी पक्षांकडूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. आगामी पाच राज्यांच्या निवडणुकीत पराभवाच्या भीतीनंच भाजप सरकारनं हा निर्णय घेतल्याचं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी म्हटलंय.
आंदोलन अजून थांबवणार नाही – राकेश टिकैत– गेल्या एका वर्षापासून शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व करणारे राकेश टिकैत यांनी हे आंदोलन अजूनही थांबवणार नसल्याचे संकेत दिले आहेत.
सत्याग्रहाच्या मार्गानं अहंकाराची मान झुकवली- राहुल गांधी
‘देशाच्या अन्नदात्यांनी सत्याग्रहाच्या मार्गानं अहंकाराची मान झुकवली. अन्यायाविरुद्ध विजयाच्या शुभेच्छा’ असं म्हणत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आपला एक जुना व्हिडिओही शेअर केला आहे. यात ‘मोदी सरकारला एक दिवस तीनही कृषी कायदे मागे घ्यावे लागतील, हे माझे शब्द जपून ठेवा’ असं म्हणताना ते दिसत आहेत. या व्हिडिओ सहीत आपला शब्द खरा ठरल्याचं राहुल गांधींनी सूचवलंय.
पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत पराभवाच्या भीतीने कायदे मागे -खा. संजय राऊत
“गेल्या दीड वर्षापासून काळ्या कृषी कायद्यांविरोधात देशातले शेतकरी आंदोलन करत होते. सरकारची भूमिका सुरुवातीपासूनच आडमुठेपणाची होती. काही झाले तरी झुकणार नाही, शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करणार नाही अशी त्यांची भूमिका होती. शेतकऱ्याच्या आंदोलनाकडे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. या काळात अनेक शेतकऱ्यांचे मृत्यू झाले. लखीमपूर खेरीमध्ये शेतकऱ्यांना चिरडून मारण्यात आले. लाठ्या आणि गोळ्या चालवल्या तरीही शेतकरी हटला नाही. शेतकऱ्यांना दशतवादी, खलिस्तानी, पाकिस्तानी अशा उपाध्या देण्यात आल्या. पण शेतकऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेवर देशातील जनतेच्या भावना सुद्धा त्यांच्यासोबत होत्या. अखेर पंतप्रधानांना काळे कायदे मागे घ्यावे लागले,” असे संजय राऊत म्हणाले.
“यात राजकारण आहेच. पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाजपाच्या पायाखालची वाळू सरकत आहे. शेतकरी संतप्त आहे. ते आपले पराभव करतील या भीतीने हे कायदे मागे घेतले असावेत. तरीही उशीरा का होईना पंतप्रधानांनी देशाचा आवाज ऐकला आणि पहिल्यांदाच मन की बात देशाच्या भावनेशी जोडली गेली आहे. त्यांचे मी अभिनंदन करतो,” असे संजय राऊत यांनी म्हटले.
“१३ राज्यातली पोटनिवडणुकांमध्ये भाजपाचा जो दारूण पराभव झाला त्यानंतर सर्वात आधी पेट्रोलचे दर कमी करण्यात आली. आता शेतकऱ्यांच्या आंदोलनाची आग पसरत जाईल म्हणून हे कायदे मागे घेतले आहे. ही राजकीय पावले असली तरी हा शहाणपणा त्यांना सूचला त्याचे कौतुक आहे. शेतकऱ्यांचा विजय झाला आहे. शेतकऱ्यांच्या निमित्ताने या देशातले विरोधक प्रथमच एकवटले आहेत. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले,” असे राऊत म्हणाले.

