अमृतसरच्या गुरू महालात शिख धर्मीयांचे सहावे गुरू हरगोबिंदजी आणि माता नानकी देवी यांच्यापोटी 1 एप्रिल 1678 रोजी तेग बहादुर यांचा जन्म झाला. त्यांचे पालनपोषण होताना गुरू पुत्र झाल्याने त्यांना अनेक सुखसुविधा होत्या तशीच शिख गुरुंच्या त्यागाची, समर्पणाची आणि समाजसेवेचीही परंपरा होती ते पंजाबमध्ये अमृतसरमध्येच वाढले. ते दीर्घकाळ अध्ययन, चिंतन, मनन करित मात्र त्याचवेळी ते उत्तम सैनिक आणि कुशल योद्धेही बनले. त्यांनी अनेक प्रसंगी युद्धात शत्रुसैन्यात घुसून शत्रुसैन्याचा पाडाव केला मात्र त्यांना युद्धामुळे येणारे दुख: आणि त्रास याची कल्पना आल्यावर त्यांना युद्धाबद्दल चीड निर्माण झाली. सततची युद्धे किती अर्थहीन आहेत याबद्दल त्यांनी त्यांच्या बाणीमध्येही लिहून ठेवले आहे.
गुरू तेगबहादुर स्वधर्माचे निश्चितच अभिमानी होते मात्र ते कोणत्याही धर्माचा द्वेष करीत नव्हते. इस्लामचे नाव घेणारे इस्लामचा मूळ संदेश सत्तेच्या स्वार्थापोटी बाजुला ठेवून अत्याचार करित आहेत ही त्यांची भावना होती. धर्माच्या नावावर अत्याचार कोणीच करू नये. ही त्यांची भूमिका त्यांनी वेळोवेळी मांडली. पंजाबमध्ये आनंदपूर साहिब या नव्या गावाचे निर्माण त्यांनी केले. आज या गावाला जगभरात महत्त्व प्राप्त झाले आहे.
तेग बहादुरजी यांना हिंद की चादर असेही म्हटले जाते. धार्मिक स्वातंत्र्य आणि सौहार्द या तत्वांकरिता महान गुरू तेग बहादुर साहिब यांनी आपल्या प्राणांचे बलिदान केले. गुरू तेग बहादुरजी मानवाधिकारासाठी बलिदान करणारे जगातील पहिले हुतात्मा वर्णन कॅलिफोर्निया विद्यापीठातील जगातील विविध धर्मांचे अभ्यास करणारे जगप्रसिद्ध इतिहासकार डॉ. नोएल किंग यांनी केले आहे.
24 नोव्हेंबर 1675 या दिवशी औरंगजेबाच्या आज्ञेने त्यांच्या मारेकऱ्यांनी काश्मिरी पंडीतांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत जाब विचारायला आलेल्या आणि त्यांच्या धर्मांतराच्या मागणीला विरोध करणाऱ्या गुरू तेग बहादुरजींचा दिल्लीच्या चांदणी चौकात अत्यंत क्रूरपणे शिरच्छेद केला. असे म्हणतात त्यांना औरंगजेबाने चमत्कार करून दाखवण्यास सांगितले त्यावेळी त्यांनी आपल्या गळ्यात एक चिठ्ठी लावली जेव्हा त्यांचा शिरच्छेद करण्यात आला आणि ती चिठ्ठी उघडण्यात आली त्यावेळी त्यात लिहिले होते, ‘शीश दिया, सर नहीं ’ म्हणजे मी बलिदान केले मात्र तत्वांशी तडजोड केली नाही.
