मुंबई-पालघरमधील साधू हत्याकांडाचा उल्लेख करत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी उद्धव ठाकरेंवर तिखट हल्ला चढवला आहे. उद्धव ठाकरे यांना लाज वाटली पाहिजे, असे ते मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना म्हणालेत.केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर पुढे बोलताना म्हणाले की, अडीच वर्षं जो व्यक्ती आपल्या घरातच बंद राहिला, आपल्या कार्यकर्त्यांनाही भेटला नाही, जो कोविडच्या भीतीने आपल्या घरातून बाहेरच पडला नाही, त्यांना सत्तेतून बाहेर करण्याचे काम त्यांच्याच कार्यकर्त्यांनी आणि जनतेने केले आहे.
अनुराग ठाकूर म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी आपली विचारसरणी सोडून अशा विचारसरणीला जवळ केले तिला बाळासाहेब ठाकरे नेहमीच विरोध करत होते. त्यामुळे हा दिवस तर त्यांना बघायचाच होता. आता पश्चात्ताप करून काय फायदा? असा सवाल अनुराग ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.
उद्धव ठाकरे, आता तरी सत्याचा सामना करा. आख्ख्या जगाने मान्य केले आहे की जगातल्या 160 देशांना औषध व लस पोहोचवण्याचे काम भारताने केले आहे. देशात 220 कोटी लसी मोफत देण्याचे काम मोदींनी केले आहे. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच पुढाकाराने जेव्हा निधीची तरतूद केली गेली, आपल्या वैज्ञानिकांना प्रेरणा दिली गेली, तेव्हा कुठे ही लस तयार झाली. तेव्हा तर तुम्ही खोलीत बसला होतात. घाबरत होता. मुंबई आणि महाराष्ट्राच्या जनतेला विसरले होता, असा टोला अनुराग ठाकूर यांनी लगावला आहे
उद्धव ठाकरेंनी तर त्या पक्षाशी हातमिळवणी केली, जो देशावरील हल्ल्यानंतर मौन बाळगून होता. मोदी सरकारने सर्जिकल स्ट्राईक केला. तुम्ही तर त्यांच्याशी हातमिळवणी केली, ज्यांनी सर्जिकल स्ट्राईकनंतर सैन्याच्या वीर जवानांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, असंही ठाकूर म्हणाले
उद्धव ठाकरेंनी मणिपूरचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर अनुराग ठाकूर यांनी पालघरमधील साधू हत्याकांडाचा मुद्दा मांडला आहे. उद्धव ठाकरेंच्या सरकारच्या काळात पालघरमध्ये साधूंवर हल्ले झाले, त्यांची हत्या झाली. ज्याच्या सत्ताकाळात साधूसंतांच्या बाबतीत हे असे प्रकार झाले, त्याला तर लाज वाटली पाहिजे, अशा शब्दांत अनुराग ठाकूर यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

