मुंबई-मुंबईत भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी महाविकास आघाडीने एकत्र लढावे, यासाठी शिवसेना ठाकरे पक्ष कमालीचा आग्रही असल्याचे दिसत आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.मुंबई महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी विरोधी पक्षांच्या मतांमध्ये फाटाफूट होऊ नये, ही ठाकरे गटाची मुख्य भूमिका आहे. काँग्रेसने मुंबईत स्वबळाचा नारा दिला असला, तरी महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढल्यास भाजपचा पराभव करणे सोपे जाईल, असे मत संजय राऊत यांनी राहुल गांधी यांच्याकडे मांडले आहे. भाजपला रोखण्यासाठी आपण एकत्र लढूया, असे आवाहन राऊत यांनी या संवादादरम्यान केल्याचे माहिती आहे.
एकीकडे काँग्रेसला सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू असतानाच, दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील जागावाटपाची चर्चा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मुंबईच्या राजकारणात ‘ठाकरे बंधू’ एकत्र येण्याचे संकेत मिळत असून, आज किंवा उद्या या दोन पक्षांच्या युतीची अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.
या नव्या राजकीय समीकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष देखील सकारात्मक असल्याचे दिसून येत आहे. शरद पवार यांचा पक्ष ठाकरे बंधूंसोबत महापालिका निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती आहे. जर काँग्रेसनेही या आघाडीला साथ दिली, तर मुंबईत भाजपविरुद्ध ‘महाविकास आघाडी’ अधिक प्रबळ होण्याची चिन्हे आहेत.मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकवण्यासाठी आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सर्वसमावेशक आघाडीचा पवित्रा घेतला आहे. आता राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष या प्रस्तावावर काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