काश्मीरात त्या काळातही काश्मिरी पंडीत महत्त्वाच्या पदांवर होते आणि बौद्धिक नेतृत्व करीत होते त्यामुळे त्यांच्यावर जबरदस्ती केली, अत्याचार केले, त्यांचे धर्मांतर केले तर इतरांवर जरब बसेल आणि धर्मांतर करणे सोपे जाईल असे मोघलांना वाटत असल्याने काश्मिरी पंडितांवर त्यांनी जबरदस्ती सुरू केली शिखांचे नववे गुरू तेव्हा दिल्लीच्या सत्तेला आव्हान देऊ शकत होते म्हणूनच यातून आपल्याला केवळ गुरू तेग बहादुरजींचा वाचवू शकतात या आशेने काश्मिरी पंडीत गुरुजींकडे आले. त्यांनी गुरुजींकडे मदतीची मागणी केली त्यावेळी नंतर शिखांचे दहावे गुरू झालेले गोबिंदसिंहही तिथे होते. गुरूजींनी कोवळ्या गोबिंद सिंहजीच्या काश्मिरी पंडितांसाठी तुमच्या शिवाय या बलिदानाला कोण योग्य आहे या प्रश्नावर जे उत्तर दिले आणि त्याची किंमत मोजली त्यातूनच गुरू तेगबहादुरजींनी आनंदाने मृत्यूला कवटाळले. त्याचा परिणाम असा झाला की उत्तरेत औरंगजेबाच्या सत्तेला हादरे बसायला सुरुवात झाली. शिखांनी सर्वत्र या क्रौर्याविरुद्ध अतिशय जबर प्रतिक्रिया व्यक्त केली आणि पंडितांवरच्या अत्याचारात खूप कमी आली तर दूर झालेले हिंदू-शिख एकत्र आले आणि एका अथनि काश्मिरी पंडीत समाजाला पुर्नजीवन मिळाले. त्याचवेळी उपखंडात असहिष्णूतेच्या लाटेला ओहोटी लागली आणि लोकांच्या मनात इतर धर्मात आदरभाव पून्हा रूजला.
सर्बप्रीत सिंह नावाचे प्रसिद्ध इतिहासकार आपल्या स्टोरी ऑफ द सिख्स मध्ये लिहितात, गुरूजींना 8 नोव्हेंबर 1665 ला जेव्हा अटक करून औरंगजेबासमोर आणण्यात आले तेव्हा आपली बाजू मांडतांना ते म्हणाले, माझा धर्म भलेही हिंदू नाही मी वेदांची श्रेष्ठता आणि मूर्तीपूजा मान्य करत नाही मात्र हिंदूंचा सन्मानाने जगण्याचा आणि धर्माचरण करण्याचा अधिकार मला मान्य आहे आणि त्यासाठी मी संघर्ष करेन तर बॅ.न.वि गाडगीळ शिखांचा इतिहास या आपल्या ग्रंथात लिहितात, “तेगबहादुर यांच्या बलिदानाने जे औरंगजेबाला होईल, असे वाटले होते ते झाले नाही. उलट काही वर्षे मोगल अंमलाविरुद्ध स्तब्ध असलेले लोकमत अधिक प्रबल आणि प्रक्षुब्ध झाले. या बलिदानाने केवळ शिखांतच नव्हे, तर सर्व हिंदू जाती-जमातींत एक प्रक्षोभकारक भावना निर्माण झाली.” सामान्यपणे काही लोक इच्छा असूनही प्रतिकार करू शकत नाही. काही प्रतिकाराला सुरूवात करतात आणि अडचणी येताच स्वीकारलेला मार्ग अव्यवहार्य आहे असे म्हणून प्रतिकार थांबवतात तथापि गुरू तेग बहादुरजींसारख्या काही व्यक्ती अशा असतात की, मिळालेली प्रेरणा आणि केलेल्या दृढनिश्चयांशी निष्ठावंत राहून अखेरपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत, शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत प्रतिकार करत राहतात.
हिंदूंच्या अंधश्रद्धा आणि अवडंबारावर प्रहार करतानाच पारंपारिक मान्यतापेक्षा वेगळी मते असतानाही इतकेच काय मूर्तीपुजेला विरोध असूनही गुरूजींनी काश्मिरी पंडितांच्या जानवे आणि टिळ्यासाठी हसत हसत बलिदान केले असे त्याचे वर्णन केले जाते. सदाचरणाच्या संदर्भात गुरू तेग बहादुर एक नीडर योद्धे होते त्याचबरोबर एक महान, विद्वान आध्यात्मिक नेते व कवि होते. त्यांची 115 कवणे ही गुरू ग्रंथ साहिब मध्ये समाविष्ट आहेत. दुर्बल, दुर्दैवी लोकांचे संरक्षक असलेले गुरू तेग बहादुर तोफांच्या तंत्रामध्ये कुशल म्हणून प्रसिद्ध होते. आधुनिक जगाने मानवाधिकाराचा मुद्दा मोठ्या प्रमाणात उचलला आहे मात्र याच्या कितीतरी आधी गुरू तेग बहादुरजी यांनी याचे उच्चारण केले होते. याचा आपल्याला अभिमान वाटायला हवा. शिवाय, आजकाल उपासना स्वातंत्र्य आणि विविध धर्म प्रणालींमधील संवाद यांची चर्चा सुरू असताना गुरू तेग बहादुर यांचे स्मरण अतिशय समायोचित आहेत.
