जो जितेगा वोही सिकंदर कहलायेगा
मुंबई- विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच विधानसभा सभागृहात राष्ट्रवादीतील फूट दिसून आली. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे 53 पैकी 24 आमदाराच विधानसभेत हजर होते. यातील काही आमदार विरोधी बाकांवर बसले, तर अजित पवारांना पाठिंबा देणारे आमदार सत्ताधारी बाकांवर बसले.24 आमदार आज गैरहजर होते यांचा हाथ दोन्ही डगरीवर असल्याचे दिसून आले आहे.
विरोधी बाकांवर बसलेले आमदार
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बहुसंख्य आमदारांनी अजित पवारांच्या गटात प्रवेश केला. तर काही आमदार शरद पवारांसोबत आहेत. हे आमदार आज विरोधी बाकांवर बसलेले होते. त्या आमदारांची नावे खालील प्रमाणे…
1) जयंत पाटील 2) अनिल देशमुख 3) बाळासाहेब पाटील 4) सुनिल भूसारा 5) राजेश टोपे 6) प्राजक्त तनपुरे 7) सुमन पाटील 8) रोहित पवार 9) मानसिंग नाईक
सत्ताधारी बाकांवर बसलेले आमदार
1) अजित पवार 2) छगन भुजबळ 3) दिलीप वळसे-पाटील 4) हसन मुश्रीफ 5) धनंजय मुंडे 6) धर्मराज आत्राम 7) संजय बनसोडे 8) अनिल पाटील 9) आदिती तटकरे 10) बबन शिंदे 11) इंद्रनील नाईक 12) प्रकाश सोळंके 13) किरण लहमाते 14) सुनील शेळके 15) सरोज अहिरे
जितेंद्र आव्हाडांचे विधानसभा अध्यक्षांना पत्र
दरम्यान, राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार यांनी पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष, गटनेता आणि मुख्य प्रतोद यांची नियुक्ती केली आहे. तर, शरद पवार गटानेही आमदार जितेंद्र आव्हाड यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य प्रतोदपदी निवड केली आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे मुख्य प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी गटनेते जयंत पाटील यांच्या आदेशाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र दिले. विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आसन व्यवस्थेबद्दल हे पत्र होते.
पत्रात जितेंद्र आव्हाडांनी म्हटले आहे की, “महाराष्ट्र विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते जयंत पाटील यांच्या आदेशानुसार आपणास कळवण्यात येत आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 9 सदस्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. या 9 सदस्यांना वगळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उर्वरित सर्व सदस्यांची विधानसभा सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची विरोधी पक्षासाठी असणाऱ्या आसनावर बसण्याची व्यवस्था करण्यात यावी”

