पुणे-संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचं पुण्यात मुक्कामासाठी आगमन झालं आहे.सायंकाळच्या सुमारास या दोन्ही पालख्यांचे पुण्यनगरीत आगमन होताच ‘आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे’ अशी अनुभूती विठुमाऊलीच्या भक्तांना आली.

.पुण्यातल्या संगमवाडी पुलाजवळ दोन्ही पालख्या एकमेकांना भेटल्या आहेत. या दोन्ही पालखीत वारकऱ्यांची गर्दी झाली आहे. वारकरी पुण्यात दाखल झाल्यानं पुण्यात चैतन्याचं वातावरण निर्माण झालं.संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं पंढरपूरच्या वारीसाठी शनिवारी देहूमधून प्रस्थान ठेवलं होतं. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोमवारी आळंदीहून पुण्याच्या दिशेनं निघाली. या दोन्ही पालख्यांच्या स्वागतासाठी पुणेकरांनी रस्त्यांच्या दुतर्फा गर्दी केली होती. पुणे महापालिकेच्या वतीनं पाटील इस्टेट परिसरात दोन्ही पालख्यांचं स्वागत करण्यात आलं.
दोन्ही पालख्या संगमवाडी पुलाजवळ भेटीसाठी एकमेकांना सामोऱ्या आल्या, त्यावेळी विलोभनीय दृश्य तयार झालं. पंढरपूरच्या वारीदरम्यान माउली आणि तुकोबारायांच्या पालख्यांची होणारी ही पहिली भेट असते. त्यानंतर या दोन्ही पालख्या वाखरीत एकत्र येतात. ज्ञानोबा माउली आणि तुकोबारायांच्या पालख्या आता दोन दिवस पुण्यात मुक्कामाला आहेत. माउलींची पालखी विठोबा मंदिरात, तर तुकोबारायांची पालखी निवडुंगा विठ्ठल मंदिरात विसावली आहे.काही ठिकाणी उत्स्फूर्तपणे वारकऱ्यांसह नागरिकांनी फुगड्यांचा फेर धरला. टाळ-मृदंगांच्या तालावर ठेकाही धरला. या क्षणाची छायाचित्रे आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्याचा मोह अनेकांना आवरला नाही. पालखी मार्गावर ठिकठिकाणी वारकऱ्यांचे स्वागत करणारे फलक लावण्यात आले होते. सामाजिक संस्था, मंडळे, राजकीय व्यक्ती, खासगी कार्यालयांतर्फे त्यांना खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले.