गुरू तेग बहादुर यांची आसाम यात्रेबाबत एक महत्त्वाची आठवण आहे. त्याही काळात तेथे आदिवासी जमाती आणि राजसैन्यामध्ये संघर्ष सुरू झाला होता त्यावेळी स्वत: आसाममध्ये गेले होते आणि त्यांनी तेथील आदिवासी जमाती आणि राजसैन्य यांच्यामध्ये शांततेचे समझौते करण्याकरिता त्यांनी यशस्वी वाटाघाटी केल्या म्हणून त्यांना आजही तेथे शांततेचे दूत म्हणून ओळखले जाते. त्यांचेच नाव घेऊन तेथेच विविध जाती जमातींमध्ये पून्हा संघर्ष निर्माण करणे देशाला परवडणारे नाही. इतकेच काय आजच्या अशांत आणि हिंसक होऊ पाहणाऱ्या जगाला गुरू तेग बहादुर यांच्या शांततेच्या संदेशाची पूर्वी कधीही नव्हती इतकी गरज निर्माण झाली आहे.
माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंह एका ठिकाणी म्हणतात संसार का इतिहास ऐसे शहीदोंसे भरा पडा है, जिन्होने अपने सिध्दातोंकी खातीर अपना जीवन बलिदान कर दिया. अपने रक्तकी धारासे नए रास्ते उजागर किए। लेकिन गुरू तेग बहादुर की शहीदी अनोखी और बेमिसाल है। गुरूजींनी अत्याचार आणि उन्मादाला विरोध म्हणून बलिदान केले हे सांगताना ग्यानी झैलसिंग पुढे म्हणतात, यह बेझिझक कहा जा सकता है कि, अगर मुसलमानोंपर अत्याचार होते और उन्हें नमाज पढने या उपासनाके अधिकारसे वंचित किया जाता तो गुरूजी उनकी रक्षा के लिए भी सहर्ष अपनी जान दे देते।(संदर्भ एक बेमिसाल शहिदी महाराष्ट्र शासन, मुंबई 16 जानेवारी 1976 पृष्ठ 3 ) पुढे काय झाले याला इतिहास साक्षी आहे.
मानवाधिकाराचा प्रश्न जगभर ऐरणीवर आला असताना गुरू तेग बहादुरजी यांच्या 350व्या बलिदान वर्षाच्या ज्याला पंजाबमध्ये शहिदी पूरब म्हटले जाते ज्याप्रमाणे जगभर अनेक उपक्रम राबविले जात आहे. त्याचप्रमाणे सरहद संस्थेने विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे पैकी एक म्हणजे जेथे त्यांनी बलिदान केले त्याच दिल्लीमध्ये फेब्रुवारी 2026 मध्ये दुसर्या विश्व पंजाबी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मानवाधिकार हीच या साहित्य संमेलनाची कल्पना आहे. याला जगभरातील लेखक व विचारवंत उपस्थित राहणार आहे. ही त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असा विश्वास वाटतो.
यंदाचे वर्ष शीख धर्माचे नववे गुरू, गुरू तेग बहादुरजी यांचे 350 वे बलिदान वर्ष आहे. नानकशाही कॅलेंडरप्रमाणे 24 नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी गुरू तेग बहादुरजींचा हुतात्मा दिवस म्हणून पाळला जातो. श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त या वर्षी केंद्रसरकार, पंजाब सरकार आणि महाराष्ट्र सरकार यासह देशातील सर्व मुख्य राज्य सरकारांनी यानिमित्त विविध उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. पंजाबमध्ये आनंदपूर साहिब येथे 15 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2025 या काळात मोठ्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. नागपूर, नांदेड येथे ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले आहे. आता २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी खारघर, नवी मुंबई येथे भव्य ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे; या कार्यक्रमाचा सर्व समाजातील नागरिकांनी सहभागी होवून संगतीचा लाभ घ्यावा.

लेखक: संजय नहार, अध्यक्ष-सरहद संस्थेचे संस्थापक

