अकोले -देशातील बदलत्या राजकीय आणि सामाजिक वातावरणावर भाष्य करताना वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी थेट मतदारांनाच आरसा दाखवला आहे. “जे लोक केवळ धर्माला पाहून मतदान करतात, त्यांना माझा एकच प्रश्न आहे की, तुम्ही किंवा तुमचे कुटुंब भविष्यात धर्मांतर करणार आहात का? जर तुम्ही धर्मांतर करणार नसाल, तर मग आरएसएस आणि भाजप जो ‘धर्माचा’ मुद्दा मांडत आहेत, तो तुम्हाला खरा का वाटतो?” अशा अत्यंत बोचऱ्या आणि थेट प्रश्नाने आंबेडकरांनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी धर्माच्या नावावर होणाऱ्या ध्रुवीकरणावर प्रहार करताना सांगितले की, भाजप आणि आरएसएसने जाणीवपूर्वक लोकशाहीला हुकूमशाहीत परिवर्तित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. “तुम्ही धर्मांतर करणार नसाल तर मग धर्माला धोका आहे, हा त्यांचा मुद्दा तुम्हाला पटतोच कसा? हा केवळ जनतेला गुमराह करण्याचा प्रकार आहे,” असे त्यांनी म्हटले आहे. आम्ही आणीबाणी भोगली आहे, पण सध्याची पिढी एका वेगळ्याच छुप्या हुकूमशाहीकडे ढकलली जात असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
केवळ भाजपवरच नव्हे, तर काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांवरही प्रकाश आंबेडकर यांनी निशाणा साधला. राहुल गांधींचा उल्लेख करत ते म्हणाले, ” राहुल गांधी हे एपस्टीन मध्ये आपल्या पंतप्रधानांचे फोटो आहेत का? याबाबत प्रश्न विचारत नाहीत. पेगेसीस किंवा इतर विषयात कोणताही विरोधी पक्षातील नेता प्रश्न विचारत नाही. ईडी, सीबीआयचा सेसेमीरा विरोधी पक्षातील नेत्यांच्या मागे लागलेला आहे. त्यामुळे कोणताही विरोधी पक्षनेता बोलायला तयार नाही.”
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेससोबत जाणार का? या प्रश्नावर आंबेडकरांनी अत्यंत सावध आणि स्पष्ट भूमिका घेतली. ते म्हणाले, “मी जर तोंड उघडले तर काँग्रेसला देशात फटका बसेल आणि त्याचा फायदा भाजपला होईल, म्हणून मी सध्या काही गोष्टी बोलत नाही. त्यामुळे मी काँग्रेसच्या गोष्टी आम्ही गुलदस्त्यात ठेवतो. मुंबईत काँग्रेस सोबत जायचे की नाही याबाबत आम्ही अजून भूमिका घेतलेली नाही. मात्र, जोपर्यंत सहयोगी पक्षाला सन्मान दिला जात नाही, तोपर्यंत आम्ही युतीचा विचार करणार नाही. आम्ही शिजवलेले तुम्ही आयते खायला बघत असाल, तर ते शक्य नाही.”

