मुंबई-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची अवस्था केविलवाणी करून ठेवली आहे. गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा जो धाक, वचक, दबदबा राहिला पाहीजे, तो आता अजिबात राहिलेला नाही. प्रचंड राजकीय हस्तक्षेप होत आहे, असा हल्लाबोल आज राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.
अजित पवार सध्या जळगावच्या दौऱ्यावर आहे. येथे पोलिसांशी संवाद साधताना त्यांनी शिंदे-फडणवीसांना अनेक मुद्द्यांवरून धारेवर धरले. अजित पवार म्हणाले, मुंबई ही सतत काम करणाऱ्यांचे, चोवीस तास धावणाऱ्यांचे शहर आहे. अशा शहरात सकाळी कामासाठी जात असणाऱ्या तरुणीवर धावत्या लोकलमध्ये तेही महिलांच्या डब्यामध्ये तरुणाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. केवळ ही एकच घटना नव्हे, तर राज्यात अशा अनेक घटना घडत आहेत, ज्या मी जाहीर सांगूही शकत नाही. अशा विकृतांमध्ये आता कायद्याचा जरब अजिबातच राहिला नाही.
अजित पवार म्हणाले, राज्यात सतत जातीय तणावाच्या घटना घडत आहे. कोणीतरी काहीतरी मॅसेज मोबाईलवरून व्हायरल करतो. त्यामुळे दोन धर्मीयांमध्ये, जातींमध्ये प्रचंड तणाव निर्माण होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. पोलिस असे कृत्य करणाऱ्यांना तातडीने अटक का करत का नाही? असे कृत्य करणारा कोणताही पक्षाचा असो, त्यावर तातडीने कारवाई झाली पाहीजे. मात्र, सध्या पोलिसांच्या कामात प्रचंड राजकीय हस्तक्षेप होत आहे. त्यामुळे राज्याची कायदा-सुव्यवस्था ढासाळली आहे.
अजित पवार म्हणाले, मुळात राज्याला 43 मंत्री हवे आहेत. मात्र, शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळामध्ये केवळ 20 मंत्री आहेत. देवेंद्र फडणवीसांकडे तर पाच-पाच जिल्ह्याचे पालकमंत्री आहोत. अशावेळी त्या-त्या जिल्ह्यांना न्याय देता येणे कठीण आहे. मात्र, आपण अतिशय कार्यक्षम असून एकाचवेळी अनेक जबाबदाऱ्या सांभाळू शकतो, असा राज्यातील मंत्र्यांचा दावा आहे. मात्र, कारभार हाताळण्यात ते सपशय अपयशी ठरत आहेत. अनेक जिल्ह्यांत पाणी, रस्ते, रोजगार, शेतकऱ्यांच्या समस्येकडे पाहायला कुणी नाही. त्यामुळे नागरिकांनी तक्रार घेऊन जायचे कुणाकडे, असा प्रश्न निर्माण होत आहे.
अजित पवार म्हणाले, राज्यात कांदा उत्पादक सध्या प्रचंड अडचणीत आहे. कांद्याला क्विंटलला केवळ २०० ते ३०० रुपये दर मिळत आहेत. दुसरीकडे, याच राज्यातील कांद्याला हैदराबादमध्ये १२०० ते २००० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. त्यामुळे राज्यातून ट्रॅक्टरच्या ट्रॅक्टर कांदे घेऊन हैदराबादला जात आहे. जे हैदराबादला जमू शकते, ते महाराष्ट्रासारख्या राज्याला का जमू शकत नाही. राज्यासाठी ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे.

