मुंबई l प्रतिनिधी
मोदी सरकार सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडून फक्त दोन – चार उद्योगपती ‘मित्रों’ साठीच काम करत असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. आधीच महागाईने जगणे कठीण झाले असताना आज पुन्हा स्वयंपाकाचा गॅस 25 रुपयांनी महाग करुन केंद्र सरकारने जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. मोदी सरकार सामान्य जनतेला चिकटलेला जळू असून जळूप्रमाणेच नागरिकांचे रक्तशोषण करत आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
महागाईच्या प्रश्नावर मोदी सरकारचा समाचार घेताना पटोले म्हणाले की, जानेवारी महिन्यापासून मोदी सरकारने सातत्याने दरवाढ करत गॅस सिलिंडर 190 रुपयांनी महाग केला आहे. युपीए सरकारवेळी 440 रुपये असणारा हाच एलपीजीगॅस आता 900 रुपयांपर्यंत महाग झाला आहे. उज्ज्वला योजनेच्या नावाखालीही गरिबांची थट्टा केली जात आहे. उज्ज्वला योजनेत मोफत गॅसच्या नावाखाली गरिबांचे केरोसिन बंद केले आणि आता गॅस 900 रुपयांपर्यंत महाग केला, एवढा महाग गॅस गरीब, सामान्य जनेतला परवडणारा नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सामान्य जनेतला वाऱ्यावर सोडून फक्त त्यांच्या मोजक्या उद्योगपती मित्रांचेच हित जोपासत आहेत. गेल्या 8 महिन्यात केंद्र सरकारने 67 वेळा इंधन दरवाढ केली. पेट्रोल 107 रुपये, डिझेल 96 रुपये लिटर असून गॅसच्या किंमतीही सातत्याने वाढवून इंधनावरील कर रुपाने मोदी सरकारने 7 वर्षात तब्बल 25 लाख कोटी रुपयांची नफेखारी केली आणि सामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटले आहे.
केंद्रात डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली सरकार असताना महागाईची झळ सामान्य जनतेला पोहचू नये यासाठी इंधन व गॅसवर सबसिडीच्या रुपाने मदत दिली जात होती ज्याचा लाभ जनतेला होत होता, ती मदतही मोदी सरकारने आता पूर्णपणे बंद केली आहे. UPA सरकारवेळी ‘महंगाई डायन’ वाटणाऱ्या BJP ला आता हीच जीवघेणी महागाई ‘डार्लिंग’ वाटत आहे.
2014 साली खोटी स्वप्ने दाखवून सत्तेत आलेल्या मोदी सरकारने शेतकरी, कामगार, सामान्य जनतेसह मध्यमवर्गांचे जगणेही मुश्कील करुन ठेवले आहे. काँग्रेस सरकारने उभे केलेले प्रकल्प विकण्याचा एकमात्र उद्योग गत 7 वर्षांपासून धडाक्यात सुरु आहे. सरकारी कंपन्या, बँका, विमा, रेल्वे सर्व काही उद्योगपती मित्रांच्या हवाली करुन देशाचे वाट्टोळे करण्याचे काम सुरु आहे.
देशातील जनता मोदी सरकारच्या या कारभाराला कंटाळली असून महागाईवरुन जनतेत प्रचंड आक्रोश आहे, ही जनताच आता BJP व मोदींना त्यांची जागा दाखवेल असेही पटोले म्हणाले.

