मुंबई, दि२३ भारतीय अर्थव्यवस्था अधिक भक्कम करण्यासाठी अभियांत्रिकी शिक्षणाचा महत्वाचा वाटा आहे. मा.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- 2020 तयार केले आहे. भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनविणे हे या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट आहे.त्यामुळे सर्व अभियांत्रिकी संस्थांनी पुढाकार घेऊन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीस अधिक गती द्यावी, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले.
विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वडाळा,मुंबई येथे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी संदर्भात तंत्र शिक्षण संचालनालयाच्या वतीने स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली.यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी , तंत्रशिक्षण संचालक डॉ.विनोद मोहितकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रवींद्र कुलकर्णी,माजी कुलगुरू व सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ.नितीन करमळकर, उद्योजक भरत अमलकर,महाविद्यालयचे प्राचार्य,प्राध्यापक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले,
स्वायत्त अभियांत्रिकी संस्था अभ्यासक्रमातले बदल अंमलात आणण्यासाठी सक्षम असतात. त्यांना संलग्न संस्थेप्रमाणे विद्यापीठावर अवलंबून रहावे लागत नाही. शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून स्वायत्त अभियांत्रिकी संस्थामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अमंलबजावणी सुरू करून त्या अनुभवाच्या आधारे शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून हे धोरण इतरही ज्ञानशाखेच्या महाविद्यालयांमध्ये राबविण्याचा शासनाचा मानस आहे. त्यामुळे देशभरात अभियांत्रिकी शिक्षणासाठी अग्रेसर असलेल्या महाराष्ट्र राज्याला अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील तरतुदींची अमंलबजावणी करून पुन्हा आपले स्थान अधिक भक्कम करून आपली वेगळी ओळख निर्माण करण्याची संधी मिळणार आहे.असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
या धोरणानुसार अभियांत्रिकी क्षेत्रातील भविष्यातील गरजा आणि रोजगार संधी,नवीन संशोधन याचा अभ्यास करून विकास व अध्ययनाच्या तत्वांवर आधारित अभ्यासक्रम व अध्ययन, शाखांची रचना, संधी,समानता, समावेशकता आणि नाविन्यपूर्ण शिक्षण, मातृभाषेतील शिक्षण, विद्यार्थ्यांना कसे सहज उपलब्ध होईल यासाठी तंत्र शिक्षण संचालनालय यांनी पुढाकार घेतला आहे.
त्यामुळे अभियांत्रिकी शिक्षण घेणारे विद्यार्थी अभियांत्रिकी बरोबरच बहुशाखीय अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्स, मॅकेनिकल, केमिकल,कला, सायन्स, भारतीय ज्ञानसंपदा, असे इतर शाखेचे विषय सुद्धा घेऊन शकतील. तसेच शिक्षणाबरोबर त्या त्या क्षेत्रील प्रशिक्षण सुद्धा घेता येईल.हे या शैक्षणिक धोरणाचे महत्वपुर्ण वैशिष्टे आहे.
या धोरणाच्या अमंलबजावणीस अधिक गती देण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल असेही मंत्री श्री पाटील यांनी यावेळी सांगितले.

