मुंबई :ज्या पद्धतीने निवडणूक आयोग ते सुप्रीम कोर्ट सर्व संविधानिक संस्था या भारतीय जनता पक्षासारख्या नेत्यांच्या पायाखाली चिरडल्या जात आहेत,”ज्या पद्धतीने महाराष्ट्राचे आणि बिहारचे निकाल लावण्यात आले. ज्या पद्धतीने लोकशाहीचा गळा घोटण्यात आला,त्याबद्दल आता बोललो नाही, तर नंतर उशीर झाला, बोलायचं राहून गेलं, अशा भावना मरताना येण्यापेक्षा जिवंतपणी आलेल्या बऱ्या.” असं खासदार संजय राऊत म्हणाले आहेत .”आमच्यासारखे लोक जिवंतपणी लढत आहेत, कारण आम्ही मुडदे नाही. जिवंत माणसं पाच वर्ष वाट पाहत नाही, हा जिवंत माणसांचा देश आहे. महाराष्ट्र हे जिवंत माणसांचं राज्य आहे” असंही संजय राऊत पुढे म्हणाले.
ठाकरे बंधूंची युती झालेली आहे, केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे, असं वक्तव्य शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केलं. तर सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टबद्दल प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की उशीर झाला, बोलायचं राहून गेलं, अशा भावना मरताना येण्यापेक्षा जिवंतपणी आलेल्या बऱ्या.
संजय राऊत यांची पोस्ट
हिमांशु मोहन यांच्या काही ओळी खासदार संजय राऊत यांनी ‘एक्स’ सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या. “एक दिन हम सब अपनी – अपनी चुप्पियों को लेकर मर जाएँगे और हमारा सबसे आख़िरी ख़याल होगा हमें बोलना चाहिए था।” अशा ओळी शेअर करताना संजय राऊत यांनी ‘हमें बोलना चाहिये था…..!’ असं कॅप्शन दिलं होतं. पत्रकारांनी याविषयी विचारलं असता, संजय राऊत म्हणाले की “माणसाने बोललं पाहिजे. शेवटच्या टप्प्यात दोन चमचे पाणी पाजून, अरे अरे माझं हे बोलायचं राहिलं, ही राष्ट्रीय समस्या आहे”

